देवेंद्र फडणवीस म्हणाले, मी अदानींचा वकील नाही, पण...; राज ठाकरेंचा पुन्हा पलटवार, एकच उद्योगपती एवढा मोठा कसा?
गौतम अदानी यांनी स्वत:हून देशातील कुठलंही विमानतळ उभं केलेलं नाही. ज्या व्यवसायामध्ये गौतमी अदानी कधीही नव्हते, त्या सिमेंटच्या व्यवसायात 2 नंबरला अदानी गेले आहेत.

मुंबई : मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेतून पुन्हा एकदा उद्योगपती गौतम अदानी आणि केंद्रातील मोदी सरकारचं साठलोठं असल्याचं दाखवून दिलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शिवाजी पार्कवरील जाहीर सभेतून गौतमी अदानींवर (Adani) केलेल्या टीकेवरुन पलटवार केला होता. तसेच, गौतम अदानींसह देशातील अनेक उद्योगपतींचं सामाज्य वाढलं असून 25 कंपन्यांची यादीच त्यांनी वाचून दाखवली होती. तसेच, गौतमी अदानी यांना काँग्रेससह इतरही राज्यातील मुख्यमंत्र्यांनी प्रकल्प आणि उद्योगासाठी मदत केल्याचंही दाखवलं होतं. त्यावरुन, आता राज ठाकरेंनी (Raj Thackeray) पत्रकार परिषदेतून देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य केलं.
गौतम अदानी यांनी स्वत:हून देशातील कुठलंही विमानतळ उभं केलेलं नाही. ज्या व्यवसायामध्ये गौतमी अदानी कधीही नव्हते, त्या सिमेंटच्या व्यवसायात 2 नंबरला अदानी गेले आहेत. दुसऱ्याचे व्यवसाय खेचून हे वर गेलेले आहेत, हा विषय कोणाच्या ग्रोथचा नाही. मात्र, ही वाढ कशी होतेय हे प्रत्येक नागरिकाने समजून घेणं गरजेचं आहे, असे म्हणत राज ठाकरेंनी गौतम अदानींच्या विकासामागे मोदी सरकारचा मोठा हात असल्याचे म्हटले. एक उद्योगपती 10 वर्षात मोठा कसा होतो हा विषय आहे? टाटा, अंबानींनी स्वत: सगळे उद्योग उभे केले आहेत. त्यामुळे, हे असंच सुरू राहिल्यास एक दिवस हा देश ठप्प होईल, हे सांगण्याचा माझा उद्देश होता, असेही राज ठाकरेंनी म्हटले. दरम्यान, राज ठाकरेंनी आपली भूमिका मांडून देवेंद्र फडणवीसांच्या मुंबईतील भाषणावर पलटवार केला.
मुंबईतील सभेतून देवेंद्र फडणवीस काय म्हणाले
राज ठाकरे सांगतात की, 2014 नंतर पंतप्रधान मोदी यांच्यामुळे अदानींची नेटवर्थ वाढली. मी काही अदानींचा वकील नाही. पण एक गोष्ट ध्यानात घेतली पाहिजे की, 2014 साली भारत हा जगातील 11व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होता. आता 2026 साल उजाडेपर्यंत भारत हा जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे. साहजिकच अर्थव्यवस्था वाढल्यानंतर देशभरात अनेक नवे उद्योजक तयार झाले. पंतप्रधान मोदी यांच्यामुळे ज्या कंपन्या यापूर्वी भांडवली बाजारात सूचिबद्ध (लिस्टेड) होऊ शकल्या नव्हत्या, त्या सूचिबद्ध झाल्या. देशातील प्रस्थापित उद्योगसमूहांनी प्रचंड विस्तार केला. या प्रत्येकाचे उत्पन्न आणि नफा प्रचंड वाढला, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला.
इतरही कंपन्यांचा नफा आणि गुंतवणूक वाढली - फडणवीस
2014 नंतर टाटा समूहाचे उत्पन्न 664, एचडीएफसी बँकेचे उत्पन्न 377 टक्के, अदानी समूह 686 टक्के, इन्फोसिस 280 टक्के, आदित्य बिर्ला ग्रूप 566 टक्के, भाती ग्रूप 266 टक्के, सन फार्मा 1552 टक्के, हिंदूजा ग्रूप 376 टक्के आणि एव्हेन्यू समूहाचे उत्पन्न 1166 टक्क्यांनी वाढले. सन फार्मा आणि एव्हेन्यू समूह या दोन्ही कंपन्या मुंबईच्या आहेत, याचा आपल्याला अभिमान असला पाहिजे, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
हेही वाचा
राज ठाकरेंनी ठाण्यातून भाजपच्या गणेश नाईकांचं केलं कौतुक; म्हणाले, मला बरं वाटलं...




















