Shreya Ghoshal: 'कधी पैसे दिले जात नव्हते, तर कधी क्रेडिट...'; श्रेया घोषालकडून म्युझिक इंडस्ट्रीची पोलखोल, खुलासा करत म्हणाली...
श्रेयाच्या या वक्तव्यामुळे म्युझिक इंडस्ट्रीतील जुनी व्यवस्था आणि कलाकारांना मिळणाऱ्या हक्कांबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.

Shreya Ghoshal: बॉलिवूडमधील लोकप्रिय गायिका श्रेया घोषाल हिने नुकत्याच एका पॉडकास्टमध्ये म्युझिक इंडस्ट्रीबद्दल धक्कादायक खुलासे केले आहेत. आपल्या कारकिर्दीत ‘मनवा लागे’, ‘तेरी मेरी’, ‘बरसो रे’, ‘साथिया’, ‘मेरे ढोलना’, ‘हसी’, ‘चिकनी चमेली’ यांसारखी अनेक हिट गाणी देणाऱ्या श्रेयाने अलीकडेच दिलेल्या मुलाखतीत अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. की 2013 पूर्वी गायक-गायिकांसोबत खूप वेगळ्या प्रकारे वागणूक दिली जात होती. असं ती म्हणालीय.
श्रेया अलीकडेच उद्योजक राज शमानी यांच्या पॉडकास्टमध्ये सहभागी झाली होती. या वेळी तिला 2013 हे वर्ष तिच्या करिअरमधील कठीण काळ का होतं, असा प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना ती म्हणाली की त्या काळात सिंगर्सनी रॉयल्टीच्या हक्कासाठी आवाज उठवला आणि त्यामुळे संपूर्ण इंडस्ट्री दोन भागांत विभागली गेली. (Shreya Ghoshal on Music Industry)
काय म्हणाली श्रेया घोषाल?
श्रेया म्हणाली, “आपल्या म्युझिक इंडस्ट्रीमध्ये कोणतीही ठराविक नियमपुस्तिका नाही. त्यामुळे त्या काळात खूप वाईट परिस्थिती होती. सिंगर्सना कोणताही करार दिला जात नव्हता, पैसेही वेळेवर मिळत नव्हते आणि अनेकदा गाण्यांमध्ये त्यांना योग्य क्रेडिटही दिलं जात नव्हतं. त्या गाण्यावर आमचा कोणताही हक्क नसल्यासारखं वातावरण होतं.” तिने पुढे सांगितलं की, त्या काळात परफॉर्मर, गायक आणि संगीतकार यांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागलं. “कधी पैसे दिले जात नव्हते, तर कधी क्रेडिटही दिलं जात नव्हतं. गाणं झालं की तुम्हाला त्याच्याशी काही देणंघेणं नाही, असं सांगितलं जायचं,” असंही ती म्हणाली.
2013 नंतर परिस्थितीत बदल
श्रेया घोषालने सांगितलं की 2013 हे वर्ष सिंगर्ससाठी टर्निंग पॉइंट ठरलं. त्या वेळी कलाकारांनी आपल्या हक्कासाठी ठाम भूमिका घेतली आणि त्यानंतर इंडस्ट्रीमध्ये काही सकारात्मक बदल दिसू लागले. तिने असंही म्हटलं की फिल्मी पाठबळाशिवाय स्वतःचा मार्ग तयार करणाऱ्या कलाकारांबद्दल तिला खूप आदर आहे. कारण त्यांनी अनेक अडचणींचा सामना करत स्वतःचं स्थान निर्माण केलं आहे.दरम्यान, श्रेयाच्या या वक्तव्यामुळे म्युझिक इंडस्ट्रीतील जुनी व्यवस्था आणि कलाकारांना मिळणाऱ्या हक्कांबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.






















