इंद्रजाल'वरून वाद पेटला; प्रदर्शनाआधी गदारोळ होताच दिग्दर्शकांनीच सोडलं मौन, म्हणाले...
इंद्रजाल’ हा केवळ एक चित्रपट नसून, अनेक वर्षांच्या मेहनतीने, जिद्दीने आणि स्वप्नाने साकारलेला प्रयत्न असल्याचे दिग्दर्शकांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

Indrajaal Controversy: अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला आणि प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण करणारा ‘इंद्रजाल’ हा चित्रपट येत्या 24 जुलैपासून संपूर्ण महाराष्ट्रात चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. प्रदर्शनाच्या पार्श्वभूमीवर चित्रपटाचे दिग्दर्शक यांनी सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर करत प्रेक्षकांना चित्रपटाबाबत कोणतेही गैरसमज न ठेवता तो चित्रपटगृहात येऊन पाहण्याचे आवाहन केले आहे. सोशल मीडियावर पोस्टद्वारे एक व्हिडीओ शेअर करत त्यांनी, त्यांच्याबरोबर प्रिमिअरच्या दिवशी घडलेला प्रसंग सांगितला. एका अनोळखी व्यक्तीने त्यांच्याजवळ येत साधू संत आणि हिंदू धर्म यावर चुकीचा संदेश चित्रपटात दिल्याचं म्हटलं, यावर प्रतिक्रिया देणारा व्हिडिओ शेअर करत दिग्दर्शकाने आपली बाजू मांडली.
दिग्दर्शकाने मांडली भूमिका..
‘इंद्रजाल’ हा केवळ एक चित्रपट नसून, अनेक वर्षांच्या मेहनतीने, जिद्दीने आणि स्वप्नाने साकारलेला प्रयत्न असल्याचे दिग्दर्शकांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. या चित्रपटातून कोणत्याही साधू-संतांचा, धर्माचा किंवा श्रद्धेचा अपमान करण्याचा आमचा हेतू कधीच नव्हता आणि नाही, असे स्पष्ट करत त्यांनी प्रत्येक श्रद्धेचा आणि भावनेचा आदर करत असल्याचे सांगितले आहे. काही गैरसमजांमुळे चित्रपटाबाबत चुकीचा संदेश जाऊ नये, एवढीच आमची मनापासून इच्छा आहे, असेही दिग्दर्शकांनी नमूद केले आहे. कृपया चित्रपट प्रदर्शित होऊ द्या… तो पाहा आणि मग आपला निर्णय घ्या,” असे भावनिक आवाहन त्यांनी प्रेक्षकांना केले आहे.
‘इंद्रजाल’च्या संपूर्ण टीमने अनेक वर्षे घेतलेल्या मेहनतीला प्रेक्षकांच्या प्रेमाची आणि आशीर्वादाची गरज असल्याचे सांगत, 24 जुलैपासून चित्रपटगृहात प्रदर्शित होणाऱ्या ‘इंद्रजाल’ला प्रेक्षकांनी नक्की भेट द्यावी आणि आमच्या या स्वप्नाला आपला आशीर्वाद द्यावा’, असे आवाहन दिग्दर्शकांनी केले आहे.
कधी होणार सिनेमा प्रदर्शित?
'इंद्रजाल' या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि संकलन दिग्दर्शक जागेश्वर ललिता ढोबळे यांनी केले आहे. तर निर्मितीची धुरा निर्माती सुचेता अजय निकम यांनी पेलवली आहे. तर सहनिर्माते अजय शिवराम निकम आणि मंगेश शालीग्राम वैती आहेत. चित्रपटाचे लेखन लेखक नामदेव मुरकुटे यांनी केले आहे. तर संपूर्ण चित्रपट आकाश सेठी याने त्याच्या कॅमेऱ्यात कैद केला आहे. आता दिग्दर्शकांनी केलेल्या या भावनिक आवाहनानंतर ‘इंद्रजाल’ चित्रपटाबाबत प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली असून, 24 जुलैला चित्रपटगृहात प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षक या चित्रपटाला कसा प्रतिसाद देणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.






















