सदाभाऊ म्हणाले, फडणवीसांसाठी प्राणही देईन; राजू शेट्टींचा पलटवार, लवकर देऊन टाका, म्हणजे महाराष्ट्र मोकळा होईल
शेतकऱ्याला आता आधाराची गरज आहे. पण, सरकार मीठ चोळण्याचे काम करत आहे. सोलापुरात देखील प्रचंड नुकसान झाले आहे, माती वाहून गेलीय, विहिरी बुजल्या आहेत

सोलापूर : राज्यातील मराठवाड्यात गेल्या 8 दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यासाठी, आज शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Raju shetti) यांनी सोलापूर आणि धाराशिवमध्ये पाहणी दौरा केला. यावेळी, सरकारवर जोरदार टीका करत, माजी सहकारी आणि आमदार सदाभाऊ खोत (Sadabhau khot) यांनाही जोरदार टोला लगावला. धाराशिवमध्ये राणी बारकूल नावाच्या महिला आंदोलन करत आहेत, त्यांच्या सासऱ्याला अतिवृष्टीमुळे धक्का बसला आणि त्यांचा मृत्यू झाला. त्या भगिनीची समजूत घालून त्यांचे उपोषण सोडायला लावले. तसेच, येथील पाच ते सहा आत्महत्याग्रस्त कुटुंबातील लोकांची भेट घेतल्याचे राजू शेट्टींनी सांगितले.
शेतकऱ्याला आता आधाराची गरज आहे. पण, सरकार मीठ चोळण्याचे काम करत आहे. सोलापुरात देखील प्रचंड नुकसान झाले आहे, माती वाहून गेलीय, विहिरी बुजल्या आहेत. पिकांची गिनती करता येणार नाही, अशी स्थिती आहे. जलसंपदा आणि जिल्हा प्रशासन यांच्या समन्वयाचा अभाव असल्याचेही शेट्टींनी म्हटले.
जनतेचे, शेतकऱ्यांचे मूळ प्रश्न बाजूला रहाव्यात यासाठी सरकारने काही माणसं पेरली आहेत. जी जाणीवपूर्वक वादग्रस्त वक्तव्य करतात आणि विषय दुसरीकडे नेतात, माध्यम देखील यातून सुटलेले नाहीत, असे म्हणत अप्रत्यक्षपणे भाजप नेत्यांवर टीका केली. तसेच, सदाभाऊ खोत यांनाही खोचक टोला लगावला. रयत क्रांती संघटनेचे प्रमुख आणि आमदार सदाभाऊ खोत यांच्या वक्तव्यावर शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीससाठी प्राण देऊ, असे वक्तव्य सदाभाऊ खोत यांनी केले होते. त्यावर, प्रतिक्रिया देताना राजू शेट्टी म्हणाले, ज्यांना ज्यांना प्राण द्यायचं आहे, त्यांना देऊन टाका म्हणा लवकर, म्हणजे महाराष्ट्र मोकळा होईल एकदाचा, असा खोचक टोला शेट्टींनी लगावला. तसेच, प्राण द्या म्हणा एकदा, आम्हाला त्यांची निष्ठा तपासायची आहे, असेही त्यांनी म्हटले.
फडणवीसांनी अमित शाहांना यादी द्यावी
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री सहायत निधीच्या फंडावरुन साखर कारखान्यांना इशाराच दिला आहे. शेतकऱ्यांचा काटा मारणाऱ्या साखर कारखान्यांची यादीच माझ्याकडे आहे, असे फडणवीसांनी म्हटलं होतं. त्यावरुन, राजू शेट्टींनी पलटवार केला आहे. शरद पवारांना ही यादी कशाला देता, अमित शाह यांना द्या, असे राजू शेट्टींनी म्हटले. तसेच, तुम्ही कारवाई करा? पवारांना यादी देऊन काय करणार ते काय सत्तेत आहेत का? असा सवाल देखील राजू शेट्टींनी विचारला. सरकारमध्ये बसलेल्या लोकांचं आणि शेतकऱ्यांचा काही संबंध आहे का? हे तपासायला पाहिजे. एकनाथ शिंदे याना कळलं आहे की शेतकऱ्यांपेक्षा जास्त पैसा रस्त्यात आहे. अजित पवार यांच्या लीला काय सांगाव्यात? असे म्हणत दोन्ही नेत्यांवर जोरदार टीका केली. अमित शाह यांनी बरोबरच म्हटलं हे सगळे बनियापेक्षा मोठं आहेत, बिहारमध्ये निवडणुका असल्याने तिथं केंद्राने जास्त मदत केली. पण, सर्वात जास्त जीएसटी महाराष्ट्र भरत असला तरीही येथे मदत दिली जात नाही, कारण गृहीत धरलं जातं आहे, असेही राजू शेट्टींनी म्हटलं.
हेही वाचा
फेरीबोट समुद्रात फसली, शेकडो प्रवासी अडकले, किनाऱ्यावर येताच जीव भांड्यात पडला; विरारमधील थरारक घटना
























