![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Mumbai Crime News : भिवंडीत वीटभट्टीवरील 22 वेठबिगार मजुरांची सुटका; पोलिसांत गुन्हा दाखल
Mumbai Crime News : शासकीय अधिकारी आणि पोलिस पथकाने भिवंडी तालुक्यातील मैंदे गावातील वीटभट्टीवर छापा मारून 12 कुटुंबातील 22 वेठबिगार कामगारांची सुटका केली आहे.
![Mumbai Crime News : भिवंडीत वीटभट्टीवरील 22 वेठबिगार मजुरांची सुटका; पोलिसांत गुन्हा दाखल Mumbai Crime News Rescue of 22 Brick Kiln forced labour in Bhiwandi case has been filed police marathi news Mumbai Crime News : भिवंडीत वीटभट्टीवरील 22 वेठबिगार मजुरांची सुटका; पोलिसांत गुन्हा दाखल](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/07/354ccc660f7ff4abe55e29030682a6881704626865536737_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Mumbai Crime News : भिवंडी तालुक्यातील असंख्य वीटभट्टी (Brick Kiln) मालकांकडून तालुक्यासह ठाणे (Thane) व पालघर (Palghar) जिल्ह्यातील आदिवासी वीटभट्टी मजुरांची पिळवणूक करून त्यांना वेठबिगारी म्हणून राबवण्यात येत असल्याचे प्रकार वाढले आहे. दरम्यान, याबाबत तक्रारी वाढल्याने श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांनी शासकीय अधिकारी आणि पोलिस यांच्या सोबतीने भिवंडी तालुक्यातील मैंदे गावातील वीटभट्टी वर छापा मारून 12 कुटुंबातील 22 वेठबिगार कामगारांची सुटका केली आहे.
तालुक्यातील मैंदे गावातील शेंदे पाडा येथे खांडपे येथील शशिकांत पाटील यांचा वीटभट्टी व्यवसाय आहे. त्यांच्याकडे मागील कित्येक वर्षांपासून मजूर म्हणून 12 आदिवासी कुटुंब विट बनविण्याचे काम करतात. तर, अगाऊ रक्कम घेऊन कम करीत असताना, मालक शशिकांत पाटील यांनी कामगारांना त्यांच्याकडे असलेले पैसे फिटत नाहीत तोपर्यंत दुसऱ्या कोणाकडे काम करण्यास मनाई करीत धमकावत मारहाण केली होती. या बाबतच्या तक्रारी समजल्यावर विवेक पंडित यांनी भिवंडी तहसीलदार कार्यालयातील नायब तहसीलदार अधिक पाटील, पडघा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रदीप गीते यांच्यासह वीटभट्टीवर सकाळी सह वाजता छापा मारला.
एकूण 43 जणांची सुटका...
पोलिसांचे पथक वीट भट्टीवर पोहचल्यावर आदिवासी मजुरांनी आपल्यावरील अन्यायाची कहाणी सांगितली. त्यामुळे या 12 कुटुंबातील एकूण 43 जणांना तेथून मुक्त करीत त्यांच्या बिऱ्हाडासह पथकाने पोलिस ठाणे गाठले. तेथे राजेश मुकणे यांनी दिलेल्या तक्रारी वरून पोलिसांनी वीटभट्टी मालक शशिकांत पाटील यांच्या विरोधात वेठबिगारी मुक्ती कायद्यास अट्रोसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.
गावातच रोजगार उपलब्ध करून देण्याची गरज
देशाला स्वतंत्र मिळून 75 वर्षे झाली तरी देशातील आदिवासी समाज आज ही अनेक सुविधांपासून वंचित आहेत. अनेकांकडे आधारकार्ड, रेशनकार्ड नाही, स्वतःच घरकुल नाही. त्यामुळे वेठबिगार मुक्त करून भागणार नाही, तर त्यांना त्यांच्याच गावात रोजगार उपलब्ध करून देण्याची गरज आहे अशी प्रतिक्रिया श्रमजीवी संघटनेचे प्रवक्ता प्रमोद पवार यांनी दिली आहे.
यांची सुटका करण्यात आली...
भारती साईनाथ जाधव, साईनाथ आश्रम जाधव (दोन्ही रा. भावरपाडा ता.विक्रमगड), संगीत संदिप पवार संदिप काळुराम पवार (दोन्ही रा. कानविंदे ता. शहापुर), अनिल शांताराम जाधव, अनिता अनिल जाधव दोन्ही (रा. बिळघर ता. वाडा), सुनिल दशरथ मुकणे सुनिता सुनिल मुकणे (दोन्ही रा. जाळे ता. वाडा), गणपत विठ्ठल पवार, अनिता गणपत पवार (दोन्ही रा. नालासोपारा ता. वसई), संगीता चंद्रकांत वाघ, चंद्रकांत सुदाम वाघ (दोन्ही रा.माण ता.विक्रमगड), विवेक रघुनाथ हिलोन, सविना विवेक हिलोम (दोन्ही रा.विक्रमगड), अरुण लक्ष्मण सवर, पुष्पा अरून सवर (दोन्हीं रा. माण ता. विक्रमगड), आदर्श विवेक हिलम अस्मीता आगर्श हिलम (रा.बिलघर ता. वाडा), सारीका मनसुराम वाघ, मनसुराम विक्रम वाघ (रा. जव्हार), मिरा दशरत मुकणे,दिनेश प्रविण जाधव (रा.विक्रमगड जि. पालघर) या 22 जणांना बंधमुक्त करीत यांच्या कुटुंबातील एकूण 43 जणांची सुटका केली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)