Asia Cup 2025 : प्रत्येक संघाकडे भारताला पराभूत करण्याची क्षमता, श्रीलंकेवर विजय मिळताच बांगलादेशचा आत्मविश्वास वाढला, प्रशिक्षकानं ललकारलं
IND vs BAN : आशिया कपमध्ये भारत आणि बांगलादेश 24 सप्टेंबरला आमने सामने येणार आहेत. या सामन्यापूर्वीच बांगलादेशच्या प्रशिक्षकानं भारताशी पंगा घेतला आहे.

नवी दिल्ली : आशिया कपच्या सुपर -4 मध्ये भारत आणि बांगलादेश बुधवारी 24 सप्टेंबरला आमने सामने येणार आहेत. सुपर -4 मध्ये भारतानं पाकिस्तानला पराभूत केलं आहे. तर, बांगलादेशनं श्रीलंकेला पराभूत केलं आहे. बांगलादेशचा श्रीलंकेवरील विजयानं आत्मविश्वास वाढला आहे. बांगलादेशचे मुख्य प्रशिक्षक फिल सिमन्स यांनी भारत अजिंक्य संघ नसल्याचं म्हटलं आहे. जेव्हा आमचे टायगर्स जेव्हा विश्वविजेत्यांसमोर आशिया कपमध्ये सुपर 4 आमने सामने येतील तेव्हा सूर्यकुमार यादवच्या संघानं गेल्या चार मॅचमध्ये कशी कामगिरी केली किंवा काय मिळवलं हे महत्त्वाचं राहणार नाही, अस फिल सिमन्स म्हणाले.
Phil Simmons Comment on Team India : फिल सिमन्स टीम इंडिया बाबत काय म्हणाले?
बांगलादेशनं सुपर फोरच्या पहिल्या लढतीत श्रीलंकेला पराभूत केलं आहे, ज्यामुळं त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. भारताविरूद्धच्या मॅच संदर्भातील प्रश्न जेव्हा फिल सिमन्स यांना विचारण्यात आला तेव्हा ते म्हणाले प्रत्येक टीमकडे भारताला पराभूत करण्याची क्षमता आहे.
भारतानं यापूर्वी काय केलंय हे गरजेचं नाही. बुधवारी काय होणार हे महत्त्वाचं आहे. त्या साडे तीन तासात काय होणार हे महत्त्वाचं आहे. आम्ही भारताच्या कमजोर बाबी शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत. आम्ही अशाच प्रकारे सामने जिंकतो, असं फिल सिमन्स म्हणाले.
सिमन्सं म्हटलं की भारताविरुद्ध खेळायचं असतं तेव्हा वेगळंच वातावरण असतं. आमच्या खेळाडूंनी उत्साही राहून आव्हानाचा आनंद घेतला पाहिजे. भारताशी संबधित प्रत्येक सामन्याबाबत उत्साह असतो कारण ते टी 20 मधील जगातील पहिल्या क्रमांकाची टीम आहे. आम्हाला त्याच हाईपचा आनंद घ्यायचाय, असं सिमन्स यांनी सांगितलं.
फिल सिमन्स यांनी दुबई इंटरनॅशनल स्टेडियमच्या पिचचं कौतुक केलं. ही फलंदाजांसाठी चांगली खेळपट्टी असून टॉसचा फरक पडत नाही. उष्ण वातावरण आणि सलग सामने हे खेळाडूंसाठी आव्हानात्मक आहेत. मात्र, आमचे खेळाडू फिट आणि तयार आहेत, असं सिमन्स म्हणाले. मुस्तफिजूर रहमान यानं संघाच्या बैठकीत नेतृत्व करण्यास सुरुवात केली असून तो नव्या खेळाडूंना मार्गदर्शन करतोय ही सकारात्मक बाब आहे. आम्ही श्रीलंकेला पराभूत करण्यासाठी नाही तर आशिया कप जिंकण्यासाठी आलोय, असं सिमन्स म्हणाले.
भारतानं आशिया कपमध्ये आतापर्यंत ग्रुप स्टेजमध्ये यूएई, पाकिस्तान आणि ओमानला पराभूत केलं. तर, सुपर-4 मध्ये भारतानं पाकिस्तानवर 6 विकेटनं विजय मिळवला आहे. भारत सुपर 4 मधील दुसऱ्या विजयासाठी सज्ज आहे.























