Jalgaon Crime : केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीच्या छेडछाडीनंतर जळगाव पुन्हा हादरले; टवाळखोरांच्या छेडछाडीला कंटाळून 15 वर्षीय मुलीचं धक्कादायक कृत्य
Jalgaon Crime : केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीच्या छेडछाडीनंतरही जळगावमध्ये छेडछाडीचे प्रकार सुरुच असल्याचे पाहायला मिळत आहे.

Jalgaon Crime : केंद्रीय मंत्री रक्षा खडसे (Raksha Khadse) यांच्या मुलीसह काही मुलींची मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी गावातील संत मुक्ताई यात्रेमध्ये टवाळखोरांनी छेडछाड केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला होता. या प्रकारानंतरही जळगाव जिल्ह्यात मुलींच्या छेडछडीच्या घटना सुरूच असल्याचे पाहायला मिळत आहे. टवाळखोरांच्या छेडछाडीला कंटाळून 15 वर्षीय अल्पवयीन मुलीने विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केलाय.
धरणगाव तालुक्यातील एका गावात टवाळखोरांनी अल्पवयीन मुलीच्या घरात घुसून मुलीची आणि तिच्या बहिणीची छेडखानी करत मारहाण केल्याचा आरोप मुलीने केला आहे. टवाळखोरांच्या छेडछाडीला कंटाळून 15 वर्षीय अल्पवयीन मुलीने विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला असून जिल्हा रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणामुळे जळगावात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलीला टवाळखोर शाळेत जाताना, शेतात जाताना पाठलाग करून वारंवार त्रास देत होते. अल्पवयीन मुलीने टवाळखोरांना विरोध केल्याने टवाळ खोरांनी थेट मुलीच्या घरात घुसून पीडित मुलीची व बहिणीची छेडखानी करत बहिणीला मारहाण केल्याचा आरोप पीडित मुलीसह तिच्या पित्याने पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या समोर केला आहे.
पालकमंत्र्यांसमोर सांगितली आपबिती
छेडछाडीच्या या प्रकरणात पोलिस आता काय कारवाई करतात? याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे. घटनेची माहिती मिळताच पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पीडित मुलीशी भेट घेऊन तिच्या प्रकृतीची चौकशी करून धीर दिला आहे. पीडित मुलीच्या बहिणीने व पालकांनी पालकमंत्र्यांसमोर आपबीती कथन करत टवाळखोरांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
रक्षा खडसेंच्या मुलीची छेडछाड, आरोपी पोलिसांना सापडेना
दरम्यान, मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीसह तिच्या मैत्रिणींची छेड काढल्याप्रकरणी पोलिसांनी सात जणांचा विरोधात गुन्हा दाखल केला होता, यातील तीन जणांना अटक तर एक अल्पवयीन ताब्यात घेत त्याची बाल सुधारगृहात रवानगी केली होती. एकीकडे असे चित्र असताना दुसरीकडे मात्र पीयूष मोरे, चेतन भोई आणि सचिन पालवे हे तिघे जण पोलिसांनी शोध घेऊनही सापडू शकले नसल्याने राजकीय क्षेत्रात चर्चेचा विषय बनले आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

