Armaan Kohli Struggle Life: वडील हिटची गॅरेंटी, पण मुलगा बनला 'फ्लॉपचा बादशाह'; सलमान खानची संधीही नाही वाचवू शकली करिअर, याची रिजेक्टेड फिल्म ठरली ब्लॉकबस्टर, ओळखलं का कोण?
Armaan Kohli Struggle Life: काही स्टारकीड्सच्या हाती यश आलं आणि त्यांनी अगदी आपल्या आई-वडिलांपेक्षाही जास्त नाव कमावलं. पण, काहींचा पत्ता इंडस्ट्रीत फारसा चालला नाही.

Armaan Kohli Struggle Life: बॉलिवूड (Bollywood News) आणि स्टारकिड हे काही आताचं समीकरण नाही. अगदी 80-90 च्या दशकापासून इंडस्ट्रीत आपला जम बसवलेल्या सेलिब्रिटींची मूलं स्टार बनण्यासाठी आली. काहींच्या हाती यश आलं आणि त्यांनी अगदी आपल्या आई-वडिलांपेक्षाही जास्त नाव कमावलं. पण, काहींचा पत्ता इंडस्ट्रीत फारसा चालला नाही. आई-वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत इंडस्ट्रीत आलेल्या स्टारकीड्समध्ये ऋषि कपूर (Rishi Kapoor), सनी देओल (Sunny Deol), बॉबी देओल (Bobby Deol), संजय दत्त (Sanjay Dutt) आणि अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) यांसारख्या स्टार्सच्या नावांचा समावेश आहे. अगदी इंडस्ट्रीतल्या दिग्गज कुटुंबातून आले तरीही प्रेक्षकांच्या मनात वेगळी ओळख निर्माण करणं तसं पाहिलं तर सोपं नसतं. काही कलाकार तर अनेक सिनेमांमध्ये काम करुनही हळूहळू इंडस्ट्रीतून काढता पाय घेतात. अशाच कलाकारांपैकी एक म्हणजे, अरमान कोहली (Armaan Kohli). 23 मार्च 1972 रोजी जन्मलेला अरमान कोहली सुद्धा एक स्टारकीड बरं का... प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक राजकुमार कोहली (Rajkumar Kohli) यांचे सुपुत्र. 70-80 च्या दशकात राजकुमार कोहली यांचं नावच सिनेमा हिट होण्याची हमी मानलं जात होतं. पण, मुलाचा पत्ता मात्र इंडस्ट्रीत फारसा चालला नाही.
अरमान कोहली (Armaan Kohli Struggle Life) यांना करिअरच्या सुरुवातीला ऑडिशन्सची धावपळ करावी लागली नाही. 'नागिन' आणि 'जानी दुश्मन' यासारख्या मल्टीस्टारर सिनेमांचे निर्माते म्हणून ओळखले जाणारे राजकुमार कोहली यांनी इंडस्ट्रीत आपलं वेगळं स्थान निर्माण केलेलं. तर अरमानची आई निशी कोहली या देखील त्यांच्या काळातील अत्यंत देखण्या आणि लोकप्रिय अभिनेत्री होत्या. हिंदी आणि पंजाबी सिनेमात त्यांनी आपली छाप सोडली होती.

अरमान कोहली यांचं बालपण सिनेसृष्टीच्या वातावरणात गेलं. कॅमेरे, लाईट्स आणि राज कपूर ते धर्मेंद्र यांसारखे सुपरस्टार्स त्यांच्या घरचा भागच होते. त्यामुळे त्यांना इंडस्ट्रीत प्रवेश मिळवण्यासाठी विशेष संघर्ष करावा लागला नाही. त्यांच्या वडिलांनीच त्यांच्यासाठी निर्माता, दिग्दर्शक आणि मार्गदर्शकाची भूमिका निभावली.
View this post on Instagram
अरमान कोहलींनी नाही म्हटलं अन् शाहरुख खानचं नशीब फळफळलं (Armaan Kohli vs Shah Rukh Khan)
1992 साली अरमान कोहली यांना दिव्या भारतीसोबत 'दीवाना' या सिनेमाची ऑफर मिळाली. त्यांनी शूटिंगलाही सुरुवात केली, मात्र सेटवरील त्यांच्या चिडचिड्या स्वभावामुळे आणि निर्मात्यांशी झालेल्या वादांमुळे त्यांना सिनेमातून बाहेर काढण्यात आलं. त्यांच्या जागी नव्या अभिनेत्याचा शोध सुरू झाला आणि शाहरुख खानची वर्णी लागली. हा सिनेमा प्रचंड गाजला आणि शाहरुख खान रातोंरात स्टार बनला. यानंतर प्रसिद्ध दिग्दर्शक जोडी अब्बास-मस्तान यांनी त्यांना 'बाजीगर' सिनेमात मुख्य भूमिकेची ऑफर दिली. पण, सुरुवातीलाच ग्रे शेड किंवा नकारात्मक भूमिका करायची नाही, असं सांगत अरमान यांनी ही ऑफर नाकारली. ही भूमिकाही पुन्हा शाहरुख खानकडे गेली आणि त्या सिनेमानंही इतिहास रचला. एकंदरीतच अरमान कोहली यांचं नाही म्हणणं, शाहरुख खानच्या करिअरसाठी अगदीच सकारात्मक ठरलं.

पुढे 1995 मध्ये आदित्य चोप्रा यांनी 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे' (DDLJ) मध्ये काजोलचं लग्न ज्याच्यासोबत ठरतं, त्या कुलजीतची भूमिका अरमान कोहली त्यांना ऑफर केली. मात्र, आपण फक्त लीड हिरोचीच भूमिका करतो, असं सांगत त्यांनी ही भूमिकाही नाकारली. नंतर ही भूमिका परमीत सेठी यांनी साकारली.
अरमान कोहली यांनी ज्या-ज्या सिनेमांना नकार दिला, ते सिनेमे पुढे बॉलिवूडचे ब्लॉकबस्टर ठरत होते. दुसरीकडे, त्यांच्या वडिलांनी त्यांना 'विरोधी' आणि 'औलाद के दुश्मन'सारख्या सिनेमांतून पुन्हा-पुन्हा लॉन्च केलं, मात्र हे सिनेमे बॉक्स ऑफिसवर जोरदार आपटले.

सलमान खाननं संधी दिली, पण तिथंही नशीबानं माती खाल्ली (Salman Khan Armaan Kohli)
1992 मध्ये 'विरोधी' सिनेमातून डेब्यू केल्यानंतर अरमान कोहली यांनी 'अनाम', 'कोहरा', 'जुआरी' यांसारखे अनेक सिनेमे केले, जे सुपरफ्लॉप ठरले. 1997 मध्ये त्यांच्या वडिलांनी सनी देओल आणि सुनील शेट्टी यांसारख्या बड्या सुपरस्टार्सचा आधार घेऊन 'कहर' सिनेमा बनवला. बॉक्स ऑफिसवर थोडीफार कमाई करुन या सिनेमानं नफा तर कमावला, पण हा सिनेमा सुपरहिट ठरू शकला नाही. 2015 मध्ये सलमान खानच्या सिफारशीवर त्यांना 'प्रेम रतन धन पायो' सिनेमात निगेटिव्ह रोल मिळाला. फिल्म सुपरहिट ठरली, पण त्यांचं नशीब मात्र फारसं फळफळलं नाही. दरम्यान, अरमान कोहली सध्या 'वी एनॉरटेन'चे सीईओ आहेत आणि लवकरच निर्मिती क्षेत्रात पाऊल ठेवणाचा विचार करत आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :





















