मार्च महिन्यात राज्यात पहिला रुग्ण सापडल्यानंतर ते आजची स्थिती यामध्ये कमालीची तफावत आहे, मुख्य फरक म्हणजे आरोग्य यंत्रणेतील बदल. संपूर्ण राज्यातील आणि विशेषतः मुंबई शहरातील आरोग्य यंत्रणेत क्रांतिकारक बदल घडून आले आहेत. दिवसागणिक रुग्णसंख्या वाढत असताना लक्षणं असलेल्या रुग्णांना बेड्स कमी पडू नयेत याकरिता खासगी रुग्णालयांनी ज्यांना लक्षणं नाहीत, परंतु त्यांचा चाचणी अहवाल मात्र पॉझिटिव्ह आहे, अशा लक्षणविरहित रुग्णांना दाखल करून घेण्यास पालिकेने बंदी घातली आहे. त्यामुळे लक्षण विरहित रुग्णांनी घरीच स्वतःचे 10-14 दिवस विलगीकरण करून घेऊन सुरक्षिततेचे नियम पाळून डॉक्टरांचा सल्ला घेऊन योग्य ती खबरदारी घ्यावी, तसेच ज्यांना घरी राहणे शक्य नाही त्यांनी संस्थामक विलगीकरण कक्षात राहावे असे यापूर्वीच सांगण्यात आले आहे.


लक्षणं नसलेली केवळ चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, म्ह्णून भीती पोटी मोठ्या घरातील नागरिक खासगी रुग्णालयात भरती होतात आणि बेड्स अडवून बसतात. जर खरंच त्यांना गरज असेल तर बेड्स अडविला तर हरकत नाही. मात्र केवळ लक्षणविरहित आहोत यासाठी बेड अडविणे चुकीचे आहे. यामुळे जो गरजू रुग्ण आहे ज्याला लक्षणं आहेत अशा रुग्णांना या काळात बेड न मिळणे म्हणजे त्यांच्यावर एक प्रकारचा अन्यायच आहे. सध्याच्या काळात अनेक लक्षणं असलेल्या किंवा गंभीर रुग्णांना एक तर बेड मिळत नाही अनेक वेळ वणवण रुग्णालयाची दारे ठोकत हिंडावं लागतं. त्यामुळे मुंबई महापालिकेने घेतलेला निर्णय हा स्वागतार्ह आहे. मात्र त्याचे पालन व्यवस्थिपणे व्हायला पाहिजे. कोणत्याही व्यक्तीला यामध्ये 'सूट' देता काम नये. पालिकेने बेड्स ची अपुरी संख्या लक्षात घेता फील्ड हॉस्पिटलची मुंबईतील विविध भागात निर्मिती केली आहे. राज्यातही अशा पद्धतीने सोयी निर्माण करण्याचं काम सुरूच आहे.

दोन महिन्यापूर्वी, 19 एप्रिलला, 'लक्षण विरहित कोरोनाबाधित कळीचा मुद्दा ठरतोय का?' या शीर्षकाखाली सविस्तर लिहिले होते, त्यामध्ये, कोरोनाबाधितांचा आकडा राज्यात आणि त्यातच मुंबईमध्ये वाढत असताना, आपल्याकडे गेल्या काही दिवसात एसिम्पोटोमॅटिक (लक्षणविरहित) रुग्णांची चाचणी करावी का? तर ती कशा पद्धतीने करावी, की केलीच पाहिजे, नाही केली तरी चालेल का? हे रुग्ण असतात कुठे? ते ओळखायचे कसे? त्यांच्यापासून समाजाला काही धोका आहे का? अशा विविध प्रश्नांना उधाण आले आहे. त्यामुळे सर्व सामान्य नागरिकांमध्ये याविषयी भीती निर्माण झाली आहे. खरंतर भीती पेक्षा अधिक कुतूहल आणि उत्सुकता निर्माण झाली.

हे ही वाचा- BLOG | लक्षण विरहित कोरोनाबाधित कळीचा मुद्दा ठरतोय का?

राज्याचा वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभाग दररोज राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांचा अहवाल तयार करत आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात लक्षण विरहित रुग्णांचे प्रमाण असल्याचे स्पष्ट झाले आहे. या विभागाने 22 जून रोजी जाहीर केलेल्या अहवालानुसार, ज्या 128191 रुग्णाचा आकडा घेऊन विश्लेषण केले आहे. त्यानुसार 39 टक्के म्हणजे 49855 रुग्ण हे लक्षणंविरहित असे आहेत. तर लक्षणं असलेल्या रुग्णाची संख्या 6138 म्हणजे 5 टक्के, तर गंभीर स्वरूपाच्या रुग्णाची संख्या 2061 म्हणजे 1 टक्के, तर रुग्ण बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या 64153 म्हणजे 50 टक्के इतकी आहे. तर आतापर्यंत एकूण 5984, म्हणजे 5 टक्के रुग्ण दगावले आहेत.

मुंबई महापालिकेने काढलेल्या प्रसिद्धिपत्रकानुसार, महानगर पालिका क्षेत्रातील कोरोना रुग्‍णांची संख्‍या अधिक असणाऱ्या मालाड (पूर्व) प्रतिबंधित क्षेत्राचा महापालिका आयुक्‍त इकबाल सिंह चहल यांनी आज पायी पाहणी दौरा केला. या दौऱ्या दरम्‍यान त्‍यांनी परिसरातील नागरिकांशी संवाद साधण्‍यासह या भागात महापालिकेतर्फे पुरविण्‍यात येत असलेल्‍या नाग‍री सेवा-सुविधांची पाहणी केली. याच अनुषंगाने रुग्‍णालयातील खाटांचे व्‍यवस्‍थापन अधिकाधिक परिणामकारकपणे व्‍हावे, तसेच गरजूंना लवकरात-लवकर ‘कोविड बेड’ मिळावा, याकरिता ज्‍या रुग्‍णांमध्‍ये लक्षणे आहेत, अशाच रुग्‍णांना रुग्‍णालयामध्‍ये खाटा (बेड) उपलब्‍ध करुन देण्‍याचे आदेश देण्‍यात आले असल्‍याचे महापालिका अधिकाऱ्यांना सांगत त्‍यानुसार कार्यवाही करण्‍यास निर्देशित केले. त्‍याचबरोबर महापालिका क्षेत्रातील लक्षणे असलेल्‍या रुग्‍णांना वेळेत ‘बेड’ मिळावा, याकरिता सर्व परिमं‍डळीय सह आयुक्‍त / उपायुक्‍त आणि विभागस्‍तरीय सहाय्यक आयुक्‍तांनी आपापल्‍या कार्यक्षेत्रातील सर्व रुग्‍णालयांची तपासणी ही पुढील 48 तासात करण्‍याचे व करवून घेण्‍याचे निर्देश महापालिका आयुक्‍तांनी दिले. या तपासणी दरम्‍यान गरज नसलेल्‍या एखाद्या रुग्‍णाला बेड दिला असल्‍याचे निदर्शनास आल्‍यास, सदर ऍडमिशन रद्द करावी, जेणेकरुन लक्षणे असलेल्‍या व्‍यक्तिंना वेळेत यथायोग्‍य वैद्यकीय उपचार मिळू शकतील.

याप्रकरणी राज्य सरकारच्या कोरोनाविषयक विशेष कृती दलाचे प्रमुख डॉ. संजय ओक सांगतात की, "याचा असा अर्थ अभिप्रेत आहे की, ज्या लक्षणं असलेल्याला रुग्णांना बेड्सची गरज ही जास्त असते त्यांना ते बेड्स मिळावेत उगाचच कोणतेही लक्षणं नाही, अशा रुग्णांनाही ते बेड्स अडवू नयेत. लक्षणविरहित रुग्णांनाही स्वतःला घरीच अलगीकरण करून घ्यावे, त्यांना फारसा कुठलाही त्रास नसतो. अशा रुग्णांपासून फारसा धोका संभवत नाही."

या सगळ्या प्रक्रियेत आपल्याला प्रथम एसिम्पोटोमॅटिक रुग्ण म्हणजेच (कोणतेही लक्षण नसलेले) लक्षण विरहित रुग्ण म्हणजे नेमके काय आहे, हे आधी व्यवस्थित समजून घ्यावं लागेल. वैद्यकीय शास्त्रानुसार, एखादा व्यक्तीला संबंधित आजाराबद्दल कोणतेही लक्षणं नसणं, मात्र जर त्याची आजारासंबंधित असणारी चाचणी केली तर तो आजार त्याला असल्याचं चाचणीत स्पष्ट होणं, याला लक्षण विरहित रुग्ण असे म्हणतात. तसेच त्याला त्या आजाराचा वाहक, असंही म्हटलं जाऊ शकतं. लक्षण विरहित रुग्ण हे अनेकवेळा कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेले त्यांचे कुटुंबातील सदस्य, त्यांचे शेजारी असू शकतात किंवा अनेक आरोग्य कर्मचारी जे ह्या रुग्णांवर सध्या उपचार करत आहेत, असे अनेक जण. त्याचप्रमाणे काही लक्षण विरहित रुग्ण असेही आढळून आले आहेत, की ते कुठेही इतर रुग्णांच्या संपर्कात आलेले नाहीत.

आरोग्य तज्ज्ञांनुसार जोपर्यंत चालता-बोलता धडधाकट माणूस हा लक्षण विरहित रुग्ण असू शकतो की नाही हे त्याची चाचणी केल्याशिवाय सांगणे कठीण आहे. आता ह्या नियमानुसार कुणीही माणूस हा लक्षणंविरहित रुग्ण असू शकतो.

केईएम रुग्णालयात काम करणारे श्वसनविकार तज्ज्ञ सांगतात की, " भारतीय आरोग्य संशोधन परिषदेने आपल्याला मार्गादर्शक तत्वे आखून दिली आहेत. त्याप्रमाणे चाचण्या कराव्यात या मताशी मी ठाम आहे. तसेच लक्षण विरहित रुग्ण हा किती प्रमाणात संसर्ग देऊन शकतो, यावर कुणालाच काही माहित नाही. त्याचं निश्चित प्रमाण आता सांगणे कठीण आहे. त्यामुळे आपल्या आरोग्य विभागाने बाहेर पडताना मास्क घालून बाहेर पडण्याच्या सूचना दिल्या आहेत. आपण गृहीत धरून चालायचं की मोठ्या प्रमाणात जनता लक्षण विरहित आहे. त्यामुळे सर्व प्रतिबंधात्मक उपाय जे आजपर्यंत केले जसे की मास्क लावणे, गर्दीत न जाणे, सॅनिटायझरचा वापर करणे आणि काळजी घेणे हे नागरिकांनी नियमित सुरु ठेवले पाहिजे.

संतोष आंधळे यांचे अन्य ब्लॉग