Ind Vs Pak Asia Cup Final: गौतम गंभीर कानात काहीतरी पुटपुटला अन् अर्शदीप वाऱ्याच्या वेगाने मैदानात धावत गेला, VIDEO व्हायरल
Ind Vs Pak Asia Cup Final: भारतीय संघाने आशिया कप स्पर्धेत पाकिस्तानला तीनवेळा धूळ चारली. अंतिम सामन्यात भारत जिंकल्यानंतर गौतम गंभीर प्रचंड उत्साही दिसत होता.

Ind Vs Pak Asia Cup Final: आशिया चषक स्पर्धेतील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील अंतिम सामन्यात घडलेल्या नाट्यमय घडामोडींची क्रीडाप्रेमींमध्ये अजूनही चर्चा सुरु आहे. शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या या सामन्यात भारताने पाकिस्तानचा (Ind Vs Pak) पाच गडी राखून पराभव केला होता. मात्र, या संपूर्ण सामन्यात अनेक चढउतार पाहायला मिळाले होते. हा सामना कधी भारत तर कधी पाकिस्तानच्या बाजूने झुकताना दिसत होता. त्यामुळे मैदानात आणि मैदानाबाहेर अनेक घडामोडी सुरु होत्या. या सामन्यात दोन्ही संघांचे प्रशिक्षक आपापल्या खेळाडूंना अधुनमधून संदेश पाठवताना दिसत आहे. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत ड्रेसिंग रुममध्ये बसून सामना पाहणारा गौतम गंभीर (Gautam Gambhir) राखीव खेळाडू असलेल्या अर्शदीप सिंगच्या कानात काहीतरी सांगताना दिसत आहे. त्यानंतर अर्शदीप सिंग (Arshdeep Singh) हा संदेश घेऊन वाऱ्याच्या वेगाने मैदानात धावत गेला. मैदानात जाऊन अर्शदीपने प्रशिक्षक गौतम गंभीरचा संदेश टीम इंडियाचा (Team India) कर्णधार सूर्यकुमार यादवला दिला आणि माघारी परतला. हा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर तुफान व्हायरल होत आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील अंतिम सामन्यात गौतम गंभीर आणि पाकिस्तानचे प्रशिक्षक माईक हेसन हे सातत्याने राखीव खेळाडूंच्या माध्यमातून आपापल्या खेळाडूंना संदेश पाठवताना दिसत होते. एकवेळ अशी आली की, गौतम गंभीर स्वत: मैदानात गेला होता. त्याने अभिषेक शर्मा आणि शुभमन गिल यांना काही सूचना दिल्या होत्या. हा सामना प्रचंड उत्कंठावर्धक झाला होता. अभिषेक शर्मा, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव हे तिघे झटपट बाद झाल्यानंतर भारतीय संघ संकटात सापडला होता. एकवेळ अशी होती की, हा सामना पाकिस्तानच्या बाजूने झुकला होता. मात्र, तिलक वर्मा याने संजू सॅमसन आणि शिवम दुबे यांच्या साथीने टीम इंडियाचा डाव सावरत संघाला विजयाच्या उंबरठ्यावर नेऊन ठेवले. त्यानंतर रिंकू सिंह याने विजयी चौकार मारत आशिया चषकावर भारतीय संघाचे नाव कोरले होते.
View this post on Instagram
या सामन्यात शिवम दुबे आणि तिलक वर्मा यांची जोडी जमल्यानंतर त्यांच्यात चांगली भागीदारी झाली होती. शिवम दुबे हा मोठे फटके मारुन भारताला लक्ष्याच्या जवळ आणत होता. त्यावेळी पाकिस्तानी संघाने या दोन्ही खेळाडूंची लय बिघडवण्यासाठी बराच वेळकाढूपणा केला. पाकिस्तानी गोलंदाज फहीम अश्रफ याने पायात क्रॅम्प आल्याचे सांगत बराच वेळ घेतला. या वेळकाढूपणावर गौतम गंभीरने आक्षेप घेतला होता.
आणखी वाचा
मी माफी मागितली नाही, ट्रॉफी पाहिजे तर...; मोहसीन नक्वी पुन्हा बरळला, काय काय म्हणाला?




















