Team India semi final Scenario : 75 धावांनी विजय किंवा 10 षटकांत पाठलाग...; टीम इंडियाला सेमी फायनलमध्ये जाण्यासाठी नक्की काय करावं लागेल?, समजून घ्या नेट रनरेटचं गणित
Team India semi final Scenario : टी 20 वर्ल्ड कपमध्ये भारत आणि झिम्बाब्वे उद्या आमने सामने येणार आहे. या लढतीत भारताला मोठा विजय मिळवावा लागेल.

Team India semi final Scenario चेन्नई : टी-20 विश्वचषकाचा प्रवास आता अंतिम टप्प्याच्या दिशेनं सुरु आहे. भारतीय संघाच्या नजरा उपांत्य फेरीवर खिळल्या आहेत. उपांत्य फेरीत पोहोचण्यासाठी भारताला पुढील दोन्ही सामन्यात विजय मिळवावा लागेल.मात्र, केवळ विजय मिळवून भारताचे काम होणार नाही, तर नेट रन रेटच्या (NRR) चक्रव्यूहात भारत अडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विशेषतः वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिकेच्या तगड्या रन रेटमुळे भारतासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.
भारताचा सध्याचा नेट रन रेट - 0.31 असून तो सुधारण्यासाठी आगामी दोन सामन्यांत (झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिज विरुद्ध) मोठ्या फरकाने विजय मिळवणे अनिवार्य आहे.
भारताला काय करावे लागेल?, जाणून घ्या नेट रनरेटचं गणित
1. मोठ्या फरकाने विजयः भारताला झिम्बाब्वेविरुद्ध किमान 75 ते 100 धावांनी विजय मिळवावा लागेल.
2. धावांचा पाठलाग: जर भारत दुसऱ्यांदा फलंदाजी करत असेल, तर 175 सारखे लक्ष्य 10 ते 12 षटकांत पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा लागेल. जेणेकरून रन रेट +2.63 ते +2.73 च्या घरात पोहोचू शकेल.
थोडक्यात सांगायचे तर, भारतीय संघाला केवळ सामने जिंकायचे नाहीत, तर प्रतिस्पर्धी संघांना धुवून काढावे लागणार आहे. अन्यथा, गुणतालिकेत बरोबरी झाल्यास नेट रन रेटच्या जोरावर वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका बाजी मारू शकतात
वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिकेचे थ्रेट
सध्या वेस्ट इंडिजचा +5.35 नेट रन रेट आहे, तर दक्षिण आफ्रिका दुसऱ्या नंबरला +3.8 नेट रन रेटने आहे. जर वेस्ट इंडिजने दक्षिण आफ्रिकेचा थोड्या फरकाने पराभव केला, तर भारतासाठी स्पर्धेचे दरवाजे जवळपास बंद होऊ शकतात. अशा स्थितीत वेस्ट इंडिजचा रन रेट अव्वल राहील आणि दक्षिण आफ्रिकाही भारताच्या पुढे जाण्याची दाट शक्यता आहे.
भारत आणि झिम्बाब्वे उद्या आमने सामने
भारत आणि झिम्बाब्वे उद्या आमने सामने येणार आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्त्वात टीम इंडियाला दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा पराभव विसरुन दमदार कामगिरी करणं आवश्यक आहे. भारताला या टी 20 वर्ल्ड कपमध्ये सलामीची चांगली भागीदारी मिळालेली नाही. सूर्यकुमार यादव झिम्बाब्वे विरुद्ध संघात बदल करणार का ते देखील पाहावं लागेल. संजू सॅमसन आणि अक्षर पटेलला संघात संधी मिळण्याची शक्यता आहे.
भारताचा संभाव्य संघ : संजू सॅमसन, अभिषेक शर्मा, ईशान किशन, सूर्यकुमार यादव (कर्णधार) , शिवम दुबे, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग

























