औरंगाबादेत कोरोनाबाधित रुग्णांसाठी हॉस्पिटल्सचे पॅकेज
खाजगी रुग्णालयांनी कोविड पॅकेज तयार केले आहेत. हे पॅकेज अगदी हॉलीडे पॅकेजप्रमाणे आहेत. औरंगाबादच्या प्रसिद्ध धूत हॉस्पिटल आणि वरकड हॉस्पिटलने असे पॅकेज जाहीर केले आहेत.
औरंगाबाद : आजवर आपण हॉलीडे पॅकेजबाबत ऐकलं असेल. त्याच धर्तीवर औरंगाबादेतील काही रुग्णालयांनी कोरोनावर घरीच राहून उपचार घेण्यासाठी काही पॅकेज जाहीर केले आहेत. राज्यातील कोरोनाचा वाढत प्रादुर्भाव, कोरोनाबाधितांची वाढती संख्या यातून काही रुग्णालयांनी ही पॅकेजची आयडिया समोर आणली आहे. लक्षण असलेल्या आणि आणि सौम्य लक्षणं असलेल्या रुग्णांसाठी हे पॅकेज असणार आहेत. औरंगाबाद शहरातील दोन रुग्णालयांनी तशी जाहिरात केली आहे.
गरज ही शोधाची जननी असते असं म्हटलं जातं. कोरोनाचा कहर वाढत आहे. लसीचा शोधही सुरु झाला आहे. पण अद्याप बाजारात लस आलेली नाही. इंडियन मेडिकल कौन्सिलने तर भारतात कम्युनिटी स्प्रेडिंग सुरु झाल्याचा अंदाज वर्तवला आहे. बाधितांची रोज वाढणारी संख्या बघून शंकेला वाव देखील आहे. हॉस्पिटल फुल्ल झालेत. रुग्णांवर उपचार करायला जागा कमी पडत आहेत. पण आता खाजगी रुग्णालयांनी कोविड पॅकेज तयार केले आहेत. हे पॅकेज अगदी हॉलीडे पॅकेजप्रमाणे आहेत. औरंगाबादच्या प्रसिद्ध धूत हॉस्पिटल आणि वरकड हॉस्पिटलने असे पॅकेज जाहीर केले आहेत.
धूत हॉस्पिटलचे पॅकेज
कोविड बाधित झालात आणि घरी राहून उपचार करायचे तर 10 दिवसांसाठी 6999 रुपयांचे पॅकेज आहे. या पॅकेजमध्ये औषधे डॉक्टर सांगतील. व्हिडीओ कॉल करतील आणि गरज वाटेल तेव्हा फोनद्वारे उपलब्ध होतील, अशी माहिती धूत रुग्णालयातील डॉक्टर हिमांशू गुप्ता यांनी दिली आहे.
वरकड हॉस्पिटलचे पॅकेज
या हॉस्पिटलमध्ये 31, 21, 13 आणि 10 हजार रुपयांचे पॅकेज उपलब्ध आहे. पॅकेजनुसार औषधे, मास्क, विविध तपासण्या करून मिळणार आहेत आणि डॉक्टर दररोज व्हिडीओ कॉलद्वारे बोलणार आहेत. शिवाय मानसोपचार तज्ज्ञ देखील फोनद्वारे समुपदेशन करणार आहेत.
औरंगाबादमध्ये दररोज सरासरी 300 नवे रुग्ण कोरोनाबाधित होत आहेत. शासकीय रुग्णालयातील खाटा आणि डॉक्टर यांच्यावर प्रचंड मोठा ताण आहे. त्यातूनच शासकीय रुग्णालयातील अस्वच्छता आणि जेवणाचा दर्जा याचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. त्यामुळेच बाधित रुग्ण हा कोविड पेक्षा या असुविधेला जास्त घाबरतोय. आता खाजगी रुग्णालयांनी लक्षणे नसलेल्या बाधितांवर घरीच उपचार केले तर त्याचा फायदा रुग्णांना नक्कीच होणार आहे आणि शासकीय यंत्रणेवरील ताणही पर्यायाने कमी होणार आहे. पण खाजगी रुग्णालयांचे जाहीर होत असलेले पॅकेज पहिले तर आपत्तीची इष्टापत्ती होतेय की काय असाही सूर आहे.