युनेस्कोच्या यादीत 12 किल्ले; मोदी सरकारचे कान टोचणाऱ्या राज ठाकरेंना मंत्री आशिष शेलारांचे उत्तर
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 किल्यांना युनेस्कोकडून "मराठा लष्करी भूप्रदेश" म्हणून मानांकन मिळाल्याबद्दलचा आनंद राज ठाकरे यांनी व्यक्त केला त्याबद्दल आभार

मुंबई : छत्रपती शिवजी महाराजांच्या गडकिल्ल्यांचे संवर्धनाचा विषय नेहमीच पुढे येत असतो. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी महाराजांचे गड किल्ले हेच आपलं वैभव आहे, त्यांचे पुतळे उभारण्यापेक्षा या गडकिल्ल्यांचे जतन आणि संवर्धन शासनाने करायला पाहिजे, अशी भूमिका सातत्याने घेत असतात. त्यातच, आता युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत देशातील 12 गड किल्ल्यांचा समावेश झाला आहे. त्यामध्ये, महाराष्ट्रातील 11 किल्ले असून तामिळनाडूतील जिंजी हा एकमेव किल्ला (Fort) आहे. राज ठाकरेंकडून युनेक्सोच्या यादीत 12 किल्ले गेल्याच्या निर्णयाचं स्वागत केलं असून सरकारचे कानही टोचले आहेत. आता, भाजपचे मुंबई अध्यक्ष आणि सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार (Ashish shelar) यांनी राज ठाकरेंचे आभार मानत त्यांना प्रत्युत्तरही दिले आहे.
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 किल्यांना युनेस्कोकडून "मराठा लष्करी भूप्रदेश" म्हणून मानांकन मिळाल्याबद्दलचा आनंद राज ठाकरे यांनी व्यक्त केला त्याबद्दल आभार, त्यांनी काही काळजीचे मुद्दे उपस्थित केले आहेत. आस्थेने उपस्थित केलेल्या त्या मुद्यांबाबत शासनाची भूमिका स्पष्ट करतो, असे म्हणत आशिष शेलार यांनी राज ठाकरेंना एकप्रकारे उत्तरच दिले आहे. आमच्या विभागाची टीम सर्व तांत्रिक आणि व्यवस्थापनात्मक बाबी हाताळण्यास सक्षम आहे असा मला विश्वास आहे, असे आशिष शेलार यांनी म्हटलं.
मंत्री शेलार यांनी मांडली भूमिका
जागतिक वारसा म्हणून एखादी वास्तू युनेस्को घोषित करते ही अतिशय दीर्घ किचकट आणि गुंतागुंतीची प्रक्रिया आहे.
त्याच्यातील सर्व तांत्रिक बाबी उदाहराणार्थ, सरकारने या सगळ्या वास्तूंना कायदेशीर संरक्षण दिले आहे किंवा कसे? या किल्ल्यांच्या जतन संवर्धनासाठी सरकारने पैसा निधी उपलब्ध करून दिला आहे काय?
किंवा सद्यस्थितीत जतन संवर्धनाच्या उत्तम अवस्थेत नसले तरी पुढील काही वर्षासाठी त्यांचा जतन व संवर्धनाचा कार्यक्रम किंवा आराखडा निश्चित केला आहे का? या किल्ल्यांच्या व्यवस्थापनाचा आराखडा आहे काय? या तांत्रिक बाबी युनेस्को काटेकोरपणे तपासून बघते.
यातील प्रत्येक किल्ला हा केंद्र अथवा राज्य सुरक्षित वास्तू आहे.
ह्या प्रत्येक किल्ल्याचा शास्त्रशुद्ध व्यवस्थापन आणि संवर्धन आराखडा तयार आहे आणि या किल्ल्यांच्या व्यवस्थापनासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक राज्यस्तरीय समिती असून प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांच्या अंतर्गत त्या त्या जिल्ह्यातील स्वतंत्र समिती आहे
तसेच प्रत्येक किल्ल्याची आता वेगळी समिती होऊ घातली आहे.
सरकार अतिशय नियोजनबद्ध व शास्त्रशुद्ध पद्धतीने किल्ल्यांचा जागतिक वारसा हा विषय हाताळत आहे.
अतिक्रमणे हटवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्याचा शासन निर्णय आम्ही काढला.
31 जानेवारी 2025 पर्यंत सर्व किल्ल्यांवरील अतिक्रमणांचे सर्वेक्षण करण्यात आले असून यातील काही काढून टाकण्यात आली आहेत. तर काहींवर कारवाई सुरु आहे. तसेच देशभरातून आलेल्या सात प्रस्तावातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ह्या आपल्या प्रस्तावाची निवड केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्ली ते पॅरिस या सगळ्या गोष्टींचा पाठपुरावा करण्यासाठी भक्कम बळ दिले.
आमच्या विभागाची टीम सर्व तांत्रिक आणि व्यवस्थापनात्मक बाबी हाताळण्यास सक्षम आहे असा मला विश्वास आहे.
दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांना जागतिक वारसाचा दर्जा मिळाला आहे. महाराजांच्या 12 किल्ल्यांची नावे युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये झळकली आहेत. महाराष्ट्रासाठी ही अतिशय अभिमानाची बाब असून या संदर्भात आनंद साजरा करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथील महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून भाजपा तर्फे सेलिब्रेशन करण्यात येणार आहे.
काय म्हणाले होते राज ठाकरे
युनेस्कोने जागतिक वारसा दर्जा दिला म्हणून युनेस्कोसारख्या संस्थांना गृहीत धरता येत नाही. जर निकष नीट नाही पाळले तर युनेस्को हा दर्जा काढून घेतं असं म्हणत सरकारचे कान टोचले आहेत . सरकारने फक्त आनंद साजरा करू नये तर एका मोठ्या जबाबदारीचं भान देखील बाळगावं.गडकिल्ल्यांवरची जी काही अनधिकृत बांधकामं आहेत ती तात्काळ पाडून टाका ! त्यात जात - धर्म पहाण्याची गरज नाही ! असा सल्लाही त्यांनी दिलाय
हेही वाचा
कुनो नॅशनल पार्कमधील नाभाचा मृत्यू, चित्त्यांची संख्या घटली; पोस्टमार्टम रिपोर्टमधून कारण समोर येणार

























