Delhi Vidhan Sabha Election Result 2025 : भाजपने दिल्ली जिंकली, आता आम्ही मुंबईही जिंकू; एकनाथ शिंदे यांची 'माझा'ला एक्स्क्लुझिव्ह प्रतिक्रिया!
Delhi Vidhan Sabha Election Result 2025 : दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल आता स्पष्ट झाला आहे. या निवडणुकीत भाजपाने एकहाती सत्ता मिळवली आहे.

Delhi Vidhan Sabha Election Result 2025 : दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल समोर आला आहे. या निवडणुकीत भाजपाने दणदणीत विजय मिळवला आहे. विशेष म्हणजे याआधीच्या निवडणुकीत एकहाती सत्ता मिळवणाऱ्या आप पक्षाला यावेळी दिल्लीकरांनी चांगलाच ठेंगा दाखवला आहे. या विजयानंतर संपूर्ण देशभरात भाजपाकडून जल्लोष केला जातोय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीदेखील दिल्लीतील विजयानंतर तेथील भाजपाच्या नेत्यांचे अभिनंदन केले आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रात भाजपासोबत सत्तेत असलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनीदेखील दिल्लीच्या निवडणुकीवर प्रतिक्रिया दिलीय. त्यांनी दिल्लीच्या निकालावर बोलताना मुंबई महापालिकेची निवडणूक आम्हीच जिंकणार, असा विश्वास व्यक्त केलाय. ते 'एबीपी माझा'शी बोलत होते.
एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?
केजरीवालांचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. समाजसेवक अण्णा हजारे यांच्यामुळे ते मुख्यमंत्री झाले होते. पण मुख्यमंत्री झाल्यानंतर केजरीवाल अण्णा हजारेंना विसरले. त्यांच्या करणी आणि कथनीत फरक आहे.आता 'आप'दा टळली आहे आणि दिल्लीवरचं संकट दूर झालं आहे. काँग्रेस पक्षाला या निवडणुकीत भोपळा मिळाला. त्यांची भोवळ्याची हॅटट्रिक झाली, असे एकनाथ शिंदे म्हणाले.
लोकांना विकास हवा, योजना हव्या
तसेच, केंद्र सरकारने नुकतेच अर्थसंकल्प सादर केला.घरोघरी लक्ष्मीची पावलं उमटावी म्हणून केंद्राने अनेक योजना आणल्या. या निवडणुकीच्या माध्यमातून देश आर्थिक महासत्ता होईल यावर मतदारांनी विश्वास व्यक्त केला. इंडिया आघाडी जेव्हा जिंकते तेव्हा सगळं चांगलं. इंडिया आघाडीचा पराभव झाला की संस्था भ्रष्टाचारी आहेत, असा आरोप केला जातो. शिव्या देणं चालू होतं. लोकांना काम हवं आहे. कल्याणकारी योजना हव्या आहेत. लोकांना विकास हवा असतो, अशी टीकाही त्यांनी विरोधकांवर केली.
जनेतेने काँग्रेस, आपला झिडकारलं
पुढे त्यांनी, काँग्रेस पक्षावर तसेच इंडिया आघाडीवर टीकेचे आसूड ओढले. जनेतेने काँग्रेस, आपला झिडकारलं आहे. मी दिल्लीला अॅडव्हान्स शुभेच्छा द्यायला गेलो होतो. लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीने फेक नेरेटिव्ह पसरवलं. आम्ही मात्र विकासाने लोकांची मनं जिंकली, असं शिंदे म्हणाले.
मुंबईकरांना पुन्हा मुंबईत आणणार
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालावर बोलताना त्यांनी आगामी काळात होणाऱ्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीवरही भाष्य केलं. आम्ही महापालिकेची निवडणूक जिंकणारच आहोत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. "गेल्या अनेक वर्षांत मुंबईकरांच्या तिजोरीची सफाई करण्यात आली आहे. आता मात्र मुंबई बदलत आहे. मुंबई लुटणाऱ्यांना मुंबईकर जागा दाखवतील. आम्ही मुंबईकरांना पुन्हा मुंबईत आणणार आहोत. दिल्लीतील विजयाप्रमाणे विजयाची ही परंपरा कायम सुरु राहील. हे पत्रकार परिषद घेऊन शिव्याशाप देण्यासाठी एकत्र येतात. आम्ही कामासाठी एकत्र येतो, असेही एकनाथ शिंदे म्हणाले.
Eknath Shinde Video News :
हेही वाचा :





















