MNS MVA Alliance: महायुतीविरोधात मनसे अन् मविआ एकत्र येण्यावर शिक्कामोर्तब? युतीचा शुभांरभ ठाण्यातून? जितेंद्र आव्हाडांच्या पोस्टमुळे चर्चा
MNS MVA Alliance: आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी महायुतीविरोधात हे पक्ष एकत्र येण्याचे हे पहिले पाऊल मानले जात आहे. लवकरच मोर्चा काढण्याचीही चर्चा आहे.

ठाणे: ठाण्यामध्ये महायुती विरोधात महाविकास आघाडी (MVA) आणि मनसे (MNS) एकत्र येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांच्या पक्षाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्या नाद निवासस्थानी महाविकास आघाडी (MVA) आणि मनसेच्या (MNS) नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीला ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी खासदार राजन विचारे, मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण उपस्थित होते. जितेंद्र आव्हाड यांनी स्वतः या बैठकीचा व्हिडिओ शेअर केला आहे. आव्हाड यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, "मी, ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी खासदार राजन विचारे, मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण अशा आम्हा चौघांमध्ये ठाण्यातील विविध प्रश्नांबाबत नागरिक समस्यांबाबत सुमारे तासभर चर्चा झाली." ठाण्यातील वाहतूक कोंडी, डंपिंग, पाणीटंचाई आणि रस्ते-मेट्रोमुळे निर्माण झालेल्या नागरी समस्यांवर चर्चा झाली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी महायुतीविरोधात हे पक्ष एकत्र येण्याचे हे पहिले पाऊल मानले जात आहे. लवकरच मोर्चा काढण्याचीही चर्चा आहे.
या बैठकीनंतर आता ठाण्यामध्ये महाविकास आघाडी आणि मनसे एकत्र येणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण ठाण्यामध्ये महायुती विरोधात मनसेच्या महत्त्वाच्या नेत्यांची आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक पार पडली आहे. मग यामध्ये मनसेच्या एंट्रीचा शुभारंभ ठाण्यातून होणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. जितेंद्र आव्हाड यांच्या ठाण्यातील नाद निवासस्थानी एक बैठक पार पडली आहे, राजन विचारे, विक्रांत चव्हाण, अविनाश जाधव हे बैठकीला उपस्थित होते. बैठकीचा व्हिडिओ जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या सोशल मीडियावरती शेअर केला आहे. त्याचबरोबर त्यांनी ठाण्यातील विविध प्रश्नांबाबत समस्यांबाबत तासभर चर्चा झाल्याची माहिती त्या पोस्टमध्ये दिली आहे.
View this post on Instagram
जितेंद्र आव्हाड यांची सोशल मीडिया पोस्ट काय?
जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या बैठकीची माहिती सोशल मिडीयावरती पोस्ट शेअर केली आहे, मी, शिवसेना (उबाठा) चे माजी खासदार राजन विचारे, मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण अशा आम्हा चौघांमध्ये ठाण्यातील विविध प्रश्नांबाबत, नागरी समस्यांबाबत सुमारे तासभर चर्चा झाली.
ठाण्यातील ट्रॅफिकचा मुद्दा, पाणीटंचाईचा मुद्दा आणि रस्ते, मेट्रो त्यामुळे होणारे वाहतूक कोंडी आणि नागरी समस्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. त्यासाठी आता हे सर्व विरोधी पक्ष सरकारच्या विरोधात एकवटताना दिसून येत आहेत. आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या वेळी हा मुद्दा उचलून धरला जाईल पण विशेष बाब म्हणजे एकीकडे महाविकास आघाडीच्या बैठकीत मनसेचे नेते दिसायला लागले आहेत, जितेंद्र आव्हाड यांच्या घरी बैठकीवेळी शिवसेनेचे नेते राजन विचारे, काँग्रेसचे शहर प्रमुख विक्रांत चव्हाण, आणि मनसेचे ठाणे शहराध्यक्ष अविनाश जाधव यांची देखील उपस्थिती चर्चेचा विषय ठरत आहे. आत्ता एकत्र दिसत असलेले नेते आगामी काळात देखील निवडणुकीत देखील एकत्र येण्याची शक्यता आहे, त्यामुळे महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी आणि सोबतच मनसे एकत्र येण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्याच्या पाऊल खुणा या बैठकीच्या माध्यमातून दिसून येत आहेत.
























