![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Sharad Pawar on Devendra Fadnavis : शरद पवारांनी मान्य केला फडणवीसांचा 'चमत्कार', म्हणाले....
Sharad Pawar on Devendra Fadnavis : राज्यसभा निवडणूक निकालात झालेला चमत्कार मान्य करावा लागणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले.
![Sharad Pawar on Devendra Fadnavis : शरद पवारांनी मान्य केला फडणवीसांचा 'चमत्कार', म्हणाले.... maharashtra rajya sabha election 2022 result ncp chief sharad pawar praise opposition leader devendra fadnavis Sharad Pawar on Devendra Fadnavis : शरद पवारांनी मान्य केला फडणवीसांचा 'चमत्कार', म्हणाले....](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/11/14ac227c353812046651b883602a168a_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Sharad Pawar on Devendra Fadnavis : राज्यसभा निवडणूक निकालाचा फारसा धक्का बसला नसल्याची प्रतिक्रिया व्यक्त करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी निवडणूक निकालात झालेला चमत्कार मान्य केला आहे. शरद पवार यांनी राज्यसभा निवडणूक निकालानंतर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. यावेळी त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यशैलीबाबतही भाष्य केले.
शरद पवार यांनी म्हटले की, सहाव्या जागेसाठी दोन्ही बाजूकडे आवश्यक संख्याबळ नव्हते. आम्हाला पाठिंबा देणाऱ्या अपक्षांना आपल्या बाजूने वळवण्यात भाजपला यश आले. त्यामुळे हा निकाल लागला. हा चमत्कार मला मान्य करावे लागेल असेही त्यांनी म्हटले. देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सहकाऱ्यांना विविध मार्गाने या अपक्षांना आपल्या बाजूने वळवण्यात यश आले असल्याचे पवार यांनी म्हटले.
भाजपने राज्यसभा निवडणुकीत सहावी जागा जिंकली. भाजपच्या या विजयाचे राज्याच्या राजकारणात पडसाद उमटण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी केलेले देवेंद्र फडणवीसांचे उपरोधिक कौतुक महत्त्वाचे असल्याचे म्हटले जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचेही कौतुक केले. शिवसेनेकडे फारसे संख्याबळ नसतानाही त्यांनी ही जागा लढवली. राजकारणात जोखीम पत्करावी लागते. शिवसेनेकडे असलेल्या मतांपेक्षा अधिक मते त्यांनी घेतली असल्याचे पवार यांनी सांगितले.
महाविकास आघाडीची मते फुटली नाहीत
या राज्यसभा निवडणुकीत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या उमेदवारांना मिळालेल्या मतांची संख्या पाहता महाविकास आघाडीची मते फुटली नसल्याचे दिसून आले असल्याचे पवार यांनी म्हटले. भाजपला झालेले मतदान हे अपक्षांचे असल्याचे त्यांनी म्हटले.
प्रफुल्ल पटेल यांना भाजपच्या गोटातून मतदान
प्रफुल्ल पटेल यांना एक अतिरिक्त मत मिळाले असून हे मत भाजपच्या गोटात असणाऱ्या अपक्षाचे असल्याचे शरद पवार यांनी म्हटले. प्रफुल्ल पटेल यांना आलेले विरोधकांच्या गोटातून आलेले अतिरिक्त मत हे शिवसेनेला जाणारे नव्हते. ते मत फक्त राष्ट्रवादीकडे येणार होते. हे मत देणाऱ्या व्यक्तीने मला याची कल्पना दिली होती. विरोधकांच्या गोटात माझ्यासोबत काम केलेले काहीजण आहेत असेही पवार यांनी म्हटले.
सरकारच्या स्थिरतेवर परिणाम नाही
राज्य सरकारच्या स्थिरतेवर कोणताही परिणाम होणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सरकारसाठी आवश्यक असणारे संख्याबळ महाविकास आघाडीकडे आहे हे या मतांवरून स्पष्ट दिसून येत असल्याचे पवार यांनी म्हटले.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)