Sanjay Raut | विरोधी पक्षांनी एकत्र येऊन केंद्र सरकारच्या हुकूमशाही विरोधात आवाज उठवावा :संजय राऊत
सध्याच्या स्थितीत या देशात विरोधी पक्षांनी एकत्र येणे गरजेचे आहे. जे वातावरण दिल्लीच्या सीमेवर दिसतंय 30 दिवसापासून शेतकऱ्यांचा प्रश्न सुटलेला नाही. त्यांना कोणीही गांभीर्याने घ्यायला तयार नाही. त्यांच्या प्रश्नांची खिल्ली उडवली जात आहे. दुसरीकडे विरोधीपक्ष विस्कळीत आहे. विरोधी पक्षाने एकत्र येत हुकूमशाही विरोधात आवाज उठवावा, असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
मुंबईत माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, जिथे विरोधी पक्षाची सत्ता आहे. तिथे केंद्राच्या दबावाखाली, दहशतीखाली काम करू दिलं जात नाही. महाराष्ट्रात मेट्रो सारखे प्रकल्प होऊ नये यासाठी यंत्रणा काम करत आहे. पश्चिम बंगालमध्ये वेगळं राजकारण सुरू आहे. जे विरोधी पक्षात आहेत. त्यांनी एकत्र येऊन मजबूत संघटन तयार करणे गरजेचे आहे, असं राऊत म्हणाले.
राऊत म्हणाले की, सध्या यूपीए आहे. यूपीएमध्ये सोनिया गांधींकडे नेतृत्व आहे. मात्र आता यूपीएची ताकद वाढणे गरजेचं आहे. जास्तीत जास्त नेत्यांनी, पक्षांनी एकत्र येऊन केंद्र सरकारच्या हुकूमशाही विरोधात आवाज उठवला पाहिजे. विरोधी पक्ष कमजोर होणे म्हणजे लोकशाही संपणे असा आहे, असं देखील राऊत म्हणाले.
राऊत म्हणाले की, प्रत्येक राज्याचे प्रश्न वेगळे आहेत. या देशात सोनिया गांधींच्या बरोबरीने शरद पवार असं नेतृत्व आहे, ज्याला मान्यता आहे. देशामध्ये सर्वत्र त्यामुळे त्यांचाही विचार होऊ शकतो, असं राऊत म्हणाले.























