Pankaj Bhoyar on School : उष्णतेच्या लाटेमुळं शाळा उशिरा सुरू होणार?
Pankaj Bhoyar on School : उष्णतेच्या लाटेमुळं शाळा उशिरा सुरू होणार?
हवामान विभागाने (IMD) वर्तविलेल्या अंदाजानुसार सध्या संपूर्ण विदर्भात सूर्य अक्षरशः आग ओकत आहे. उन्हाचा पारा सातत्याने वाढू लागल्याने विदर्भातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. या वाढत्या तापमानाचा आणि उष्णतेच्या लाटेचा (Heat Wave) थेट फटका शालेय विद्यार्थ्यांना बसू नये, म्हणून राज्य सरकारकडून एक मोठा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. 10 जूननंतरही विदर्भातील उष्णतेची लाट (Vidarbha Heat Wave) अशीच कायम राहिली, तर नेहमीप्रमाणे 15 जून रोजी सुरू होणाऱ्या शाळा (School) यंदा थेट 26 जून रोजी सुरू करण्याबाबत सरकार विचार करत असल्याची माहिती गृहराज्यमंत्री पंकज भोयर (Pankaj Bhoyar) यांनी दिली आहे. या संदर्भात शालेय शिक्षण विभाग लवकरच एक महत्त्वाची बैठक घेऊन परिस्थितीचा सविस्तर आढावा घेणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले.
विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी हे सध्या देशातील सर्वाधिक उष्ण शहर ठरले आहे. ब्रह्मपुरीत नुकतीच 47.2 अंश सेल्सिअस एवढ्या विक्रमी तापमानाची नोंद झाली आहे. हवामान विभागाने पुढील दोन दिवस विदर्भात उष्णतेचा तडाखा असाच कायम राहण्याचा अंदाज वर्तवला असून, अकोला, अमरावती आणि वर्धा या जिल्ह्यांसाठी 'रेड अलर्ट' (Red Alert) जारी केला आहे. तर नागपूर आणि यवतमाळ जिल्ह्यांसाठी 'ऑरेंज अलर्ट' (Orange Alert) देण्यात आला आहे. संभाव्य उन्हाचा तडाखा लक्षात घेता नागरिकांनी दुपारच्या वेळेत कामाशिवाय बाहेर पडणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.




















