Kagal Nagar Palika: ऐन निवडणुकीत राजकीय भूकंप करणाऱ्या हसन मुश्रीफ- समरजित घाटगे आघाडीला कागल नगरपालिकेत किती जागा मिळाल्या? नगराध्यक्ष राज्यात सर्वाधिक मतांनी निवडून आल्याचा दावा!
Kagal Nagar Palika: निकाल लागल्यानंतर समरजित आणि हसन मुश्रीफ यांनी मतदारांचे आभार मानले. मुश्रीफ म्हणाले की लोकांना ही युती लोकांना किती पटेल अशी शंका आम्हाला होती.

Kagal Nagar Palika: कोल्हापूर जिल्ह्यातच नव्हे तर अवघ्या राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कागल नगरपालिका निवडणुकीमध्ये वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजिसिंह घाटगे यांनी एकहाती सत्ता मिळवली आहे. कागल नगरपालिकेमध्ये शिवसेना शिंदे गटाचा दारुण पराभव करत कागल नगरपरिषदेमधील 23 पैकी 23 जागा जिंकत व्हाईट वॉश दिला आहे. इतकेच नव्हे तर नगराध्यक्षपदी सविता प्रताप माने विजयी झाल्या. त्यामुळे एक प्रकारे कागलच्या दोन्ही नेत्यांच्या आघाडीवर मतदारांनी शिक्कामोर्तब केल्याची चर्चा आहे. मात्र, मुरगुड नगरपालिकेमध्ये दोघांच्या आघाडीला मोठा झटका बसला. या ठिकाणी शिवसेना शिंदे गटाने यश मिळवताना सत्ता खेचली आहे.
समरजित आणि मुश्रीफ यांनी मतदारांचे आभार मानले
दरम्यान निकाल लागल्यानंतर समरजित आणि हसन मुश्रीफ यांनी मतदारांचे आभार मानले. मुश्रीफ म्हणाले की लोकांना ही युती लोकांना किती पटेल अशी शंका आम्हाला होती. कार्यकर्त्यांशी चर्चा न करता आम्ही हा निर्णय घेतला होता. मात्र, आम्ही लोकांचे आभार मानतो, कारण त्यांनी या युतीवर त्यांनी विश्वास ठेवला आहे. ही युती सर्वच ठिकाणी कायम राहणार असल्याचे त्यांनी नमूद केले. आम्ही दोघे मिळून जिल्ह्यात एकत्र काम करून विजय मिळवणार असल्याचे त्यांनी सांगितले.
लोक केवळ पक्ष बघून मतदान करत नाही, तर काम बघून मतदान करतात असेही हसन मुश्रीफ म्हणाले. अनेकांना या आघाडीमुळे मानसिक धक्का बसला होता. मात्र आता निकाल समोर आल्याचे ते म्हणाले. मुरगुडमध्ये आम्हाला चांगली मते मिळाली असल्याचे ते म्हणाले. आम्ही कागलमध्ये एकत्र आलो त्यामुळे विरोधकांना किती मते मिळतात हे पाहत होतो असेही त्यांनी सांगितलं. दरम्यान मंडलिक यांनी केलेल्या टीकेवर त्यांनी भाष्य केले. ते म्हणाले की त्यांनी खालच्या पातळीवर जाऊन त्यांनी टीका केली. कार्यकर्ते नाराज झाले आहेत, भविष्यात त्यांना सोबत घेण्यात बाबत आम्ही चर्चा करू असे त्यांनी सांगितलं. समरजित सिंह घाटगे यांनी बोलताना सांगितले की, राज्यामध्ये सर्वाधिक मतांनी कागलचा नगराध्यक्ष निवडून आला आहे. त्यामुळे कागलच्या जनतेचे आभार मानतो. जनतेने आमची युती स्वीकारली आहे. मूरगुडमध्येही आम्हाला चांगली मतं मिळाली आहेत. संजय मंडलिक यांना सोबत घेण्याबाबत वरीष्ठ पातळीवर चर्चा होईल.
इतर महत्वाच्या बातम्या





















