मस्साजोगमध्ये आजपासून 9 डिसेंबर काळा दिवस म्हणून पाळणार; अधिवेशनामध्ये संतोष देशमुख प्रकरणावर निवेदन दिलं जावं; धनंजय देशमुखांची मागणी
Santosh Deshmukh Case Update : सरपंच देशमुख हत्या प्रकरणावर विधानसभेत निवेदन दिले जावे, अशी मागणी सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख (Dhananjay Deshmukh) यांनी केली आहे.

बीड : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला (Santosh Deshmukh Case Update) एक वर्ष पूर्ण झाले असून आज मस्साजोग येथे काळा दिवस पाळला जाणार आहे. इतकच नाही तर प्रत्येक वर्षी 9 डिसेंबर हा काळा दिवस म्हणून असेल. त्याचबरोबर सरपंच देशमुख हत्या प्रकरणावर विधानसभेत निवेदन दिले जावे, अशी मागणी सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख (Dhananjay Deshmukh) यांनी केली आहे. आमचा निष्पाप माणुस गेला आहे. त्यामुळे आज मस्साजोगमध्ये काळा दिवस पाळण्यात येणार आहे. आज गुन्हेगारांचा जाहीर निषेध गावकऱ्यांकडून केला जाणार आहे. 9 डिसेंबर मस्साजोगसाठी कायमचा काळा दिवस असेल, असं आज आम्ही जाहीर करणार असल्याची माहिती धनंजय देशमुख यांनी दिली आहे.
Dhananjay Deshmukh : आधी ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला असता तर ही घटना झाली नसती
समोर बलाढ्य यंत्रणा होती. त्यांचं प्रशासनावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न होता, हे वेळोवेळी सिद्ध झालं आहे. आधी ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला असता तर ही घटना झाली नसती. ती ॲट्रॉसिटी पुन्हा 12 तारखेला दाखल करण्यात आली. जगमित्र कार्यालयातून केज पोलीस स्टेशनला फोन आले होते. या प्रकरणात मोठ्या प्रमाणात बदल्या झाल्या, कमिटी नेमल्या गेल्या, एसआयटी स्थापन झाल्यानंतर आम्ही न्यायासाठी आशावादी झालो. न्यायाच्या प्रवासात उशीर होत आहे. आतापर्यंत या प्रकरणात दोषारोप पत्र दाखल करण्यात झालेले नाही. या आरोपींना फाशी भेटली पाहिजे, आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. आरोपींना फाशी झाल्यावर आम्ही समाधानी असू. त्यांना त्यांच्या कर्माचा फळ भेटणार आहे, अशी भावनाही धनंजय देशमुख यांनी बोलताना व्यक्त केली आहे.
Santosh Deshmukh Case Update : राजकीय आश्रय असल्याने न्यायासाठी प्रकरणाला उशीर होतोय
आमची काही चूक नसताना आमचा माणूस कायमचा हिरावला आहे, त्यांच्या कर्माची शिक्षा त्यांना भेटणार आहे. या प्रकरणात राजकीय आश्रय असल्याने प्रकरणात न्यायासाठी उशीर होत आहे. राजकीय हस्तांतरण असले तर या प्रकरणात वेळोवेळी सिद्ध झाला आहे. दोन नंबरच्या आरोपीच्या पक्षाचे लोकप्रतिनिधी केज आणि बीडच्या कोर्टात आढळून आल्याचे व्हिडिओ देखील आम्ही प्रशासनाला दिले आहेत. याच्यामागे पूर्ण राजकीय ताकद वापरली जात आहे, याचा गांभीर विचार केला गेला पाहिजे. असेही धनंजय देशमुख म्हणाले. याचा विचार मुख्यमंत्र्यांनी, उपमुख्यमंत्र्यांनी केला पाहिजे,
दरम्यान, या संदर्भात निवेदन अधिवेशनात दिले गेले पाहिजे. यांचा कायमचा बंदोबस्त कसा करता येईल, यावर त्यांनी बोललं पाहिजे. हायकोर्टात काही आरोपींकडून अर्ज केला गेलाय, त्याच्यावर आम्ही आमचे शपथपत्र दिले आहेत. त्याची तारीख 12 डिसेंबरला आहे त्यांच्यापासून आमच्या कुटुंबाला कसा धोका आहे हे आम्ही सांगितलं आहे. कृष्णा आंधळेच्या तपासाचा तीन महिन्याचा अहवाल न्यायालयाने एसआयटी आणि सीआयडीला मागितली आहे. अधिवेशनामध्ये फरार आरोपींना ज्यांनी आश्रय दिला त्यांनी गाड्या पुरवल्या. त्या लोकांना वेगळ्या कायद्याखाली अटक झाली पाहिजे आणि त्यांना शिक्षा झाली पाहिजेचे निवेदन होणे गरजेचे असल्याची माझी मागणी असणार आहे. असेही धनंजय देशमुख म्हणाले.
आणखी वाचा























