कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करताना हजारोंच्या संख्येने डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी या संसर्गजन्य आजाराने बाधित झाले, शेकडो डॉक्टरांचा यामध्ये मृत्यू झाला. या सर्व प्रकारची जुजबी माहिती सामान्य जनतेला तर आहेच, त्याशिवाय त्याचा संपूर्ण तपशील डॉक्टरांच्या संघटनेला आहे. पण ह्या देशाची आरोग्य व्यवस्था राबिणाऱ्या तिचं नेतृत्व करणाऱ्या केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाकडे मात्र याबाबतची माहिती नसावी याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. डॉक्टरांना योद्धे म्हणा किंवा म्हणू नका, त्यांना त्यांच्या मृत्यू पश्चात कोणता दर्जा द्या अगर देऊ नका. डॉक्टर मंडळी त्यांचं काम नेटाने करत आहे आणि करत राहतील. त्यांना त्यांच्या कामा प्रती असणारी श्रद्धा दाखवून देते की या कोरोना काळातही कर्तव्य बजावताना 'धोका' आहे माहित असूनही रोज पीपीई किट परिधान करून रुग्णसेवेस ते सज्ज आहेत. येत्या काळात भविष्यात जेव्हा केव्हा कोरोनाचा इतिहास लिहिला जाईल त्यामध्ये डॉक्टरआणि आरोग्य कर्मचाऱ्याच्या हौतात्म्यस विनम्र अभिवादन केल्याशिवाय तो पूर्णच होऊ शकत नाही. जिवंतपणी केलेल्या त्यांच्या सेवेचे कौतुक करता येत नसेल तर किमान मृत्यू पश्चात या शाब्दिक वेदना तर देता काम नये.


या कोरोना काळातील डॉक्टरांच्या योगदानाबद्दल कुणी प्रश्न उपस्थित करू नये आणि त्यांनीही हे सिद्ध करायची गरज नाही, जर त्यांच्यावर स्वतःच कर्तृत्व सिद्ध करण्याची वेळ येत असेल तर हा त्यांचा घोर अपमान ठरेल. सध्याच्या या वैश्विक महामारीच्या काळात डॉक्टर क्षेत्रातील सर्वजण (अॅलोपॅथी, युनानी, आयुर्वेदिक, होमिओपॅथी) आपल्याला अवगत असलेल्या वैद्यकीय ज्ञानाचा आणि कुशल बौद्धिकतेचा वापर करून रुग्णांना इमाने इतबारे उपचार देत आहेत. आजच्या घडीला देशातून 41 लाख 12 हजार 551 रुग्ण उपचार घेऊन बरे होऊन घरी गेले याचं सर्व श्रेय हे डॉक्टर मंडळींना आहे. या रुग्णांना बरे करण्याकरिता रोज वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ जीवाची बाजी लावून काम करत आहेत. मागच्या म्हणजे काही महिन्यापूर्वी या कोरोना काळात वेळा जेव्हा डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी रुग्णाच्या वस्त्यांमध्ये तपासणी करीत जात असताना त्यांना काही नागरिकांनी शिवीगाळ केली होती, काहीना वेळ प्रसंगी मारहाणही झाली. त्यांनी या गोष्टीचा निषेध केला, मात्र त्याचं काम बंद नाही केले. ते अविरतपणे संघर्ष करत सगळ्या परिस्थितीचा सामना करत आपली सेवा देत राहिले. हा लेख लिहिण्याचा हेतू डॉक्टरांचे कौतुक करण्याचा नसून वास्तवात त्यांनी ह्या समाजाला जे योगदान दिले आहे तो मांडण्याचा छोटासा प्रयत्न आहे.


याप्रकरणी इंडियन मेडिकल असोसिएशन, महाराष्ट्र, अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे सांगतात की, " अगोदरच कामाचा ताण सहन करत आणि विविध समस्यांना तोंड देत सर्वच वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ काम करीत आहे. त्यांचे कामाचे कौतुक तर नाहीच किमान त्यांच्या या आजाराने मृत्यू झाल्याची दखल केंद्र शासनाला घ्यावीशी वाटत नाही हे खूपच क्लेशदायक आहे. ते आपले कर्तव्य बजावत असताना मृत्यू पावले आहेत. त्यांच्या मृत्यूच्या बाबतीची माहिती सांगण्याची वेळ आली तर 'आरोग्य' हा राज्याचा विषय आहे. होय मान्य आहे, मात्र या आरोग्याच्या आणीबाणीच्या काळात या आजाराच्या उपचार पद्धतीचे सर्व निकष, निर्देश, मार्गदर्शक सूचना ह्या केंद्र सरकारच्या अखत्यारीतील भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदे (आय सी एम आर) मार्फत देण्यात येत होत्या त्याचीच आम्ही अंमलबजावणी करत आहोत आणि यापुढेही करत राहू. मात्र, किमान डॉक्टरांना सन्मानपूर्वक वागणूक तर द्या. हे फक्त केंद्र सरकारच करतय असे नव्हे तर महाराष्ट्र राज्यात काही फारशी वेगळी परिस्तिथी नाही. येथेही आमच्या वाट्याला तेच दुःख आहे आणि ते आजही भोगत आहोत."

ते पुढे असेही सांगतात की, "संपूर्ण देशात आमच्या संघटनेचे जाळे पसरलेले आहे. या काळात आम्ही आमची यंत्रणा कामाला लावून, सदस्यांना संपर्क करून किती डॉक्टरांचा मृत्यू कर्तव्य बजावत असताना कोरोनाच्या संसर्गाने झाला याची माहिती मागवली त्यात 382 डॉक्टरांचे निधन हे कोरोनामुळे झाले असल्याची माहिती पुढे आली. तरीही ही माहिती अपुरी आहे असे आमचे ठाम मत आहे. डॉक्टरांच्या मृत्यूचा आकडा हा खूप मोठा आहे. आमच्याकडे उपलब्ध असलेली सर्व माहिती आम्ही आमच्या संघटनेच्या केंद्रीय कार्यालयातून केंद्र सरकारला देण्यात आली आहे. आम्ही त्यांना कोरोना योद्ध्याचा दर्जा द्या आणि त्यांना केंद्र सरकाने जी योजना जाहीर केली आहे त्या विम्याचे संरक्षण त्यांना द्यावे अशी मागणी करत आहोत तशीच मागणी आम्ही राज्य शासनाकडेही केली आहे. मात्र, आमच्या मागण्यांची दखल घ्यायला वेळ नाही असे काहीसे चित्र आहे. दिल्ली, बिहार आणि ओरिसा राज्यातील सरकारने मात्र डॉक्टरांची ही मागणी मान्य केली आहे. राज्य शासनाने किमान या काळात डॉक्टरांसहित किती आरोग्य कर्मचारी या काळात या आजाराच्या संसर्गामुळे बाधित होऊन मृत्युमुखी पडलेत याची नोंद ठेवावी. "


काही दिवसापूर्वीचेच एक बोलके उदाहरण आहे. सुरत येथील 37 वर्षीय भूलतज्ज्ञ डॉ संकेत मेहता जेव्हा स्वतः कोरोनाने बाधित होऊन अति दक्षता विभागात (आय सी यू ) उपचार घेत असताना, अचानकपणे 71 वर्षाचे गृहस्थ आय सी यू मध्ये दाखल झाले आणि त्यांना उपचार करण्याकरिता व्हेंटिलेटर ठेवणे गरजेचे होते त्यासाठी उपचाराचा म्हणून ट्यूब टाकणे गरजेचे होते. मात्र, डॉक्टर येण्यास उशीर लागत असल्याचे समजताच डॉ. मेहता यांनी स्वतःचे ऑक्सिजनचे मास्क काढून बाजूला ठेवत, स्वतःच्या तब्बेतीचा विचार न करता या रुग्णामध्ये ट्यूब टाकण्याचे काम केले. त्यानंतर पुन्हा ते स्वतःच्या बेडवर जाऊन उपचार घेत होते त्यांच्या या कामांची सर्वत्र प्रशंसा होत होती. मात्र, सध्या ते कोरोना पासून बरे झाले असले तरी, या कोरोनाचा या संसर्गाचा त्यांच्या फुफ्फुसांवर भयंकर परिणाम झाले असून त्यांना 'फुफ्फुसांचे प्रत्यारोपण' करावे लागणार असून या करीत त्यांना चेन्नईच्या रुग्णालयात हलविण्यात आले असून त्याकरिता त्यांना 1 कोटी रुपये इतका खर्च येणार असून त्याची जुळवाजुळव करण्यासाठी सुरत येथील इतर डॉक्टर सहकार्यांनी मदत निधी ( क्राऊडफंडिंग) गोळा करण्यास सुरुवात केली असून याकरिता डॉ. मेहता यांच्या पत्नीच्या बँक खात्यात पैसे जमा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


जुलै 20, ला व्यर्थ न हो बलिदान..' या शीर्षकाखाली डॉक्टरांनी आणि अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्यानी आपले कर्तव्य बजावताना जीव पणाला लावला आणि ते कर्तव्य पार पाडताना बलिदान दिले या वर सविस्तर लिहिले होते.


जो शहीद हुए हैं उनकी
ज़रा याद करो क़ुरबानी
तुम भूल ना जाओ उनको
इसलिए सुनो ये कहानी


आज गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी गायलेल्या अजरामर गाण्याच्या ओळी येथे आठवल्याशिवाय राहत नाही. रविवारी राज्यातील सर्वच डॉक्टरांच्या मोबाईलवर डोंबिवली येथील डॉ. पंकजकुमार चौधरी यांचा कोरोनाचा संसर्ग होऊन मृत्यू, ही बातमी धडकली आणि पुन्हा या बातमीविषयी डॉक्टरांमध्ये चर्चा सुरु झाली. खरं तर प्रत्येक व्यक्तीचा मृत्यू हा तितकाच महत्वाचा. प्रत्येक मृत्यूमागे एक कुटुंब असते, त्याची एक आपली सामाजिक व्यवस्था असते. कोरोना सोबत सुरु असलेल्या या युद्धात अनेक योध्यांना युद्ध लढत असताना वीरमरण प्राप्त झाले आहे. मग ते डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉय, आशा वर्कर, आरोग्य सहाय्यक, पोलीस विभाग, राज्य परिवहन महामंडळाचे आणि बी.ई.एस.टी चे चालक, वाहक आणि अन्य कर्मचारी, या ठिकणी काम करणारे आणि तसेच अत्यावश्यक सेवेमध्ये काम करणाऱ्यांना, अनेकांना आपले कर्तव्य पार पडताना या आजाराचा प्रादुर्भाव झाला आहे. यापैकी अनेकजण उपचार घेऊन बरे होऊन पुन्हा कामावर रुजूही झाले आहेत. त्याच ठिकाणी त्याच व्यवस्थेत ज्या ठिकाणी त्यांना कोरोनाचा प्रादुर्भाव झाला होता. केवळ इतर नागरिकांना त्यांच्या सर्व सेवा सुविधा व्यवस्थित मिळत राहाव्यात म्हणून. त्यांना घरी बसण्याचा 'पर्याय' नसतो कारण त्यांचे कामावर जाणे अनिवार्य आणि अत्यंत गरजेचे असते. हे सगळं सुरु आहे सर्व सामान्य नागरिक सुरक्षित आणि निरोगी राहावेत म्हणून. मात्र, या सगळ्यात प्रक्रियेत आपण सामान्य नागरिक म्हणून आपण आपली जबाबदारी पाळतोय का?


अशी अनेक उदाहरणे देता येतील, डॉक्टरांनी खरोखरच खस्ता खाऊन, वेदना सहन करून वेळ प्रसंगी जीव घालून रुग्णांचे प्राण वाचविले आहेत. एप्रिल महिन्यात देशाच्या विविध प्रांतातील तीन डॉक्टर आपले कर्तव्य बजावत असताना धारातीर्थ झाले. रुग्णांना उपचार देत असतं त्यांना या रोगाची लागण झाली असून त्यांचे निधन झाले, मात्र या तीन डॉक्टरांच्या अंत्यविधीला समाजातील काही समाजकंटकांनी अडथळे निर्माण केले. हे तीनही डॉक्टर राज्यातील देशातील विविध भागातील होते. आंध्रप्रदेश येथील डॉ लक्ष्मीनारायण रेड्डी (60), तामिळनाडू येथील 55 वर्षीच्या न्यूरोसर्जन डॉ. सिमॉन हर्क्युलस, मेघालय येथील 69 वर्षीय डॉ. जॉन एल सायलो रायनाथथिंग. पोलिसाची मदत घेऊन त्यांचे विधी पार पाडण्यात आले ही घटना केवळ निंदनीय नसून या घूर्णस्पद कृत्याचा निषेध समाजातील सर्वांनीच करायला हवा.

यापूर्वीच्या आणि सध्याच्या काळातही अनेक जण डॉक्टरांना देवाची उपमा देतात, खरं तर ती उपमा कोणत्याही डॉक्टरला मान्य नसते. मात्र त्यांना चांगला माणूस म्हणून समाजाकडून वागणूक मिळावी ही अपेक्षा असते. मानसिक आणि शाररिक दुःखातून बाहेर काढणाऱ्या या डॉक्टरांना कोरोना काळात देशाच्या पंतप्रधानांनी आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांची गणना 'योद्धे' म्हणून केली आहे. अशा कठीण प्रसंगात अनेक डॉक्टर जीवाची बाजी लावून रुग्णांना उपचार करून बरे करत आहेत. या लढाईत मात्र काही योद्धे कोरोनाची लागण होऊन घायाळ झाले आहेत. त्यांच्या वेदनांवर फुंकर मारली तर त्यांना आवडेल, नाही मारता आली तर नका मारू किमान त्यावर मीठ तरी चोळू नका एवढीच अपेक्षा.


संतोष आंधळे यांचे अन्य ब्लॉग