BLOG : अजितदादा पवार - जननायक कर्मयोद्धा!

अजित दादांची प्रतिमा 'टग्या' अशी का निर्माण केली असेल हा प्रश्न राहून राहून पडतो. कदाचित राजकीय डावपेचातून हे घडले असावे! असो. वास्तवात त्यांची भाषणे आणि त्यांची कामाची शैली तसेच त्यांच्याकडे कामे घेऊन जाणाऱ्या माणसांचे अनुभव पाहू जाता त्यांची प्रतिमा 'कामाचा माणूस' अशीच असायला हवी होती. “जो पर्यंत माझे हातपाय हालतात तोपर्यंत तुमचं भलंच करेन, मी काम करून दाखवेन कारण मी कामाचा माणूस आहे! होय मी कामाचाच माणूस आहे”! हे उद्गार होते अजितदादा पवार यांचे!
“जमीनीचे पैसे आले तर निवडणुकीत वाया घालवू नका कारण राजकारण लई वंगाळ आहे”, हा स्पष्टवक्तेपणाही अजित दादांचाच! दादांच्या भाषणातील वनलाईनर्स तर अफाट असत. दादा या टोपण नावाने प्रसिद्ध असणाऱ्या, कार्यकर्त्यांच्या लाडक्या अजित पवारांची भाषणे त्यांच्या स्पष्टवक्तेपणा, प्रशासकीय पकड आणि तुफान फटकेबाजीसाठी ओळखली जातात. आपल्या भाषणांतून ते थेट मुद्द्याला हात घालत, कार्यकर्त्यांना कानमंत्र देत असत आणि विरोधकांचा समाचार घेताना अनेकदा विनोदी शैलीचा वापर करत. अजितदादा जे बोलत असत ते अगदी लख्ख स्पष्ट असे. आपल्या भूमिकेबाबत ते कधीही संदिग्धता ठेवत नसत, ते ज्या पद्धतीने ठोकून काढत असत त्याला 'दादा स्टाईल' म्हटले जाऊ लागले.
आपल्या भाषणात ते अनेकदा नियोजनावर भर देत. विकासाच्या मुद्द्यांवर बोलताना ते नेहमीच आकडेवारीसह बोलणे पसंत करत ही नोंद अधिक महत्वाची वाटते. अजित दादांच्या सभा नेहमी गर्दीने गजबजलेल्या असत. परभणी, पिंपरी-चिंचवड, बारामती - प्रत्येक ठिकाणी ते जनतेच्या समस्या ऐकत आणि सोडवत. त्यांच्या भाषणांत ग्रामीण म्हणी आणि लोकभाषेचा वापर असायचा, ज्यामुळे ते सामान्य माणसाशी जोडले जात. 2013 मधील इंदापूर येथील सभेत दुष्काळावर बोलताना त्यांनी धरणातील पाण्याच्या साठयाविषयी अतिशय निंदनीय आणि धक्कादायक विधान केले होते. हे वाक्य वादग्रस्त ठरले, पण नंतर त्यांनी ते उद्गार आपली "सर्वात मोठी चूक" म्हणून स्वीकारले आणि माफी मागितली.
अलीकडेच, 2026 च्या निवडणुकीत पिंपरी-चिंचवडच्या सभेत ते म्हणाले, "तुम्ही मला निवडले म्हणजे मी तुमचा मालक नाही, मी सेवक आहे." त्यांच्या सभांमध्ये ऊर्जा आणि उत्साह असायचा. गंभीर विषयांवर व्यक्त होतानाही मधूनच ते मिश्किल टिप्पणी करत. त्यांच्या भाषणांत अनेकदा मजेदार किस्से, उपहासात्मक शैली असे, ज्यामुळे उपस्थितांमध्ये रंगत निर्माण होई. भाषणादरम्यान ते कार्यकर्त्यांना कामाचे महत्त्व पटवून देत आणि शिस्त पाळण्याचे आवाहन करत. विरोधी पक्षांवर किंवा राजकीय घडामोडींवर ते थेट भाष्य करत असत जे त्यांच्या भाषणांचे प्रमुख आकर्षण असायचे. त्यांची भाषणे प्रामुख्याने विकासकामे, नियोजन, अर्थसंकल्प, कृषी आणि बारामती पॅटर्न या विषयांभोवती फिरत असली तरी भाषणा दरम्यान कुणी त्यांना चिठ्ठी पाठवली की अमुक एका गावातील गुरांचा बंदोबस्त व्हावा, तर ते त्यावरही व्यक्त होत!
कुणी सांगे की, आमचं गांव तुमच्या पदरात घ्या! एका बहाद्दराने तर गावात पोरांची लग्ने जमत नाहीत काहीतरी करा दादा असे साकडे घातले होते. कुणी बहीण येऊन सांगे की आमचा दादला रातदिस बोंबलत फिरतोय त्याच्या मुसक्या आवळायला सांगा! तर कुणी भाजीपाला देत म्हणे की दादा यांची भाजी करून खावा! तर कुणी आपल्या नोकरीची सोय मागत असे तर कुणी आपल्या भागातील गल्लीतला रस्ता करायला सांगे. जनतेची आणि लोकयोजनांची कामे रखडवणाऱ्या अधिकारी वर्गाची ते खरपूस शब्दांत हजेरी घेत असत. पहाटेच उठून कामाची पाहणी करणाऱ्या दादांचा अधिकारी वर्गाने धसकाच घेतलेला असे. लोक त्यांना अक्षरश: वाट्टेल ती कामे सांगत. कुणी काहीही सांगितलं तरी दादा मनापासून ऐकून घेत आणि त्यावर मिश्किल टिप्पणी करत त्याचं काम करून देत.
ते खऱ्या अर्थाने कामाचा माणूस होते! त्यांची खरी प्रतिमा कामाचा माणूस हीच होय! त्यांच्या सोबतच्या फायलीत निवेदने आणि अर्जांची भेंडोळी असत! लोक कामाची कागदपत्रे त्यांच्या हाती देत आणि निर्धास्त होत असत. केवळ सद्गुण असणारा आणि दोष नसणारा माणूस मी तरी पाहिला नाही. गुणदोष सर्वांतच असतात, दादा त्याला कसे अपवाद असतील. मात्र, त्यांचे गुण शोधायचे की दोष शोधायचे हे आपल्या विवेकावर सोपवले तर अजित दादा एक सहृदयी कुटुंबवत्सल आणि प्रेमळ माणूस म्हणून अधिक उजवे वाटू लागतात. त्यांना 'टग्या'चे विशेषण लावून ट्रोल केले जाऊ लागले तेव्हा त्यांनी सांगलीमध्ये एका भाषणात प्रत्युत्तर देत होय मी टग्याच आहे, असे विधान केले होते. मात्र, आपण कशा प्रकारचे टगे आहोत हे त्यांनी अगदी लख्ख स्पष्ट केले होते!
अजित दादांच्या सोशल मीडिया अकाउंटवर त्यांचा 'बायो' आहे; जो अतिशय कमी शब्दांत स्पष्टपणे खूप काही सांगून जातो - तिथे लिहिलंय : संकल्प, निष्ठा, कर्म-हाच माझा धर्म. राजकारणाच्या धावपळीतही सामान्य कार्यकर्त्याच्या हाकेला ओ देणारे आणि संकटात त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणारे, हास्यविनोद करत सामान्य माणसाला आपलंसं करून घेणारे असे मास लीडर आता लोप पावत आहेत. त्यांच्या जाण्याने अनेकांनी आपल्या घरातला हक्काचा 'कामाचा माणूस' गमावला आहे. एक असा जननायक गमावला आहे जो शक्तिशाली कर्मयोद्धा होता! दादांनी असं जायला नको होतं!


























