IND vs SA : भारताने दक्षिण आफ्रिकेचा 82 धावांनी धुव्वा उडवून मालिकेत 2-2 अशी बरोबरी
टीम इंडियानं राजकोटच्या ट्वेन्टी ट्वेन्टीत दक्षिण आफ्रिकेचा ८२ धावांनी धुव्वा उडवून मालिकेत २-२ अशी बरोबरी साधली. ट्वेन्टी ट्वेन्टीच्या आजवरच्या इतिहासात भारतानं दक्षिण आफ्रिकेवर मिळवलेला हा सर्वात मोठा विजय ठरला. या सामन्यात भारतानं दक्षिण आफ्रिकेसमोर १७० धावांचं आव्हान ठेवलं होतं. पण भारताच्या प्रभावी माऱ्यासमोर दक्षिण आफ्रिकेचा डाव ८७ धावातच आटोपला. भारताकडून आवेश खाननं १८ धावात चार फलंदाजांना माघारी धाडून भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. याशिवाय युजवेंद्र चहलनं २, अक्षर पटेल आणि हर्षल पटेलनं १-१ विकेट घेत त्याला छान साथ दिली. त्याआधी दिनेश कार्तिक आणि हार्दिक पंड्याच्या फटकेबाजीच्या जोरावर भारतानं २० षटकात सहा बाद १६९ धावांची मजल मारली होती. कार्तिकनं ५५ तर हार्दिकनं ४६ धावा कुटल्या.






















