कोरोनाचे उपचार घेऊन अनेक रुग्ण घरी बरे होऊन जात आहेत. मात्र, त्यापैकी काहीजण कोरोनामुक्त झाले असले तरी आजारमुक्त नसल्याचे रुग्ण सध्या राज्यात उपचार घेताना आढळून येत आहे. तर काही रुग्ण कोरोनाबाधित रुग्णांची चाचणी निगेटिव्ह येऊनही अन्य व्याधींमुळे बराच काळ त्यांना रुग्णालयातच राहावे लागत आहे. अनेक कोरोनामुक्त नागरिकांना घरी गेल्यानंतरही त्यांना अस्वस्थ वाटत असून सांधेदुखी, स्नायूदुखी, थकवा येणे, या आणि अशा बऱ्याच तक्रारी घेऊन डॉक्टरांकडे जात आहे. त्यांची रुग्णसंख्या किती आहे? याची निश्चित आकडेवारी सध्या उपलब्ध नसली तरी याकरिता बऱ्याच विशेष शासकीय आणि महापालिकेच्या रुग्णलयात पोस्ट-कोविड (कोरोना मुक्त रुग्णांकरिता) ओपीडी सुरु करण्यात आली आहे. कोरोनाबाधित रुग्णांकरिता ही नवीन डोकेदुखी झाली आहे. त्यामुळे कोरोना मुक्त रुग्णांना ज्यांना काही त्रास होत नाही. त्यांनी आपल्या सुरक्षिततेची कायम काळजी घेतली पाहिजे, असे वैद्यकीय तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे.



या पेक्षा विशेष म्हणजे काही रुग्णांना ज्यांना फक्त कृत्रिम ऑक्सिजनची गरज आहे, अशा रुग्णांना डॉक्टरांनी घरी गेल्यानंतर ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीनचा वापर किंवा ऑक्सिजन सिलेंडरचा वापर करण्यास सांगितले आहे. हे रुग्ण घरी आल्यावर स्वतः ऑक्सिजनचा वापर करताना दिसत आहे. ऑक्सिजनची पातळी जोपर्यंत नियमित होत नाही तो पर्यंत अशा रुग्णांना ह्या पर्यायांवर अवलंबून राहावे लागत आहे. काही महिन्यात या गोष्टीचा वापर केल्यानंतर रुग्ण हळूहळू बरे होत आहे. त्यामुळे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन घेण्यापेक्षा भाड्याने घेण्याकडे रुग्णांच्या नातेवाईकांचा कल असतो. तर काहीजण थेट सिलेंडर घरी आणून त्याचा वापर करीत आहे. या अशा परिस्थतीत रुग्णांना घरी जाऊन व्यवस्थित काळजी घ्यावी लागत असून ते फोन वरून डॉक्टरांच्या संपर्कांत राहत आहे.


कोरोनामुक्त झाल्यानंतर ज्या काही व्याधी निर्माण होतात त्यात साधारणपणे डोकेदुखी, खोकला येणे, स्नायुदुखी, थोड्या वेळ चालल्यावर धाप लागणे, फुफ्फुस हृदय, किडनीशी संबंधित तक्रारी निर्माण होणे या सर्व साधारण तक्रारी पाहावयास मिळत आहे. कोरोनातून बरे झाल्यानंतर सुद्धा जर काही आजर असतील तर तात्काळ डॉक्टरांना दाखविणे गरजेचे आहे अनेक रुग्ण त्यातूनही बरे होऊन आनंदाने आयुष्य जगत आहे. प्रत्येक कोरोनाबाधित व्यक्तीला कोरोनाचा आजार बरा झाल्यानंतर दुसरा आजार होईलच असेही नाही.


परळ येथील ग्लोबल रुग्णालयाचे श्वसनविकार तज्ञ डॉ. समीर गर्दे सांगतात की, "आपण येथे एक लक्षात घ्यायला हवे आहे कि कोणत्याही विषाणूचा संसर्ग झाल्यानंतर रुग्णांना दोन ते तीन आठवडे थकवा राहतोच. त्यामध्ये सुद्धा या कोरोना काळात ज्या पद्धतीने अतिप्रमाणात रेमेडिसिवीर औषधाचा वापर केला गेला आहे, ते एक कारण असण्याची शक्यता नाकारता येत नाही. अनेक रुग्णांना गरज नसतानाही रेमेडिसिवीरची औषधे दिली गेली आहेत. ज्या रुग्णांना खरंच गरज आहे ज्यांना सारीची लक्षणे (श्वासोच्छवासाच्या त्रासासह खोकला, ताप दिसून येते) आहेत अशा रुग्णांना खरे तर हे औषध देणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे अनेकवेळा रुग्ण कोरोनाने बरे होतात मात्र काही रुग्णांना फुफ्फुसाच्या व्याधीचा (लंग फायब्रोसिस ) त्रास जाणवत असल्याने पुन्हा आमच्याकडे येत असल्याचे रुग्ण सध्या मी पाहत आहे. परंतु त्याच्यावर काही उत्तम औषधे आहेत त्या घेतल्यानंतर रुग्ण तीन ते चार आठवड्यात बरे होत आहे. मात्र थकवा वैगरे हा काही जो प्रकार हा औषधांमुळे आलेला थकवा आहे. त्या रुग्णांनी बरे झाल्यावर घरी जाऊन काही दिवस विश्रांती घेणे अपेक्षित आहे."


25 ऑगस्टला 'कोरोनाची लागण 'पुन्हा' होऊ शकते?' या शीर्षकाखाली सविस्तर लिखाण करण्यात आले होते, त्यामध्ये, मला कोरोना होऊन गेलाय, आता या आजाराविरुद्ध लढणाऱ्या रोगप्रतिकारक शक्ती पेशी (अँटीबॉडीज) शरीरात निर्माण झाल्या आहेतय आता आपल्याला काही पुन्हा कोरोना होणार नाही. या भ्रमात असाल तर सावधान, मुंबईमध्ये काही कोरोनामुक्त व्यक्तींना पुन्हा कोरोना झाल्याचं दिसलं आहे, मात्र त्यांची संख्या अजून तरी हाताच्या बोटावर मोजण्या इतकीच आहे. त्यामुळे कोरोनामुक्त व्यक्तींनीही शासनाने आखून दिलेले सुरक्षिततेचे सर्व नियम पाळून आपला वावर ठेवला पाहिजे. विशेष म्हणजे हाँगकाँग येथे एका कोरोना झालेल्या व्यक्तीला जो पूर्ण बरा होऊन घरी गेला आहे त्याला पुन्हा कोरोना झाल्याचे आढळून आले आहे. महत्वाचे, त्या व्यक्तीच्या आधीच्या कोरोनाचा विषाणू (व्हायरस) आणि आता ज्यामुळे आता कोरोना झाला आहे त्या विषाणू मध्ये फरक आढळून आला आहे. त्यामुळे तेथील शास्त्रज्ञांनी या व्यक्तीला कोरोनाचा पुनर्संसर्ग (रीइन्फेक्शन) झाल्यावर शिक्कामोर्तब केले आहे.मात्र मुंबईत ज्या रुग्णांना पुन्हा कोरोना झाला आहे त्या व्यक्तींचे नमुने तपासणी करीता पुणे येथील प्रयोग शाळेत पाठविण्यात आले आहे. त्या तपासणीचे अहवाल आल्यानंतरच कोरोनाची लागण पुन्हा होते का ? किंवा आणखी काही वेगळे निदान होते यासाठी आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे.


याप्रकरणी पुणे येथील के इ एम रुग्णालयाचे श्वसनविकार तज्ञ, डॉ. स्वप्नील कुलकर्णी सांगतात कि, "हा मुद्दा खरा आहे कि कोरोना मुक्त झाल्यानंतरही काही रुग्णांना काही ना काही व्याधीमुळे पुन्हा डॉक्टरांकडे यावे लागत आहे आणि आम्ही असे रुग्ण बघतोय त्याच्यामध्ये प्रामुख्याने फुफ्फुसामध्ये दाह होत असल्याच्या, थकवा येत असल्याच्या तक्रारी घेऊन येथे रुग्ण येतात. थकवा हा असा प्रकार आहे कि तो आजार बरा झाल्यानंतर काही दिवस राहतोच, शरिराची झीज भरून निघण्यासाठी काही कालावधी लागतोच कालांतराने रुग्णांच्या या तक्रारी दूर होतात. मात्र, फुफ्फुसामध्ये दाह असेल तर त्यावर आम्ही वैद्यकीय उपचार करतो. काही रुग्णांना कृत्रिम ऑक्सिजनची गरज आहे अशा रुग्णांना घरी गेल्यानंतर ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीनचा वापर किंवा ऑक्सिजन सिलेंडरचा वापर करण्यास सांगतो. ह्या रुग्णांची ऑक्सिजनची पातळी नियमित होईपर्यंत ते या उपकरणांच्या आधारे कृत्रिम ऑक्सिजन घेतात. घराच्या घरी हे उपचार घेणे सोपे आहे, मात्र डॉक्टरांच्या सल्ल्यानेच हे उपचार करावेत. त्यानंतर फिजिओथेरापी घेऊन असे रुग्ण बरे होतात. काही रुग्णांना कोरोना सारख्या आजारावून बरे झाल्यावर मानसिक समुपदेशनाची गरज भासते."


सध्या जर कोरोनाच्या बाबतीत वेळेत उपचार घेतले तर बहुतांश रुग्ण उपचार घेऊन बरे होऊन घरी जातात, अनेकांना तर कृत्रिम ऑक्सिजनची गरज भासत नाही. काही रुग्णांचा प्रवास मात्र कृत्रिम ऑक्सिजन मास्कपासून ते व्हेंटिलेटरपर्यंत असतो. डॉक्टरांना ह्या आजारावरची औषधउपचार पद्धती कळली आहे. त्यामुळे जो कुणी वेळेत उपचार घेण्यासाठी येतो तो रुग्णबरा होऊन घरीही जातो. मात्र, उशी येणाऱ्या रुग्णांच्या बाबतीत उपचार देताना मग डॉक्टरांना विविध प्रगत औषधांचा वापर करावा लागतो. त्यामुळे लक्षणे दिसताच डॉक्टरांकडे जाणे हे सगळ्यांनीच येथे लक्षात घ्यायला पाहिजे.


संतोष आंधळे यांचे आणखी काही महत्वाचे ब्लॉग