IND vs AUS 3rd Test 2nd Day : भारताचा डाव 443 धावांवर घोषित, ऑस्ट्रेलिया बिनबाद 8 धावा
चेतेश्वर पुजारानं कारकिर्दीतलं सतरावं कसोटी शतक साजरं केलं. तर कोहलीनं नाबाद अर्धशतकी खेळी उभारत मैदानात तळ ठोकला आहे. या दोघांनी आतापर्यंत अभेद्य दीडशतकी भागीदारी साकारत टीम इंडियाला मजबूत स्थितीत नेऊन ठेवलं आहे.

मेलबर्न : ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तिसऱ्या मेलबर्न कसोटीत चेतेश्वर पुजाराच्या दमदार शतकाच्या जोरावर टीम इंडियानं पहिला डाव सात बाद 443 धावांवर घोषित केला. पुजारानं कसोटी कारकीर्दीतलं आपलं सतरावं शतक साजरं केलं. त्यानं 10 चौकारांसह 106 धावांची खेळी उभारली. तर कर्णधार कोहलीनं नऊ चौकारांसह 82 धावांचं योगदान दिलं.
पुजारा आणि विराटनं तिसऱ्या विकेटसाठी 170 धावांची भागीदारी रचली. त्यानंतर आलेल्या रोहित शर्मानंही 63 धावांची खेळी केली. ऑस्ट्रेलियाकडून पॅट कमिन्सनं तीन आणि मिचेल स्टार्कनं दोन फलंदाजांना माघारी धाडलं. तर नॅथन लायन आणि हेजलवूडनं प्रत्येकी एक विकेट घेतली. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा ऑस्ट्रेलियानं पहिल्या डावात बिनबाद आठ धावांची मजल मारली आहे.
पहिला दिवस
पहिल्या दिवसअखेर टीम इंडियाने मयंक अगरवाल आणि चेतेश्वर पुजाराच्या अर्धशतकांच्या जोरावर दोन बाद 215 धावांची मजल मारली होती. पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा कर्णधार कोहली 47 तर पुजारा 68 धावांवर खेळत होता.
विराट आणि पुजारानं तिसऱ्या विकेटसाठी रचलेली 92 धावांची अभेद्य भागीदारी आणि पदार्पणवीर मयांक अगरवालची अर्धशतकी खेळी हे पहिल्या दिवसाचं वैशिष्ट्य होतं. मयांकनं आठ चौकार आणि एका षटकारासह 76 धावांची खेळी उभारली.
भारताचा कर्णधार विराट कोहलीनं नाणेफेक जिंकून फलंदाजीचा करण्याचा निर्णय घेतला. भारताकडून कर्नाटकच्या मयांक अगरवालनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांमधली चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघांनी 1-1 अशी बरोबरी साधली आहे. त्यामुळे मेलबर्नची ही तिसरी कसोटी दोन्ही संघांसाठी निर्णायक ठरणार आहे. भारतानं अॅडलेडच्या पहिल्या कसोटीत 31 धावांनी विजय साजरा केला होता. तर ऑस्ट्रेलियानं पर्थची कसोटी 146 धावांनी जिंकत मालिकेत बरोबरी साधली.
तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी संघात तीन बदल करण्यात आले आहेत. सलामीवीर मुरली विजय आणि लोकेश राहुलला वगळून मयांक अगरवालला खेळवण्याचा निर्णय संघव्यवस्थापनानं घेतला आहे. याशिवाय रोहित शर्माचं आणि रविंद्र जाडेजाचं भारतीय संघात पुनरागमन झालं आहे. वेगवान गोलंदाज उमेश यादवला विश्रांती देऊन जाडेजाचा संघात समावेश करण्यात आला आहे.
Before You Go
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सने पंजाब किंग्सचा घरच्या मैदानावर पराभव करत विजयीरथ रोखला






















