Virat Kohli : विराटच्या दमदार शतकाचं पाकिस्तानात जोरदार सेलिब्रेशन, किंग कोहलीच्या चाहत्यांचा व्हिडीओ समोर
Virat Kohli : भारतीय क्रिकेट संघाचा आघाडीचा फलंदाज विराट कोहलीनं नाबाद शतकी खेळी करत विजयामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली.

Virat Kohli Century Celebration दुबई: भारतानं पाकिस्तानला 6 विकेटनं पराभूत करत चॅम्पियन्स ट्रॉफीत दणदणीत विजय मिळवला. भारताचा या स्पर्धेतील हा दुसरा विजय ठरला. या विजयाचा शिल्पकार विराट कोहली ठरला. दुसऱ्या विजयासह ग्रुप एमध्ये भारत गुणतालिकेत पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. विराट कोहलीनं नाबाद 100 धावांची खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. विराटच्या या शतकी खेळीनंतर त्याच्या पाकिस्तानातील चाहत्यांनी देखील जल्लोष केल्याचं पाहायला मिळालं.
विराट कोहलीनं संयमी खेळी करत भारताला विजय मिळवून दिला. 100 धावांमध्ये त्यानं 72 धावा एक दोन अशा पळून काढल्या. तर, त्यानं 7 चौकार मारले. विराटनं 111 बॉलमध्ये 100 धावा करत संघाला विजय मिळवून दिला. भारतानं पाकिस्तानला 45 बॉल बाकी ठेवत 6 विकेटनं पराभूत केलं. पाकिस्ताननं पहिल्यांदा फलंदाजी करताना 241 धावा केल्या होत्या.
विराट कोहलीच्या विजयाचा पाकिस्तानात जल्लोष
विराट कोहलीनं चौकार मारत शतक पूर्ण केलं, त्यासोबत पाकिस्तानवर विजय देखील मिळवला. विराटच्या शतकी खेळीनं मिळालेल्या विजयाचा देशभर जल्लोष साजरा करण्यात आला. विशेष बाब म्हणजे भारतासह पाकिस्तानातील विराट कोहलीच्या चाहत्यांनी जल्लोष केला.
कुलदीप यादव अन् श्रेयस अय्यरची दमदार कामगिरी
पाकिस्ताननं टॉस जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, हा निर्णय पाकिस्तानच्या अंगलट आला. कुलदीप यादवनं 9 ओव्हरमध्ये 40 धावा देत 3 विकेट काढल्या. मोहम्मद रिजवान आणि सउद शकील यांची 104 धावांची भागिदारी झाली होती. ती भागिदारी अक्षर पटेलनं तोडली. त्याचवेळी कुलदीप यादवनं पाकिस्तानी फलंदाजांवर दबाव कायम ठेवला. कुलदीप यादवनं सलमान आगा, शाहीन आफ्रिदी आणि नसीम शाहची विकेट घेतली.
श्रेयस अय्यरनं देखील दमदार कामगिरी केली. भारताचा कर्णधार रोहित शर्मा 20 धावा करुन बाद झाला होत्यानंतर शुभमन गिल आणि विराट कोहली यांच्यात चांगली भागिदारी झाली. मात्र,शुभमन गिल भारताच्या 100 धावा असताना बाद झाला. यानंतर आलेल्या श्रेयस अय्यरनं विराट कोहली सोबत 114 धावांची भागिदारी केली. श्रेयस अय्यरनं 56 धावा करत संघाच्या विजयात महत्त्वाचं योगदान दिलं.
दरम्यान, आता चॅम्पियन्स ट्रॉफीत भारताचा पुढील सामना न्यूझीलंड विरुद्ध होणार आहे. विराट कोहलीनं पाकिस्तान विरुद्ध शतक करत गेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीतील अंतिम फेरीतील पराभवाचा बदला घेतला. 2017 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत पाकिस्ताननं भारताला पराभूत केलं होतं. त्या पराभवाचा भारतानं काल वचपा काढला.
CELEBRATION IN PAKISTAN FOR VIRAT KOHLI'S HUNDRED. 🤯pic.twitter.com/WOkDj8d8nN
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) February 23, 2025
इतर बातम्या :





















