Sadabhau Khot : सदाभाऊ खोत यांच्यावर गोरक्षकांकडून हल्ला, पुण्यात शेतकऱ्यांना जोरदार धक्काबुक्की अन् राडा
Sadabhau Khot Pune : सांगलीतील शेतकऱ्यांच्या 10 म्हशी गोरक्षकांनी जबरदस्तीने नेल्या होत्या. त्या परत आणायला गेल्यानंतर म्हशी पळून गेल्याचं उडवाउडवीची उत्तरं गोरक्षकांनी दिली होती.

पुणे : पुण्यात गोरक्षकांकडून आमदार सदाभाऊ खोत यांना धक्काबुक्की करण्यात आली आहे. पुण्यातील द्वारकाधीश गोशाळेजवळ ही घटना घडली. आमदार सदाभाऊ खोत यांनी गोरक्षकांबद्दल एक वक्तव्य केलं आणि त्यानंतर आक्रमक होत गोरक्षकांनी त्यांना धक्काबुक्की केल्याचा प्रकार घडला.
पुण्यातील फुरसुंगी येथे द्वारकादास गौशाळेत ठिकाणी आमदार सदाभाऊ खोत हे कार्यकर्त्यांसोबत गेले होते. त्यावेळी काही गौरक्षकांकडून त्यांना धक्काबुक्की करण्यात आली.
शेतकऱ्यांची जनावरे जबरदस्तीने गोशाळेत
या प्रकरणी बोलताना सदाभाऊ खोत म्हणाले की, "राज्यामध्ये गोवंश कायद्याच्या आडोशाने शेतकरी दुधाळ जनावरं विकायला गेले तरी त्यांना मारहाण केली जाते, त्यांची जनावरे जबरदस्तीने नेली जातात. पोलीस स्टेशनला ही जनावरे गेल्यानंतर ती गोशाळेत नेली जातात. त्यानंतर दिवसाला 200 ते 500 रुपये आकारले जाते. याचा निकाल जर वर्षाने किंवा दीड वर्षाने लागला तर शेतकरी दंड भरू शकत नाही. त्यामुळे ती जनावरे तो माघारी नेत नाही. साताऱ्यातील कोरेगाव तालुक्यातील 10 म्हशी आणि त्याची 11 पाडसे ही पुण्यातील द्वारकाधीश गोशाळेत आणण्यात आली होती. आज त्या म्हशी जाग्यावर आहेत की नाही हे पाहायला गेलो होतो. पण गोरक्षकांनी त्याला विरोध केला."
नेमकं काय प्रकरण?
दोन महिन्यांपूर्वी सांगलीच्या शेतकऱ्यांना मारहाण करून त्यांचा दहा म्हशी जबरदस्तीने फुरसुंगीच्या गोशाळेत नेऊन ठेवल्याचा आरोप केला जात होता. या प्रकरणी शेतकऱ्यांनी न्यायालयात जाऊन या म्हशी परत मिळवण्यासाठी आदेश मिळाले होते. तो आदेश घेऊन शेतकरी गोशाळेत म्हशी घेण्यासाठी गेल्यानंतर त्या म्हशी गोशाळेत नसल्याच लक्षात आलं.
गोशाळेत या प्रकरणी विचारपूस केल्यावर त्या ठिकाणच्या गोरक्षकांनी उडवाउडवीची दिली. म्हशींना चरायला डोंगरावर सोडल्यावर त्या निघून गेल्याचे उत्तर गोरक्षकांनी दिले. याप्रकरणात शेतकऱ्यांची ना दाद ना फिर्याद अशी परिस्थिती झाली. त्यामुळे या गोरक्षकांवर कारवाई करावी अशी मागणी सदाभाऊ खोत यांनी केली आहे.
गोरक्षकांकडून शेतकऱ्यांना त्रास
गोरक्षणाच्या नावाखाली राज्यात मोठी लॉबी सुरू असून त्यांचे कॉर्पोरेट ऑफिस आहेत. गोरक्षकांकडून शेतकऱ्यांना त्रास देण्याचं काम सुरू आहे. यावर सरकारने लक्ष घालून कारवाई करावी. शेतकऱ्यांना त्रास देणाऱ्या गोरक्षकांवर कारवाई झाली नाही तर पोलीस स्टेशन समोर आम्ही जनावराच्या छावण्या उभं करू असा इशारा सदाभाऊ खोत यांनी दिला होता. त्यांच्या याच वक्तव्यावरुन गोरक्षक आक्रमक झाल्याचं दिसून आलं.
ही बातमी वाचा:























