'हे' नाटक बघून तुमची दातखिळी बसेल हे नक्की! वैभव मांगले अन् आनंद इंगळेची तुफान कॉमेडी; नाट्य रसिकांना मिळणार हास्याची ट्रीट
मराठी रंगभूमीवर नातेसंबंधांमधील कधी गोड, तर कधी बोचऱ्या वास्तवाला हलक्याफुलक्या विनोदांची जोड देत मांडणारी ही कलाकृती आहे

Ekda Pahava karun marathi Natak: मराठी नाट्यसृष्टीत सध्या विजय केंकरे दिग्दर्शित एक तुफान कॉमेडी नाटक प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. एकदा पहावं करून या रत्नाकर मतकरी लिखित नाटकाची सध्या एकच चर्चा आहे. रत्नाकर मतकरी यांच्या लेखणीतून जन्मलेलं हे नाटक नाट्य रसिकांना हास्याची ट्रीट देणारं ठरतंय. 6 डिसेंबर पासून या नाटकाचा शुभारंभ झाला असून सध्या त्याचे पुण्या मुंबईत शो गाजतायत. अनेक चाहते या नाटकाचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करताना दिसतायत.
‘एकदा पाहावं करून’ हे नव्याने रंगभूमीवर सादर होणारं नाटक प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. मराठी रंगभूमीवर नातेसंबंधांमधील कधी गोड, तर कधी बोचऱ्या वास्तवाला हलक्याफुलक्या विनोदांची जोड देत मांडणारी ही कलाकृती आहे. सुप्रसिद्ध लेखक रत्नाकर मतकरी यांच्या लेखणीतून उतरलेलं हे नाटक मानवी नात्यांचा वेगळ्याच पद्धतीने वेध घेतं.
हास्याची भन्नाट मालिका
या नाटकाच्या केंद्रस्थानी दोन पुरुष आहेत. स्वभाव, विचारधारा आणि जगाकडे पाहण्याची दृष्टी या सगळ्यांत ते एकमेकांच्या अगदी विरुद्ध आहेत. काही अनपेक्षित कारणांमुळे त्यांची भेट होते आणि याच भेटीतून गैरसमज, गोंधळ आणि हास्याची भन्नाट मालिका सुरू होते. प्रसंगोपप्रसंगातून उलगडत जाणारी ही कथा प्रेक्षकांना हसवतानाच विचार करायलाही लावते.
View this post on Instagram
या नाटकाचं खास वैशिष्ट्य सांगायचं झाल्यास अभिनय क्षेत्रातील अनुभवी तसेच तरुण कलाकार या नाटकात आहेत. अभिनेत्री भार्गवी चिरमुले, अभिषेक देशमुख, नेहा कुलकर्णी, गौरी महाजन, कृष्णा चतुर्भुज, नामांतर कांबळे, धनश्री दळवी, भूषण पाटील आणि आनंद इंगळे व वैभव मांगले अशा दमदार कलाकार या नाटकात प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहे.
काय आहे कथानक?
नाटकाची कथा दोन मध्यमवयीन पुरुषांभोवती फिरते. एक म्हणजे बेधडक, बिनधास्त स्वभावाचा, काळ्या पैशातून संपत्ती कमावणारा दक्षिण भारतीय बाप्पाजी धारसोड; तर दुसरा आहे बाबनराव बक्रे - स्वभावाने भित्रा पण स्वतःला नैतिक मूल्यांचा स्वयंघोषित रक्षक समजणारा वकील.
या दोघांची पूर्णपणे विरुद्ध असलेली जगं एकमेकांवर आदळतात तेव्हा गोंधळाची आणि विनोदाची मालिकाच सुरू होते. कारण बाबनराव बक्रेची मुलगी आणि बाप्पाजी धारसोडचा मुलगा एकमेकांच्या प्रेमात पडतात आणि कोणत्याही परिस्थितीत लग्न करण्याचा ठाम निर्णय घेतात. या प्रेमकथेभोवती घडणाऱ्या प्रसंगांतून हास्याचे फवारे उडतात, गमतीदार भेटीगाठी आणि प्रसंगांची रेलचेल सुरू होते. मात्र हसत-खेळत पुढे सरकणारी ही कथा शेवटी एक तीव्र वास्तव समोर आणते. माणसाला ‘साधू’ बनवते ती नेहमीच त्याची नैतिकता नसते, तर अनेकदा संधीचा अभाव असतो.






















