Umberkhind : शिवरायांची युद्धभूमी ते भारतातील सर्वात उंच ‘रोड केबल स्टेड ब्रिज’, सह्याद्रीत अभियंत्यांची निसर्गाशी लढत
Umberkhind Missing Link Project : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भारतातील सर्वात उंच रोड केबल-स्टेड ब्रिज उभारण्यासाठी ॲफकॉन्सचे अभियंते सह्याद्रीच्या त्याच प्रदेशात निसर्गाशी झुंज देत आहेत, जिथे छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघल सेनेला पराभूत केले होते.

मुंबई : साडेतीनशे वर्षांपूर्वी ज्या सह्याद्री पर्वतरांगांत उंबरखिंडच्या लढाईत छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी मुघल सैन्यावर विजय मिळवला होता, त्याच पर्वतरांगा आज पुन्हा एका नव्या लढ्याचे साक्षीदार बनत आहेत. मात्र त्या तलवारीऐवजी आता पोलाद, केबल आणि काँक्रीट या साधनांच्या बळावर ऊन, वारा, पाऊस, उंची आणि वेळ मर्यादा या घटकांशी लढत देत आहेत.
रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील चावणी गाव येथे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मूठभर मावळ्यांनी ३०,००० मुघल सैनिकांना मात दिली. त्याच ठिकाणी आज ॲफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चरचे अभियंते इतिहासातून प्रेरणा घेऊन भारतातील सर्वात उंच रोड केबल-स्टेड ब्रिज उभारत आहेत. हा ब्रिज मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वरील मिसिंग लिंक प्रोजेक्टचा भाग असून जमिनीपासून तब्बल १३२ मीटर उंच असेल.
हा मिसिंग लिंक प्रोजेक्ट पूर्ण झाल्यानंतर एक्सप्रेस वे वरील प्रवास सुमारे ६ किमीने कमी होईल आणि प्रवासाचा वेळ सुमारे २५ मिनिटांनी कमी होईल.
मात्र या प्रकल्पाचा प्रवास सोपा नाही. २०२६ मध्ये पूर्ण होणारा हा ब्रिज सह्याद्रीच्या अतिशय कठीण आणि ऐतिहासिक परिसरात उभारला जात आहे. अरुंद कडे, तीव्र वारे, अचानक कोसळणारा पाऊस, घनदाट धुके या सर्वांचा सामना करत काम सुरू आहे. वाऱ्याचा वेग काही मिनिटांतच मंद वाऱ्यापासून ते ताशी १०० किमी वेगाने वाहतो. पावसाळ्यात, पावसामुळे सह्याद्रीच्या कडा पाण्याच्या थरात बदलतात. त्यामुळे काम तात्काळ थांबते. अचानक येणाऱ्या घनदाट धुक्यामुळे दृश्यमानता फक्त काही मीटरपर्यंत राहते.
अशा परिस्थितीत बांधकाम, वेल्डिंग आणि ब्रिजचे घटक जोडण्यासारख्या कामांसाठीही अत्यंत कौशल्य, धैर्य आणि संयमाची गरज असते. उंच दऱ्यांच्या कड्यावर उभे राहून अभियंते आणि कामगार जगातील सर्वोच्च सुरक्षा आणि गुणवत्ता मानकांनुसार काम करत आहेत.
मुंबई–पुणे एक्सप्रेस वे मिसिंग लिंक प्रोजेक्ट दोन पॅकेजमध्ये विभागला गेला आहे. पॅकेज I मध्ये १.७५ किमी आणि ८.९२ किमी लांबीच्या दोन आठ-लेन बोगद्यांचा समावेश आहे. पॅकेज II मध्ये दोन आठ-लेन ब्रिजसह (८५० मीटर आणि ६५० मीटर लांबीचे), एक्सप्रेसवेचे रुंदीकरण (६ लेनवरून ८ लेन), तसेच १० किमीहून अधिक पोच रस्त्यांचा समावेश आहे.
पॅकेज II मधील ६५० मीटर लांबीचा ब्रिज हा भारतातील सर्वात उंच रोड केबल-स्टेड ब्रिज असणार आहे. याचे काम ॲफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडकडून केले जात आहे. या पुलाचे पायलॉन (स्तंभ) तब्बल १८२ मीटर (५९७ फूट) उंच आहेत. ते मुंबईतील बांद्रा वरळी सी लिंकच्या १२८ मीटर पायलॉनपेक्षाही उंच आहेत आणि भारतात रस्त्यावर बांधल्या जाणाऱ्या ब्रिजपैकी सर्वाधिक उंच आहेत.
पायलॉन शाफ्टचे बांधकाम वरच्या दिशेने सेल्फ-क्लायंबिंग शटरिंग सिस्टीम वापरून गुरुत्वाकर्षण आणि सह्याद्रीच्या तीव्र वाऱ्यांना झुगारून पूर्णत्वास नेले. डेक सेगमेंटच्या बांधकामासाठी १८२ मीटर उंचीवर चार टॉवर क्रेन, प्रत्येकी ३५०-टन वजनाच्या आठ कॅन्टिलिव्हर फॉर्म ट्रॅव्हलर्स (CFTs) सोबत काम करतात. ते हळूहळू मोकळ्या जागेतून पुढे पुढे जात ब्रिजच्या डेक सेगमेंट एक एक करून बांधतात. दूरवरून दिसणारे १८२ मीटरचे पायलॉन एका खोल दरीच्या वर उंच जाणाऱ्या ब्रिजचा भाग असतील आणि त्यासाठी प्रत्येक डेक सेगमेंट अधिक अचूकतेने बांधला जात आहे.
एकेकाळी शिवाजी महाराजांच्या युद्धात सहयोगी असलेली सह्याद्री पर्वतरांग आता आधुनिक भारतातील अभियंत्यांच्या कल्पकतेला आव्हान देत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी रणनीतीद्वारे याच भूप्रदेशात शत्रूवर मात केली, तर अभियंते अभियांत्रिकी संरचनेच्या माध्यमातून त्यावर विजय मिळवत आहेत.
प्रकल्पातील पॅकेज-2 विषयी माहिती
प्रकल्प: मुंबई-पुणे एक्सप्रेसवे मिसिंग लिंक (पॅकेज-II)
ब्रिजची उंची: १३२ मीटर (भारताचा सर्वात उंच रोड केबल-स्टेड ब्रिज)
पायलॉन उंची: १८२ मीटर
व्हायाडक्ट I: ८५० मीटर
व्हायाडक्ट II (केबल-स्टेड): ६५० मीटर
एक्सप्रेसवेचा विस्तार: ६ लेनवरून ८ लेनपर्यंत (५.८६ किमी)
पोच रस्ते: १०.२ किमी
प्रकल्पाचे फायदे:
- प्रवास अंतर ६ किमीने कमी
- प्रवास वेळ २५ मिनिटांनी कमी
- इंधन बचत आणि प्रदूषणात घट
- दररोज १.५ लाख प्रवाशांसाठी अधिक सुरक्षित आणि सुलभ प्रवास
उंबरखिंड - तेव्हा आणि आता
१६६१: उंबरखिंडची लढाई
- २ फेब्रुवारी १६६१, अंबेनळी घाट परिसरात लढली गेली
- छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूठभर मावळ्यांनी कारतलब खानाच्या ३०,००० मुघल सैन्याचा पराभव केला
- अरुंद घाटात सापळा रचून भूभागाचा रणनीतीने वापर
- पर्वतांवरील प्रभुत्व आणि लढाईतील बुद्धिमत्तेचे प्रतीक
२०२५:
- ॲफकॉन्सचे अभियंते त्याच सह्याद्री पर्वतांना आधुनिक भारताच्या अभियांत्रिकी सामर्थ्याचे प्रतीक बनवत आहेत
- ज्या भूमीवर इतिहास लिहिला गेला, तिथेच आता एक अभियांत्रिकी चमत्कार उभा राहत आहे.























