Job Vacancy Aurangabad: औरंगाबाद महानगरपालिकेत नोकरभरती होणार; सरकारकडे प्रस्ताव सादर
Job Vacancy Aurangabad: यामध्ये प्रामुख्याने अभियंते, सहाय्यक आयुक्त, लिपिक आणि अग्निशमन कर्मचारी या पदांचा समावेश आहे.

Job Vacancy Aurangabad: औरंगाबाद जिल्ह्यातील (Aurangabad District) बेरोजगार तरुणांसाठी आनंदाची बातमी असून औरंगाबाद महानगरपालिकेत (Aurangabad Municipal Corporation) मे महिन्यापूर्वी नोकरभरती (Job Vacancy) होणार आहे. त्यासाठी सुरुवातीला सव्वाशे पदे भरण्याची परवानगी मागणारा प्रस्ताव प्रशासनाने राज्य सरकारकडे सादर केला असल्याची बातमी 'पुढारी'ने दिली आहे. यामध्ये प्रामुख्याने अभियंते, सहाय्यक आयुक्त, लिपिक आणि अग्निशमन कर्मचारी या पदांचा समावेश आहे. त्यामुळे तरुणांना नोकरीची संधी मिळणार आहे.
महापालिकेतील अधिकारी,कर्मचारी संख्येचा नवीन आकृतिबंध गेल्या वर्षी राज्य सरकारने मंजूर केला. त्यानुसार महापालिकेतील मंजूर पदांची एकूण संख्या 5202 इतकी आहे. त्यांपैकी 2965 इतकेच कर्मचारी कार्यरत आहेत. तर एकूण 2237 पदे अजूनही रिक्त आहेत. त्यामुळे या रिक्त पदांवर गरजेनुसार भरती करण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे, परंतु गेल्या वर्षभरापासून याबाबत ठोस कारवाई झाली नव्हती. आता काही दिवसांपूर्वी राज्य सरकारनेच महापालिका प्रशासनाला पत्र पाठवून आवश्यकतेनुसार मे 2023 पूर्वी नोकरभरतीची प्रक्रिया पूर्ण करण्याची सूचना केली आहे.
मात्र, महापालिकेचा आस्थापना खर्च म्हणजेच कर्मचाऱ्यांचे वेतन आणि भत्ते यावरील खर्च हा एकूण उत्पन्नाच्या 40 टक्के इतका आहे. हा खर्च 35 टक्क्यांच्या आत असावा असा नियम आहे. तरच नोकर भरती करता येते. म्हणून आता महापालिकेने सर्व पदे भरण्याऐवजी काही पदेच भरण्याचे ठरविले आहे. त्यासाठी एक प्रस्ताव तयार करून शासनाकडे सादर केला आहे. आस्थापना खर्च मर्यादि- पेक्षा जास्त असला, तरी विशेष बाब म्हणून 125 पदे भरण्याबाबत परवानगी मिळावी अशी मागणी या प्रस्तावात करण्यात आली आहे, असे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे आता सरकार काय निर्णय घेणार हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.
महत्वाची पदे भरणार!
औरंगाबाद महानगरपालिका सुरवातीला महत्वाचीच काही पदे भरणार आहे. ज्यात वर्ग 1 ते 3 मधील निवडक पदेच भरण्याचे ठरविले आहे. यामध्ये कनिष्ठ अभियंता, सहाय्यक आयुक्त, मुख्य पशुसंवर्धन अधिकारी, लिपिक, अग्निशामक कर्मचारी यांसह इतर काही पदांचा समावेश असणार आहे. सर्व मिळून एकूण 125 अधिकारी, कर्मचारी भरण्याची परवानगी मागण्यात आली आहे. ही परवानगी मिळाल्यास त्यानंतर पुढील महिनाभरात भरती प्रक्रिया राबविली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे याचा मोठा फायदा बेरोजगार तरुणांना होणार असून, आता या भरतीकडे तरुणांचे लक्ष लागले आहेत.
आणखी वाचा:
Aurangabad News: औरंगाबाद शहरातील वर्दळीच्या शहागंज परिसरातील अतिक्रमणावर महापालिकेने फिरवला जेसीबी
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
