Pune Hinjwadi Bus Fire: 'बघतोच एकेएकाची वाट लावतो!', बस पेटवून देण्याआधी चालकाने दिलेली धमकी, पोलिस तपासात माहिती आली समोर
Pune Hinjwadi Bus Fire: हिंजवडीतील कंपनीच्या कर्मचाऱ्यांना घेऊन जाणारी मिनी बस पेटवून देऊन चौघांचा बळी घेणाऱ्या बसचालक जनार्दन हंबर्डीकर याने धमकी दिल्याची माहिती आहे.

पुणे: पुण्यातील हिंजवडीत (Pune Hinjwadi Bus Fire) टेम्पो ट्रॅव्हल्स जळीत कांड प्रकरणात झालेल्या खुलासा सर्वांनाच मोठा धक्का देणारा आहे. टेम्पो ट्रॅव्हल्सला आग लागली नाही तर चालकाने काही गोष्टीमुळे आलेल्या रागातून गाडी पेटवल्याचं तपासात निष्पन्न झालं आहे. या प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. ही आगीची घटना होण्याआधी या चालकाने अगोदरच्या दिवशीच धमकी दिल्याचं समोर आलं आहे. हिंजवडीतील कंपनीच्या कर्मचाऱ्यांना घेऊन जाणारी मिनी बस पेटवून देऊन चौघांचा बळी घेणाऱ्या बसचालक जनार्दन हंबर्डीकर ऊर्फ मामा याने 'बघतोच, एकेकाची वाट लावतो!' अशी धमकी घटनेच्या आदल्याच दिवशी दिली होती, अशी माहिती पोलिस तपासात समोर आली आहे.
कंपनीतील कर्मचाऱ्यासमोर तो असे बोलल्याचं पोलिस तपासात पुढे आलं आहे. शिवाय बसमध्ये त्याचे सख्खे भाऊजी (मेहुणे) असल्याचेही उघडकीस आले आहे. हिंजवडीतील राजीव गांधी आयटी पार्क येथील फेज एकमध्ये बुधवार (दि. 19) मिनी बसला आग लागून व्योमा ग्राफिक्स कंपनीतील चार कर्मचाऱ्यांचा होरपळून मृत्यू झाला होता. दिवाळीचा बोनस व पगार कापल्याच्या आणि मजुरांचे काम सांगितल्याच्या रागातून, सहकारी कर्मचाऱ्यांशी असलेल्या वादातून जनार्दन हंबर्डीकर या बसचालकानेच बस पेटवून दिल्याचे समोर आले होते. पोलिस उपनिरीक्षक दत्ता काळे यांनी फिर्याद दिली आहे.
बसचालकावर खून आणि खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी व्योमा ग्राफिक्सच्या कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू ठेवली आहे. त्यातील प्रवीण रमेश कापडे (वय 32) यांनी सांगितले की, जनार्दन मामा विचित्र स्वभावाचा आहे. त्याने सहा महिन्यांमध्ये अनेकदा क्षुल्लक कारणांवरून कर्मचाऱ्यांशी वाद घातला होता. घटनेच्या एक दिवस अगोदर तो डबा घेऊन जात असताना मी कंपनीतील केबिनबाहेर उभा होतो. तेव्हा तो म्हणत होता की, 'हे सगळे लय भारी झाले आहेत. यांच्याकडे बघतोच, एकेकाची वाट लावतो.' त्यानंतर त्याने बस पेटवून कर्मचाऱ्यांना मारण्याचा कट रचल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.
तपासाला दिशा कशी मिळाली?
घटनेनंतर तपासाची चक्रे फिरली. गुरुवारी त्या बसमधील सहकारी विठ्ठल गेनू दिघे (55, रा. भुगाव) व विकास कृष्णराव गोडसे (53, रा. कोथरुड) यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे की, 'बस विप्रो सर्कल येथून जात असताना जनार्दनने ती थांबवली. खाली वाकून उजव्या बाजूचा दरवाजा उघडला. पायाजवळ काहीतरी हालचाल केली आणि दरवाजा पुन्हा लॉक केला. तेव्हा बसमध्ये उग्र वास आला. मात्र कोणत्याही प्रकारच्या स्पार्कचा आवाज झाला नाही. त्यानंतर बस थोडे अंतर पुढे गेल्यानंतर त्याच्या उजव्या पायाजवळ आग लागून धूर येताना दिसला. त्याचवेळी त्याने बस सुरू ठेवून डाव्या दरवाजातून उडी मारली. तेव्हा अचानक आगीचा भडका उडाला. त्यानंतर आम्ही बसमधून खाली उडी मारली. या दोघांच्या जबाबानंतर पोलिसांना दिशा मिळाली. तर बसमध्ये शॉर्टसर्कीट झालं असतं तर क्षणार्धात इतको मोठा भडका उडाला नसता असाही संशय पोलिसांना होता. त्यानंतर पोलिसांनी चालकाला ताब्यात घेऊन चौकशी केली अन् त्याने घडलेलं सर्व सांगितलं.
जनार्दनला गोवले जात असल्याचा पत्नी अन् भावाचा आरोप
या प्रकरणात जनार्दनला गोवले जात असल्याचा आरोप त्याची पत्नी आणि भावाने काल (शुक्रवारी) माध्यमांशी बोलताना केला आहे. बसमध्ये जनार्दनचे सख्खे भाऊजीही होते, त्यामुळे तो आग कशी लावेल ? कोणताही भाऊ आपल्या बहिणीच्या नवऱ्याचा जीव धोक्यात घातला? घटनेत वाचलेल्यांपैकी काही जणांना खरचटलेही नाही. त्यामुळे पेटत्या बसमधून ते सुखरूप बाहेर कसे पडले? कंपनीतून केमिकल आणताना जनार्दनला कंपनीतील कोणीच का रोखले नाही, असे प्रश्न जनार्दनच्या कुटुंबीयांनी उपस्थित केले आहेत. 'बोनस, पगार मिळाला नसल्याबाबत नवऱ्याने काहीच सांगितलेले नाही. मला दिवाळीला त्यांनी पैसे दिले होते. त्यांना पैसे मिळाले नसते तर त्यांनी मला दिले असते का? त्यामुळे हे कारण खोटे आहे. याचा योग्य तपास व्हावा,' असे जनार्दनची पत्नी नेहा हंबर्डीकर म्हणाल्या आहेत.
तर त्या चौघांचा जीव वाचला असता...
तसेच टेम्पो ट्रॅव्हल्समध्ये ही इमर्जन्सी एक्झिटजवळ अडथळा आणल्याचं समोर आलं आहे. गाडीची निर्मिती करताना तीन सीट्स असताना, तिथं चार सीट्स कशा काय होत्या? हा बदल नेमका कोणी आणि कशासाठी केला? ही चौथी सीट नसती तर कदाचित इमर्जन्सी एक्झिट डोअर उघडता आलं असतं आणि चार कर्मचाऱ्यांचा जीव ही वाचला असता.
बेंझिन किती ज्वलनशील आहे, याची कल्पना व्युमा ग्राफिक्स कंपनीला नक्कीच आहे. तरी त्यांनी हा निष्काळजीपणा केल्याचं आता सिद्ध होत आहे. तसेच टेम्पो ट्रॅव्हल्समध्ये इमर्जन्सी एक्झिटला अडथळा ठरणाऱ्या चौथ्या सीट्सकडे व्युमा ग्राफिक्स कंपनी दुर्लक्ष केल्याचं ही स्पष्ट झाले आहे. कंपनीच्या या दोन चुकांमध्ये चार कर्मचाऱ्यांना नाहक जीव गमवावा लागला आहे. त्यामुळं हिंजवडी पोलीस व्युमा ग्राफिक्स कंपनीतील आणखी कोणाला याबाबत दोषी धरलं जाणार? आणि कोणावर गुन्हा दाखल केला जाणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

