Tanush Kotian : टीम इंडियाला मिळाला दुसरा 'आर अश्विन', बॅट अन् बॉलने देशांतर्गत क्रिकेटमध्ये उडवून दिली खळबळ
अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली रणजी करंडक जिंकणाऱ्या मुंबईने तब्बल 27 वर्षांनंतर इराणी ट्रॉफीवर कब्जा केला आहे.

Irani Cup 2024 Tanush Kotian : मुंबईने 27 वर्षांनंतर इराणी ट्रॉफीचे विजेतेपद पटकावले. अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली रणजी करंडक जिंकणाऱ्या मुंबईने तब्बल 27 वर्षांनंतर इराणी ट्रॉफीवर कब्जा केला आहे. मुंबईने शेष भारताचा पराभव करत हे विजेतेपद पटकावले. तनुष कोटियनने या सामन्यात मुंबईसाठी चमकदार कामगिरी केली. तनुषने फलंदाजीसोबतच गोलंदाजीमध्येही चांगली कामगिरी केली. तो मुंबईच्या दुसऱ्या डावात आठव्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता. यादरम्यान तनुषने नाबाद शतक झळकावले आणि 140 चेंडूंचा सामना करत 114 धावा केल्या. आता तो टीम इंडियात रविचंद्रन अश्विनची जागा घेऊ शकतो, असे बोलले जात आहे.
बांगलादेशविरुद्धच्या कसोटीत आर अश्विनची कामगिरी उत्कृष्ट राहिली. मालिकावीर म्हणून त्याची निवड झाली. पण आर अश्विन आता 38 वर्षांचा झाला आहे. यामुळे टीम इंडियाला आता त्याच्या बदलीचा शोध सुरू करावा लागणार आहे. या मालिकेत आता आर अश्विनच्या जागी एका खेळाडूने त्याच्या नावावर दावा केला आहे. तनुष कोटियन असे या खेळाडूचे नाव आहे.
टीम इंडियाचा अनुभवी अष्टपैलू खेळाडू अश्विनने अनेक प्रसंगी चमकदार कामगिरी केली आहे. त्याने कसोटीमध्ये गोलंदाजीसोबतच फलंदाजीमध्येही चांगली कामगिरी केली आहे. बांगलादेशविरुद्धच्या कसोटीत अश्विननेही शतक झळकावले आहे. आता इराणी चषक स्पर्धेत तनुष कोटियनने मुंबईसाठी अष्टपैलू कामगिरी दाखवली आहे.
मुंबईने दुसऱ्या डावात 8 गडी गमावून 329 धावा केल्या. यादरम्यान तनुषने 150 चेंडूंचा सामना करत नाबाद 114 धावा केल्या. त्याने 10 चौकार आणि 1 षटकार मारला. तनुषने फलंदाजीसोबतच गोलंदाजीतही कमाल दाखवली. त्याने शेष भारताविरुद्ध 27 षटकांत 101 धावांत 3 बळी घेतले.
देशांतर्गत क्रिकेटमध्ये तनुषची कामगिरी
कोटियनने आतापर्यंत 30 प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. या कालावधीत 88 विकेट्स घेतल्या आहेत. त्याने 1451 धावाही केल्या आहेत. तनुषने 2 शतके आणि 13 अर्धशतके ठोकले आहेत. नाबाद 120 ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे. तनुषने 19 लिस्ट ए सामन्यात 20 विकेट घेतल्या आहेत. त्याने 24 देशांतर्गत टी-20 सामन्यात 24 बळी घेतले आहेत.
तनुष कोटियन का घेणार अश्विनची जागा?
रविचंद्रन अश्विन 38 वर्षांचा आहेत. त्याने भारतासाठी आतापर्यंत 102 कसोटी सामने खेळले आहेत. या कालावधीत 527 विकेट्स घेतल्या आहेत. यासोबतच 3423 धावाही केल्या आहेत. अश्विनने 6 शतके आणि 14 अर्धशतके केली आहेत. त्याची सर्वोत्तम कसोटी धावसंख्या 124 धावा आहे. अश्विन फलंदाजीसाठी खालच्या फळीत येतो. तनुषबद्दल बोलायचे तर तो खूपच युवा आहे. तनुषची कामगिरी चांगली असेल तर तो टीम इंडियात स्थान मिळवू शकतो.
हे ही वाचा -
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
