PM KISAN : पीएम किसान सन्मान योजना: बँक खाते आधार क्रमांकाशी जोडण्याची सुविधा आता प्रत्येक गावात उपलब्ध
Pm Kisan Yojana Aadhaar Link : केंद्र शासनाने 14 व्या हप्त्याचा लाभ मिळण्यासाठी लाभार्थींनी त्यांचे बँक खाते आधार क्रमांकास जोडणे बंधनकारक केले आहे.

Pm Kisan Yojana Aadhaar Link : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM KISAN) योजने अंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबास दोन हजार प्रती हप्ता या प्रमाणे सहा हजार प्रती वर्षी लाभ देण्यात येतो. या योजनेच्या 14 व्या हप्त्याचा लाभ मे किंवा जून महिन्यात जमा होणार आहे. केंद्र शासनाने 14 व्या हप्त्याचा लाभ मिळण्यासाठी लाभार्थींना त्यांचे बँक खाते (Bank Account) आधार क्रमांकास (Aadhaar Number) जोडणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे बँक खाते आधार क्रमांकाशी जोडण्याची सुविधा आता प्रत्येक गावात उपलब्ध करून देण्यात येत आहे. लाभार्थीना त्यांचे बँक खाते आधार क्रमांकाशी जोडण्याची सुविधा त्यांच्या गावातील पोस्ट मास्टर यांच्यामार्फत उपलब्ध करण्यात आली आहे. यासाठी आधार कार्ड, मोबाईल क्रमांक या कागदपत्रांचे आधारे आपल्या गावातील पोस्ट विभागाचे कर्मचारी यांच्यामार्फत इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत (आयपीपीबी) मध्ये खाते उघडावे. सदरचे बँक खाते आपल्या आधार क्रमांकाशी 48 तासात जोडल्या जाईल, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
राज्यात सद्यस्थितीत 12.91 लाख लाभार्थींची बँक खाती त्यांच्या आधार क्रमांकास जोडलेली नाहीत. त्यामुळे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे लाभार्थींच्या खात्यात 14 व्या हप्त्याचा लाभ जमा होणार नाही. मात्र आधार जोडणी पद्धत कोणत्याही अतिरिक्त कागदपत्रांशिवाय करता येणार असल्याने अत्यंत सोपी व सुलभ आहे. त्यासाठी आयपीपीबी मध्ये बँक खाते सुरू करण्याची सुविधा आपल्या गावातील पोस्ट कार्यालयातच उपलब्ध असल्याने लाभार्थींना इतरत्र जाण्याची गरजही पडणार नाही. पी.एम. किसान योजनेतील प्रलंबित लाभार्थींची बँक खाती आयपीपीबीमध्ये उघडून ती आधार क्रमांकास जोडण्यासाठी राज्याच्या आयपीपीबी कार्यालयास गावनिहाय याद्या उपलब्ध करून दिल्या आहेत.
गाव पातळीवर सर्वत्र मोहिम राबविण्यात येत आहे.
सोबतच गावातील पोस्ट मास्टर या लाभार्थींना संपर्क करून आयपीपीबीमध्ये बँक खाती सुरू करतील. योजनेच्या 14 व्या हप्त्याच्या लाभासाठी आधार संलग्न बँक खाते अनिवार्य केलेले असल्याने आयपीपीबी मार्फत 01 ते 15 मे या कालावधीत यासाठी गाव पातळीवर सर्वत्र मोहिम राबविण्यात येत आहे. आयपीपीबी मार्फत आयोजित या मोहिमेमध्ये राज्यातील सर्व प्रलंबित लाभार्थींनी त्यांचे बँक खाते उघडावे, असे आवाहान करण्यात येत आहे. कृषी आयुक्त तथा राज्यस्तरीय अंमलबजावणी प्रमुख सुनिल चव्हाण यांनी याबाबत प्रसिध्दीपत्रकाद्वारे आवाहन केले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
पाणी पिण्यासाठीही जपून ठेवावे लागेल; ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांची आढावा बैठक
Before You Go
Dharashiv Crop Loss : धाराशिवमध्ये अवकाळी पावसाने द्राक्ष बागांचं मोठं नुकसान, शेतकरी हवालदिल






















