Amol Kolhe Shared Me Savitribai Jyotirao Phule Emotional Video: 'मी सावित्रीबाई जोतिराव फुले' मालिका बंद होणार? चर्चांना उधाण; डॉ. अमोल कोल्हे यांचा सेटवरचा 'तो' व्हिडिओ व्हायरल
Amol Kolhe Shared Me Savitribai Jyotirao Phule Emotional Video: 'मी सावित्रीबाई ज्योतीराव फुले' ही मालिका बंद होणार असल्याच्या चर्चांना अधिक बळ मिळालं ते मालिकेचे निर्माते आणि प्रमुख भूमिका साकारणारे डॉ. अमोल कोल्हे यांचा सेटवरील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Amol Kolhe Shared Me Savitribai Jyotirao Phule Emotional Video: टीआरपीच्या (Marathi Serial TRP) स्पर्धेत टिकून राहण्यासाठी स्टार प्रवाहने (Star Pravah) अलीकडेच नव्या कोऱ्या 8 मालिकांची घोषणा केली आहे. नव्या मालिकांच्या सपाट्यात मात्र, डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) आणि अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर (Madhurani Prabhulkar) यांच्या प्रमुख भूमिका असलेली 'मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले ' (Mi Savitribai Jyotirao Phule) ही मालिका आता अवघ्या 152 भागांमध्येच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. ही मालिका सुरू होऊन पाचच महिने झालेत. त्यामुळे मालिका बंद होणार असल्याच्या चर्चांनी सध्या मराठी मनोरंजन विश्वात खळबळ उडाली आहे. या चर्चांना अधिक बळ मिळालं ते मालिकेचे निर्माते आणि प्रमुख भूमिका साकारणारे डॉ. अमोल कोल्हे यांचा सेटवरील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये डॉ. अमोल कोल्हे आपल्या कलाकार आणि तांत्रिक सहकाऱ्यांशी संवाद साधताना दिसत आहेत. मालिका कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करणार असल्याचा निर्धार व्यक्त करताना ते दिसून येतात. इतकंच नव्हे तर, मालिकेवर कोणताही आर्थिक ताण आला तरी स्पॉट बॉयपासून प्रमुख कलाकारांपर्यंत कोणाच्याही मानधनात कपात होऊ दिली जाणार नाही, अशी ग्वाहीदेखील त्यांनी दिली आहे. स्वतःच्या मानधनावर आणि निर्मितीशी संबंधित काही आर्थिक बाबींवर तडजोड करण्याची तयारीही त्यांनी या संवादात व्यक्त केली आहे. मात्र, या सगळ्या चर्चांच्या केंद्रस्थानी असलेला प्रश्न अद्याप कायम आहे, इतकी लोकप्रियता मिळालेली मालिका अचानक बंद करण्याची वेळ का आली?
View this post on Instagram
या मालिकेशी संबंधित काही लोकांकडून मिळालेल्या खात्रीलायक माहितीनुसार, सुरुवातीला मालिकेच्या टीआरपीचा मुद्दा पुढे करण्यात आला. मात्र याच ठिकाणी अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. कारण स्टार प्रवाह वरील आकडेवारीपेक्षा हॉटस्टारवर या मालिकेला मोठा प्रतिसाद मिळत होता. ओटीटी प्लॅटफॉर्मवर मालिकेचे भाग सातत्यानं पाहिले जात होते. सोशल मीडियावरही या मालिकेची चर्चा लक्षणीय होती. मालिकेतील प्रसंग, संवाद आणि ऐतिहासिक संदर्भ यांवर नियमितपणे चर्चा होत होती.
मालिका बंद होणार असल्याच्या बातम्या समोर आल्यानंतर सोशल मीडियावर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया अक्षरशः उसळल्या. अनेकांनी ही केवळ एका मालिकेची समाप्ती नसून महाराष्ट्राच्या सामाजिक आणि वैचारिक परंपरेसाठी धक्का असल्याची भावना व्यक्त केली. "सासू-सुनेचे वाद, कौटुंबिक संघर्ष आणि वादग्रस्त कथानकांवरील मालिका टिकतात; मग महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या विचारांवर आधारित मालिका का टिकू शकत नाही?", असा सवाल अनेक प्रेक्षकांनी उपस्थित केला आहे.
विशेष म्हणजे, मराठी मालिकांच्या इतिहासात एखादी मालिका बंद होऊ नये, म्हणून प्रेक्षकांनी इतक्या मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियावर आवाज उठवण्याची उदाहरणे तुलनेने कमीच आहेत. त्यामुळे या मालिकेबाबत प्रेक्षकांमध्ये असलेली लोकप्रियता हा मुद्दा देखील दुर्लक्षित करून चालणार नाही.
खात्रीलायक माहितीनुसार, टीआरपीचा मुद्दा पुढे आल्यानंतर मालिकेचे बजेट मोठ्या प्रमाणावर कमी करण्याचा प्रस्तावही समोर आला होता. निर्मिती खर्चात तब्बल ५० टक्के कपात करण्यास सांगण्यात आल्याची चर्चा आहे. अशा परिस्थितीत कलाकारांचे मानधन कमी करणे, काही व्यक्तिरेखा कमी करणे किंवा निर्मितीची व्याप्ती घटवणे अपरिहार्य ठरले असते. मात्र या भूमिकेला डॉ. अमोल कोल्हे यांनी विरोध दर्शवल्याचे सांगितले जाते. त्यांच्या व्हायरल व्हिडिओतही कोणत्याही कलाकाराचे मानधन एक रुपयानेही कमी न करता ही गोष्ट पूर्ण करणार असल्याचे ते बोलताना दिसत आहेत.
दरम्यान, मालिका सुरू असताना सोशल मीडियावर तिच्याविरोधात काही मोहिमा राबवल्या गेल्या. मालिकेतील काही प्रसंगांवरून टीका करण्यात आली, तर काहींनी जाणूनबुजून नकारात्मक वातावरण तयार केले. सामाजिक परिवर्तनाचा पाया रचणाऱ्या महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्यावर आधारित मालिकेला इतका विरोध का झाला, हा प्रश्न अनेकांच्या मनात उपस्थित होत आहे.
विशेष म्हणजे मालिका अशा टप्प्यावर येऊन पोहोचली आहे, जिथे महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या सामाजिक कार्याचा अत्यंत महत्त्वाचा अध्याय उलगडत आहे. मुलींसाठी शाळा सुरू करण्याचा आणि शिक्षणाचा हक्क समाजातील वंचित घटकांपर्यंत पोहोचवण्याचा ऐतिहासिक संघर्ष मालिकेत दाखवला जात असतानाच मालिका बंद होण्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे यामागे केवळ व्यावसायिक कारणे आहेत की राजकीय दबाव देखील आहे, याबाबत विविध स्तरांवर तर्कवितर्क लावले जात आहेत.
या सगळ्या घडामोडींमध्ये एक गोष्ट मात्र स्पष्टपणे समोर आली आहे. डॉ. अमोल कोल्हे यांच्यासाठी ही मालिका केवळ एक मनोरंजन प्रकल्प नाही. त्यांच्या शब्दांत सांगायचं झालं तर, हे एक ‘मिशन’ आहे. त्यामुळे ही कथा पूर्ण करण्यासाठी ते पर्यायी मार्गांचा विचार करतील का? मालिका पुढे एखाद्या वेगळ्या प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांच्या भेटीला येईल का? या प्रश्नांची उत्तरं येत्या काही दिवसांत मिळू शकतील.
सध्या मात्र ‘मी सावित्रीबाई जोतिराव फुले’ या मालिकेचं भवितव्य, डॉ. अमोल कोल्हे यांचा निर्धार आणि प्रेक्षकांची भावनिक प्रतिक्रिया यामुळे संपूर्ण मराठी मनोरंजन विश्वाचे लक्ष या घडामोडीकडे लागले आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
ABP माझाच्या बातम्या LIVE...






















