Devendra Fadnavis on Karjmafi : 50 हजार रुपयांऐवजी 2 लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार
मुंबई : मुख्यमंंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी कर्जमाफीच्या मुद्यावर विधानसभेतील अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना माहिती दिली आहे. महात्मा फुले कर्जमाफी योजनेचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांपर्यंतचा लाभ मिळणार होता तो आता 2 लाख रुपयांपर्यंत मिळेल आणि प्रोत्साहनपर अनुदानासाठीची 2026-27 चं पीक कर्ज भरण्याची अट रद्द करतो, अशी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली. कर्जमाफीच्या निर्णयासाठी 2029 पर्यंत थांबू शकलो असतो मात्र आम्ही तसं केल नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
कर्जमाफीसाठी 2029 पर्यंत थांबू शकलो असतो : देवेंद्र फडणवीस
कर्जमाफीच्या संदर्भात इथं बरीच चर्चा झाली. कर्जमाफी हा परिस्थितीची आवश्यकता म्हणून करत आहोत. कुठल्याही कर्जमाफीनं शेतकरी श्रींमंत झाला नाही तो होऊ शकत नाही. शेतकऱ्याकडे सावकाराकडे जावं लागू नये हा एक उद्देश कर्जमाफीचा असतो. आम्ही विधानसभा निवडणुकीच्या वेळी कर्जमाफी करण्याचा शब्द दिला होता, आम्ही 2029 पर्यंत थांबू शकलो असतो, आम्ही सर्व निवडणुका जिंकलो आहोत, मात्र आम्ही तसं केले नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
शेतकरी अडचणीत असेल तर त्याला कर्जमाफी दिली पाहिजे हे ठरवलं आणि आपल्या सरकारनं कर्जमाफीचा निर्णय केला. कर्जमाफी, एकवेळ समझोता आणि प्रोत्साहनपर अनुदानाचा निर्णय घेतला. महायुती सरकार दरवर्षी 25 हजार कोटी रुपयांची वीज माफी सरकार करतेय. दरवर्षी हे पैसे दिले जातात, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.


















