छावा बघून हंबरडा फोडणाऱ्या नथुरामी नटाला सावरकरांचे संभाजी महाराजांविषयीचे विचार मान्य आहेत का? किरण मानेंचा शरद पोंक्षेंवर हल्लाबोल
Kiran Mane: मराठी अभिनेते किरण माने यांनी केलेल्या पोस्टची सध्या चर्चा रंगली आहे.

Kiran Mane: छत्रपती शिवाजी महाराजांचे (Chhatrapati Shivaji Maharaj) पुत्र छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) यांच्या जीवनावर आधारित छावा चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळतोय. छावा चित्रपट प्रदर्शित होऊन 11 दिवस झाले असून आजही चित्रपटगृहात प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळतेय. अभिनेता विकी कौशलचा (Vicky Kaushal) ‘छावा’ सिनेमाने (Chhaava Movie) फक्त भारतात नाही तर, जगभरात नवे विक्रम रचले आहे. दिवसागणिक सिनेमाच्या कमाईच्या अकड्यात मोठी वाढ होत आहे. भारतात सिनेमाने 300 कोटींचा आकडा पार केल्याची माहिती समोर आली आहे. याचदरम्यान, मराठी अभिनेते किरण माने यांनी केलेल्या पोस्टची सध्या चर्चा रंगली आहे. किरण माने यांनी अभिनेते शरद पोंक्षे यांच्यावर निशाणा साधला आहे. छावा जो सच्चा आहे… प्रामाणिक आहे… विवेकी आहे… ज्ञानी आहे… शूर, न्यायी आणि जिगरबाज आहे… अशा माणसावर कितीही चिखलफेक करा… त्याची कितीही बदनामी करा… काळाच्या कसोटीवर त्याचं चारित्र्य अस्सल, शंभर नंबरी हिऱ्यासारखं लखलखून वर येतं आणि जगाचे डोळे दिपवतं, असं किरण माने म्हणाले.
किरण माने यांची पोस्ट जशीच्या तशी-
छावा जो सच्चा आहे… प्रामाणिक आहे… विवेकी आहे… ज्ञानी आहे… शूर, न्यायी आणि जिगरबाज आहे… अशा माणसावर कितीही चिखलफेक करा… त्याची कितीही बदनामी करा… काळाच्या कसोटीवर त्याचं चारित्र्य अस्सल, शंभर नंबरी हिऱ्यासारखं लखलखून वर येतं आणि जगाचे डोळे दिपवतं...
तुकोबाराया म्हणतात :
हिरा ठेवितां ऐरणीं । वांचे मारितां जो घणीं ।।
तोचि मोल पावे खरा । करणीचा होय चुरा ।।
...ऐरणीवर ठेऊन, त्यावर घणाचा घाव घातला तरी जो भंग पावत नाही - फुटत नाही तोच खरा 'हिरा' !
...घाव सोसूनही टिकणारा तोच मौल्यवान ठरतो. हिर्यासारख्या दिसणार्या काचेचा मात्र जागेवर चुरा होतो.
...हा अभंग आठवायचं कारण म्हणजे आज छत्रपती संभाजीराजेंसारखा शूरवीर, बदनामीच्या घणाचे घाव खाऊनसुद्धा अनमोल हिर्यासारखा तेजाने लखलखत उभा आहे, त्यांचं सत्त्व भंगलं नाही ! याउलट त्यांना बदनाम करू पहाणार्यांच्या एका दणक्यात फुटून ठिकर्या उडाल्या आहेत.
...'छावा'सारख्या सुंदर सिनेमाचा भक्तपिलावळीनं प्रोपोगंडा म्हणून वापर करण्याचा हैदोस घातला आहे. पण त्याचवेळी एक भन्नाट गोष्ट घडली. याच भक्तुल्ल्यांनी ज्यांना दैवतं वगैरे मानलेले आहे, ते लोक छ.संभाजी महाराजांविषयी काय बोलले आहेत, ते काही सजग विचारवंतांनी, वाचकांनी उघडकीला आणले... हल्ली सोशल मिडियाचा जमाना असल्यामुळं ते बघता-बघता समस्त बहुजनांपर्यंत पोहोचलं आणि पर्दाफाश झाला. एका फटक्यात हिरा कुठला आणि काच कुठली हे समोर आलं !
सगळ्यात पहिल्यांदा एका मराठी नटानं हंबरडा फोडला, "औरंग्यानं शंभूराजांचा किती छळ केलाय ते पहाण्यासाठी हा सिनेमा बघा रे"... औरंग्या तर नीच होताच… पण हाच नट ज्यांचे गुणगान गात व्याख्यानं देत फिरतो त्यांनी मात्र छ. संभाजीराजांच्या चारित्र्याचे वाभाडे काढलेले आहेत… हे कसे काय? या नथुरामी नटाला आराध्य असलेल्या थोर साहित्यिक आणि कवी सावरकरांनी ‘हिंदूपदपादशाही' या पुस्तकामध्ये संभाजीराजांची शिवरायांचा 'शूर पण नाकर्ता पुत्र' अशा शब्दांत बदनामी केलीय... याच पुस्तकात संभाजीराजांबद्दल ते पुढे म्हणतात, "एका श्रेष्ठ राष्ट्राची धुरा धारण करण्यास अगदी अयोग्य अशा माणसाच्या हातात मराठ्यांचे पुढारीपण गेल्यामुळे ह्यावेळी मोगलांच्या विरोधाचा कोणताही प्रयत्न करणे अधिकच अशक्य झाले होते. नेतृत्व चालविण्याच्या अयोग्यतेच्या जोडीला संभाजीमहाराजांमध्ये रागीट स्वभाव नि मदिरा आणि मदिराक्षी ह्यांच्याविषयी अत्यंत आसक्ती ह्या दुर्गुणांची भर पडली होती."… आता यावर त्या नथूरामी नटाचं काय म्हणणं आहे?
नालायक औरंग्यानं राजांच्या शरीराचे लचके तोडले हो… पण नंतर काही बुरसटलेल्या विचारधारेच्या गिधाडांनी राजांच्या अफाट शौर्य, धैर्य, विद्वत्ता आणि चारित्र्याच्या चिंध्या चिंध्या केल्या... आणि एक… परवा शिवजयंती दिवशी ज्येष्ठ समाजसेविका, आदर्श महिला राजकीय नेत्या चित्राताई वाघ आणि उच्चविद्याविभूषित सुजय विखे पाटील यांनी एका बारीक अंगकाठीच्या, लांब आणि अस्ताव्यस्त दाढी वाढलेल्या एका व्यक्तीचा फोटो टाकून शुभेच्छा दिल्यावत्या. ती व्यक्ती कोण? असा संभ्रम अख्ख्या महाराष्ट्राला पडला होता. मला खुप फोन आले की शिवजयंतीदिवशी या दोघांनी कुणाचा फोटो टाकलाय!? मग लोकांना कळालं की ’छावा’ पाहून ‘धर्मवीर धर्मवीर’ करत छाती बडवणाऱ्या भक्त पिलावळीचे एक ‘गुरुजी’ आहेत ते. सरसंघचालक गोळवलकर. तर हे गोळवलकरजी आपल्या 'Bunch of thoughts' या पुस्तकात लिहीतात - "Sambhaji was addicted to women and wine'... पुढे अजूनही बराच बदनामीकारक मजकूर आहे. नाटककार राम गणेश गडकरीने तर 'राजसंन्यास' नाटकात छ.संभाजीराजेंची अशीच भरपूर बदनामी केलेली आहे. म्हणूनच छ.संभाजी उद्यानातनं त्याचा पुतळा उखडून टाकला होता.
औरंग्या तर हरामी होताच पण आपल्यातही अनेक गद्दार अशा औरंग्याच्या अवलादी होत्या ज्यांनी शंभूराजांवर क्रूर घाव घातलेत… आता मला सांगा, हे जे 'छावा' बघुन रागाने डोळे लाल करताहेत... रडून ओरडून धिंगाणा घालताहेत... ते या बदनामीवर मुग गिळून का गप्प आहेत????? कितीही झाले तरी तो सिनेमा आहे, तथ्यांसहित मांडलेला ‘इतिहास’ नाही. पण पुस्तकात ओकलेली गरळ हा तर ढळढळीत कागदावर छापलेला पुरावा आहे !!! असो. पण या तिघांनाही देव मानणार्यांना आज बळेबळे का होईना छ. संभाजीराजांवर प्रेम दाखवावं लागतंय. भक्तुल्ल्यांच्या दैवतांनी पुस्तकांत लिहीलेल्या शंभूराजांच्या बदनामीच्या सुरळ्या करून त्यांच्या दैवतांच्या तोंडात घुसवाव्या लागत आहेत, हे ही नसे थोडके ! ज्ञानकोविंद, स्वराज्यरक्षक छ. संभाजी महाराज की जय...
संबंधित बातमी:
टॉप शंभर बातम्यांचा वेगवान आढावा, VIDEO:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

