Anand Sagar Passed Away: बॉलिवूडवर शोककळा! 'रामायण’चे निर्माते रामानंद सागर यांच्या मुलाचे निधन; गेली 15 वर्षे ‘या’ आजाराशी झुंज
‘रामायण’ ही अशी मालिका आहे जी 39 वर्षांनंतरही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. ही मालिका घराघरात पोहोचवण्यात रामानंद सागर यांच्यासह त्यांच्या कुटुंबाचे मोठे योगदान होते.

Anand Ramanand Sagar Death: दूरदर्शनवरील ऐतिहासिक मालिका 'रामायण'चे निर्माते रामानंद सागर यांचे सुपुत्र आनंद रामानंद सागर चोप्रा ( Anand Ramanand Sagar) यांचे निधन झाले आहे. 13 फेब्रुवारी 2026 रोजी मुंबईत त्यांनी वयाच्या 84 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने चित्रपट आणि दूरदर्शन विश्वात शोककळा पसरली आहे. वडिलांच्या निधनानंतर त्यांनी सागर घराण्याची परंपरा समर्थपणे पुढे नेली होती.
मुंबईत पार पडले अंत्यसंस्कार
आनंद सागर यांचे निधन मुंबईत झाले. त्यानंतर त्यांच्यावर मुंबईतील परमहंस स्मशान घाट येथे सायंकाळी 4.30 वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या कुटुंबीयांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही दुःखद बातमी जाहीर केली. पोस्टमध्ये त्यांच्या छायाचित्रासह “आमचे प्रिय वडील आनंद रामानंद सागर चोप्रा यांच्या निधनाची दुःखद माहिती देत आहोत,” असे नमूद करण्यात आले.
View this post on Instagram
‘या’ आजाराशी होती झुंज
आनंद सागर गेल्या सुमारे 15 वर्षांपासून पार्किन्सनसारख्या गंभीर न्यूरोलॉजिकल आजाराशी झुंज देत होते. अखेर दीर्घ आजाराशी झुंज अपयशी ठरली. सागर कुटुंबाने निवेदन जारी करत म्हटले, “अत्यंत दुःखाने सागर परिवार प्रिय आनंद रामानंद सागर यांच्या निधनाची माहिती देत आहे. आज (13 फेब्रुवारी) त्यांचे निधन झाले. ते ‘सागर आर्ट्स’च्या दुसऱ्या पिढीच्या व्यवस्थापनाचा भाग होते. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो. ओम शांती.”
‘रामायण’मध्येही महत्त्वाचे योगदान
आनंद सागर यांनी वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांच्या कामात सक्रिय सहभाग घेतला होता. 1987 मध्ये प्रदर्शित झालेल्या रामायण मालिकेत त्यांनी सह-निर्माता म्हणून काम पाहिले. वडिलांच्या निधनानंतर त्यांनी पौराणिक आणि भक्तिपर प्रकल्पांच्या निर्मिती, सर्जनशील देखरेख आणि व्यवस्थापनाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली.
वडिलांची परंपरा अशी नेली पुढे
पाच भावंडांपैकी आनंद सागर यांनी सागर कुटुंबाची परंपरा जपण्याची जबाबदारी उचलली. अलिफ लैला, जय जय बजरंगबली आणि जय शिव शंकर यांसारख्या मालिकांची निर्मिती त्यांनी केली. तसेच ‘आंखें’ आणि ‘अरमान’सारख्या चित्रपटांच्या निर्मितीतही त्यांचा सहभाग होता. रामायण ही मालिका प्रत्येक भारतीयाच्या घरात पोहोचलेली मालिका होती. कोरोना लॉकडाउनदरम्यान कुटुंबासह रामायणचे पुनःप्रसारण करण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका होती. या पुनर्प्रसारणालाही प्रेक्षकांनी विक्रमी प्रतिसाद दिला होता.






















