Shreyas Iyer : भारत विरुद्ध श्रीलंका (IND vs SL) यांच्यातील तिसऱ्या टी20 (3rd T20) सामन्यात भारताने सामना 6 विकेट्सनी जिंकत मालिका 3-0 ने जिंकली आहे. या सामन्याचा हिरो ठरला आहे श्रेयस अय्यर. श्रेयसने दमदार अर्धशतकाच्या जोरावर सामना जिंकवला. पण सोबतच त्याने विराट कोहलीचा एक विक्रमही मोडला आहे. 


श्रेयसने श्रीलंकेविरुद्ध सलग तिसऱ्या टी20 सामन्यात अर्धशतक झळकावल्याने त्याने कोहलीच्या सलग तीन टी20 सामन्यात अर्धशतकं झळकावण्याचा विक्रमाशी बरोबरी केली आहे. विशेष म्हणजे यावेळी विराटच्या नावावर 199 धावा असून श्रेयसने तीन सामन्यात एकूण धावा झळकावत विराटला मागे टाकलं आहे. श्रेयसने आजच्या 73 धावांच्या जोरावर तीन टी20 सामन्यात एकूण 204 धावा नावे केल्या आहेत.


श्रेयस तिन्ही सामन्यात नाबाद


विशेष म्हणजे श्रीलंकेविरुद्धच्या या मालिकेत श्रेयस अय्यर तिन्ही टी20 सामन्यात नाबाद राहिला आहे. त्याने पहिल्या सामन्यात नाबाद 57 दुसऱ्यामध्ये नाबाद 74 आणि अखेर आज नाबाद 73 धावा झळकावल्या आहेत. आजच्या खेळीनंतर श्रेयस अय्यरला सामनावीरासह मालिकावीराचा पुरस्कार देखील मिळाला आहे.  


 


मालिकाही भारताच्या नावावर


तीन सामन्यांची टी20 मालिका भारत आणि श्रीलंका यांच्यात खेळवली गेली. यात पहिले दोन सामने भारताने जिंकले होते. भारताने मालिकेतील पहिला सामना भारताने 62 धावांनी तर दुसरा सामना 7 विकेट्सनी जिंकला. दरम्यान यामुळे भारताने मालिका आधीच नावावर केली होती. पण आता तिसरा सामनाही 6 विकेट्सनी जिंकल्यामुळे भारताने श्रीलंकेला 3-0 ने व्हाईट वॉश दिला आहे. 


हे देखील वाचा-



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha