अपुऱ्या झोपेमुळे चिडचिड,थकवा जाणवतोय? योगगुरू सद्गुरूंनी सांगितल्या सकाळी फॉलो करण्याच्या या खास टीप्स
या छोट्या सवयी फॉलो केल्यात तर शरीराची एनर्जी वाढतेच, शिवाय भावनिक संतुलनही टिकून राहतं. सकारात्मक सुरुवात दिवसभर कामात, नातेसंबंधात आणि मनःस्थितीतही दिसून येते.

Morning Routine : आपण दिवसाची सुरुवात जशी करतो, तसाच आपल्या संपूर्ण दिवसाचा सूर ठरतो, हे अनेक तज्ज्ञ वेळोवेळी सांगत आले आहेत. झोप अपुरी झाली असेल तर दिवसभर थकवा, चिडचिड जाणवते. सकाळचा नाश्ता योग्य असेल तर दिवसभर आपल्याला Energetic वाटते; आणि सकाळचा योगा किंवा व्यायाम मेंदूला अधिक फोकस्ड ठेवतो. अशा छोट्या-छोट्या गोष्टी आपला दिवस हलका, आनंदी बनवतात.
याच संदर्भात सुप्रसिद्ध योगगुरू सद्गुरू जग्गी वासुदेव यांनी काही महत्त्वाच्या सवयींकडे लोकांचे लक्ष वेधले आहे. सद्गुरू नेहमीच आरोग्य, मनःशांती आणि दिनचर्येबद्दल उपयुक्त टिप्स सोशल मीडियावर शेअर करतात. पहाटेची काही साध्या सवयींमुळे शरीराच्या उर्जेवर थेट परिणाम होतो.
उजव्या कुशीवर उठणे का महत्त्वाचे?
सद्गुरूंनी एका अभ्यासाचा उल्लेख करत सांगितले की सकाळी उठताना नेहमी उजव्या कुशीवर वळून उठावे.योगपरंपरेतही अनेक आसने उजव्या बाजूने सुरू करण्याची शिफारस केली जाते. त्यामागील कारण असे की, शरीराचा डावा भाग स्वभावतः अधिक संवेदनशील व किंचित कमकुवत मानला जातो. त्यामुळे उठतानाचा भौतिक भार डाव्या बाजूवर पडू नये, अशी शारीरिक रचना आहे. उजव्या बाजूने उठल्याने शरीरावर ताण येत नाही, तसेच रक्ताभिसरण संतुलित राहते. या पद्धतीमुळे दिवसाची सुरुवात सौम्य, स्थिर आणि अधिक सकारात्मक होते.
उठल्या उठल्या धावपळ नको!
आपल्यातील बऱ्याच जणांची सकाळ धावपळीची आणि गडबडीची असते. पण यातच थोडं उशिरा उठलो की धावपळ सुरू होते. पण सद्गुरूंचे म्हणणे आहे की झोपेतून उठल्यानंतर काही सेकंद तरी शांत बसणे अत्यावश्यक आहे. उठताक्षणी मोबाईल पाहणे टाळावे; उलट हाताच्या तळव्यांना हलकेच एकमेकांवर घासून डोळ्यांवर ठेवावे. या छोट्या प्रक्रियेमुळे शरीराला हलका उबदार स्पर्श मिळतो, स्नायू रिलॅक्स होतात आणि मेंदू हळूहळू जागा होतो.
दोन-तीन मिनिटे बेडवर बसून सौम्य श्वसन-प्रक्रिया किंवा साधं मेडिटेशन केलं तरी दिवसभर मन स्थिर राहते. हा काही मोठा योग-उपक्रम नसून, सकाळी शरीर-मनाला दिलेला पहिला ‘शॉक’ आहे, जो संपूर्ण दिवस शांत, फोकस्ड आणि उत्साही बनवतो.
सकाळ बदलली की दिवस बदलतो
या छोट्या सवयी फॉलो केल्यात तर शरीराची एनर्जी वाढतेच, शिवाय भावनिक संतुलनही टिकून राहतं. सकारात्मक सुरुवात दिवसभर कामात, नातेसंबंधात आणि मनःस्थितीतही दिसून येते. सद्गुरूंचे म्हणणे अगदी साधे आहे. “सकाळ घाईत घालवू नका; सकाळी थोडा वेळ दिला, तर ती तुमच्यासाठी अख्खा दिवस सुंदर जाऊ शकतो.”
























