Cyclone Tauktae : पालघर जिल्ह्यात भात पिकाचं मोठं नुकसान; हातातोंडाशी आलेला भात शेतात आडवा
पालघर जिल्ह्याच्या सर्वच भागात मुसळधार पाऊस सुरु असून सकल भागात पाणी साचले आहे कालपासून बहुतांश भागात विजेचे पोल कोलमडून पडल्याने आणि तारा तुटल्याने बत्ती गुल आहे. जिल्ह्यामधील काही ठिकाणचे मोठ्या रस्त्यांसह गावखेड्यांचे रस्तेही झाड उन्मळून पडल्याने बंद आहेत. वादळी पावसाने अनेक घरांचे नुकसान झालं आहे. जिल्ह्यत या वादळामुळे दोन मृत्यूही झाले असून, माहीम टेम्भीमध्ये एका नांगरलेल्या बोटीला जलसमाधी मिळाली असून इतर दोन बोटींचे नुकसान झालं आहे. तर दुसरीकडे दुबार भातशेती, आंबा उत्पादक, विट भट्टी व्यावसायिक, भाजीपाला उत्पादक, बागायतदार यांच मोठं नुकसान झालं आहे. अजूनही हा मुसळधार पाऊस कायम असून जिल्ह्यातील दळणवळण बंद पडण्याची पाळी आली आहे, तर काही ठिकाणी मोबाईल नेटवर्कही बंद झालं आहे.



















