Snehal Tarde on Deool band 2: 'स्वामी समर्थांची परीक्षा घेणारी व्यक्ती..' देऊळ बंद 2 चे पोस्टर लॉन्च होताच अभिनेत्री स्नेहल तरडे म्हणाली..
Snehal Tarde on Deool Band 2: 2015 नंतर या चित्रपटाचा आणखी एक भाग यावा अशी इच्छा प्रेक्षक व्यक्त करत होते. त्यानंतर तब्बल 11 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर देऊळ बंद 2 ची घोषणा करण्यात आलीय.

Snehal Tarde Deool Band 2: देऊळ बंदला चित्रपटगृहात दमदार प्रतिसाद मिळाल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून देऊळ बंद 2 या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे. या चित्रपटाचे पोस्टरही नुकतेच प्रदर्शित करण्यात आले. पहिल्या भागात स्वामींनी परदेशातून आलेल्या शास्त्रज्ञाच्या आलिशान चारचाकीतून प्रवास केला होता तर 'देऊळ बंद 2'मध्ये स्वामी एका गरीब महिलेच्या सामान्य दुचाकीवरून प्रवास करताना दिसत आहेत. दरम्यान, निर्माता प्रवीण तरडेची पत्नी आणि अभिनेत्री स्नेहल तरडेची (Snehal Tarde) प्रतिक्रिया चर्चेत आलीय.
देऊळ बंद 2- आता परीक्षा देवाची'च्या पहिल्या पोस्टरमध्ये प्रसन्न मुद्रेनं हात उंचावत स्वामी दुचाकीवर मागे बसले असून अभिनेत्री स्नेहल तरडे ती दुचाकी चालवत आहेत. स्वामी जरी प्रसन्न मुद्रेत असले तरी स्नेहल यांच्या चेहऱ्यावर राग आहे आणि डोळ्यांतून अश्रू ओघळत आहेत, आता हा राग कशासाठी आणि दुःख कशाचे? यासाठी प्रेक्षकांना चित्रपटाची वाट पाहायला लागणार आहे. "भक्त कितीही संकटात असला तरी स्वामी त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे असतात...", हाच संदेश या पोस्टरमधून अधोरेखित होतोय.
काय म्हणाली अभिनेत्री स्नेहल तरडे?
स्नेहल म्हणाली, 'सद्गुरू स्वामी समर्थांची परीक्षा घेणारी व्यक्ती या जगात जन्माला आलेली नाही. हे धाडस एक मायमाउलीच करू शकते. स्वतःच्या मुलाबाळांसाठी, कुटुंबासाठी अहोरात्र झटते आहे, कष्ट करते आहे. आणि म्हणूनच गुरुमाउली स्वामी समर्थदेखील 'देऊळ बंद 2 आता परीक्षा देवाची' या सिनेमात हसत-हसत या मायमाउलीच्या परीक्षेला सामोरं जाणार आहेत. सिनेमात प्रेक्षकांना श्रद्धा आणि वास्तव यांचा एक वेगळाच संगम अनुभवायला मिळेल."
21 मे 2026 रोजी प्रदर्शित होणाऱ्या वटवृक्ष एंटरटेनमेंट निर्मित 'देऊळ बंद 2' ची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन अष्टपैलू कलाकार प्रविण विठ्ठल तरडे यांचं असून निर्मिती कैलाश वाणी, जयश्री कैलाश वाणी, कैवल्य वाणी आणि जुईली वाणी-सूर्यवंशी यांनी केली आहे. अध्यात्म आणि विज्ञान यांची सांगड घालणाऱ्या या चित्रपटाने, प्रेक्षकांच्या मनात एक आगळंवेगळं स्थान निर्माण केलं होतं. हा चित्रपट आजही लोक आवडीने पाहतात. 2015 नंतर या चित्रपटाचा आणखी एक भाग यावा अशी इच्छा प्रेक्षक व्यक्त करत होते. त्यानंतर तब्बल 11 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर देऊळ बंद 2 ची घोषणा करण्यात आलीय.





















