Team India: नवी दिल्ली: अखेर टीम इंडियाला (Team India) घेऊन एअर इंडियाचे विमान बार्बाडोसमधून भारताकडे झेपावले आहे. एअर इंडियाचे AIC24WC विमान भारताकडे यायला निघाले आहे. उद्या सकाळपर्यंत भारतीय संघ दिल्लीत पोहोचणार आहे. याचदरम्यान एक महत्वाची माहिती समोर आली आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या सकाळी 11 वाजता टीम इंडियातील खेळाडूंची भेट घेणार आहे. यावेळी खेळाडूंचा सत्कार देखील करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.






टीम इंडियाने 29 जून 2024 रोजी दक्षिण आफ्रिकेचा पराभव करुन टी-20 विश्वचषकावर (T20 World Cup 2024) आपले नाव कोरले. 2013 नंतर टीम इंडियाने आयसीसी ट्रॉफी जिंकली.  या ऐतिहासिक विजयानंतर संपूर्ण देश आपल्या टीमचे स्वागत करण्यासाठी सज्ज आहे. मात्र टीम इंडिया अजूनही बार्बाडोसमध्ये अडकून पडली आहे. बेरिल चक्रीवादळामुळे येथील विमानतळ बंद करण्यात आले होते. त्यामुळे संपूर्ण शहरात संचारबंदी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र नुकतीच टीम इंडिया बार्बाडोसमधून भारताकडे यायला निघाली आहे.






पत्रकारांनाही मायदेशी परतणार-


टीम इंडियाला घेण्यासाठी विशेष विमान बार्बाडोसला पोहोचल्याची माहिती देण्यात आली. टीम इंडियाचे खेळाडू येथून दिल्लीला परततील. यासोबतच एका खास कारणासाठी बीसीसीआयचे कौतुक केले जात आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी टीम इंडियासोबतच तिथे अडकलेल्या पत्रकारांनाही परत आणण्याची घोषणा केली आहे. भारतीय मीडियातील अनेक लोक कव्हरेजसाठी बार्बाडोसला गेले होते. मात्र वादळामुळे ते तिथेच अडकले. त्यांची विमानाची तिकिटेही रद्द करण्यात आली. त्यामुळे पत्रकारांनाही मायदेशी आणण्यात येणार आहे.


मुंबईत विजयी मिरवणूक?


नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर टीम इंडिया मुंबईत दाखल होईल. यानंतर मुंबईत विश्वचषकाच्या ट्रॉफीसह सर्व खेळाडू ओपनडेक बसमधून विजयी मिरवणूक काढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याबाबत बीसीसीआयकडून अधिकृत माहिती मात्र समोर आलेली नाही. 


बंधित बातम्या:


हार्दिक पांड्याच्या मागची विघ्नं संपता संपेना; पुन्हा संशायाची पाल चुकचुकली, नेमंक काय घडलं?


रोहित-विराटपासून डेव्हिड वॉर्नरपर्यंत; 2024 च्या टी20 विश्वचषकानंतर कोणी-कोणी निवृत्ती घेतली?