Devendra Fadnavis on Nasrapur Case : काही लोकांना प्रकरणाला वेगळं वळण द्यायचं होतं, नवले पुलावरुन आई-वडिलांना निघू देत नव्हते
Devendra Fadnavis on Nasrapur Case : काही लोकांना प्रकरणाला वेगळं वळण द्यायचं होतं, नवले पुलावरुन आई-वडिलांना निघू देत नव्हते
नसरापूर येथे चार वर्षांच्या मुलीवर अत्याचार करुन तिची हत्या करण्यात आली होती. काहीजण या प्रकरणाला वेगळं वळण लावण्याचा प्रयत्न करत होते, असे वक्तव्य राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. नरसापूर येथील मुलीच्या हत्येनंतर भोर तालुक्यासह पुण्यात संतप्त पडसाद उमटले होते. शनिवारी संध्याकाळी नसरापूरमधील पिडीत मुलीच्या कुटुंबीयांनी तिचा मृतदेह घेऊन पुण्यातील नवले पूल (Navale bridge) गाठला होता. याठिकाणी तब्बल चार तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते. रात्री उशीरा मुलीचे आई-वडील हे पोलिसांनी समजूत घातल्यानंतर आंदोलन मागे घ्यायला राजी झाले. मात्र, त्यावेळी काहीजण त्यांना आंदोलन मागे घेऊ देत नव्हते. ते त्यांना अडवत होते, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ते रविवारी नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी नसरापूर प्रकरणावरुन विरोधकांना फटकारले. मी काल स्वत: पिडीतेच्या वडिलांशी दोनवेळा बोललो. मी त्यांना हे समजावून सांगितलं, आपल्याला नराधमाला मृत्यूदंडाची शिक्षा करुन घ्यायची आहे. त्यासाठी वेळेत चार्जशीट दाखल होणे आणि केस चालणे, माननीय हायकोर्टाच्या माध्यमातून सगळ्या गोष्टीला फास्ट ट्रॅकवर नेत आहोत. लोकशाहीत आपल्या सगळ्यांना वाटतं, अशा नराधमाला भरचौकात फाशी दिली पाहिजे. पण ते लोकशाहीत करता येत नाही. लोकशाही कायद्याने चालते. पण कोणालाही कायद्याचा दुरुपयोग करता येऊ नये, यादृष्टीने कोणताही कोणतीही पळवाट न ठेवता या नराधमाला मृत्यूदंडाची शिक्षा कशी होईल, याचा प्रयत्न राज्य सरकार करेल. न्यायालयातून हे प्रकरण वेगाने मार्गी लावले जाईल. तसे पत्र आम्ही पिडीतेच्या कुटुंबाला दिले आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.




















