आमदाराला 2 कोटी, पण मी आमदार नसताना मला 20 कोटी मिळतात, सदा सरवणकरांचे वक्तव्य चर्चेत; ठाकरे गटाचा पलटवार
पराभूत जरी झालो असलो तरी आपल नेतृत्व म्हणजे मुख्यमंत्रीसाहेब आणि एकनाथ शिंदे साहेब माझ्यामागे सक्षम आहेत. याअगोदर देखील आमदारांच्या निधीबद्दल आमदारांनी तक्रार केली होती.

मुंबई : माजी आमदार सदा सरवणकर यांच्या वादग्रस्त वक्तव्याने आता राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा सत्ताधारी आमदारांना मिळत असलेल्या निधीची आणि विरोधी पक्षातील आमदारांवर होत असलेल्या अन्यायाची चर्चा चव्हाट्यावर आली आहे. आताच्या आमदाराला (MLA) 2 कोटी मिळतात. मात्र, मी आमदार नसताना मला 20 कोटी मिळतात, असे वक्तव्य माहिम मतदारसंघाचे माजी आमदार आणि शिवसेना उमेदवार सदा सरवणकर (Sada sarvankar) यांनी केले आहे. सदा सरवणकर यांनी थेट शिवसेना ठाकरे गटाचे आमदार महेश सावंत (Mahesh sawant) यांच्यावर टीका करताना सरकारमध्ये आजही आपली चलती असल्याचेच सांगितले. त्यावरुन, आता शिवसेना ठाकरे गटाकडून त्यांच्यावर टीका होत आहे.
पराभूत जरी झालो असलो तरी आपल नेतृत्व म्हणजे मुख्यमंत्रीसाहेब आणि एकनाथ शिंदे साहेब माझ्यामागे सक्षम आहेत. याअगोदर देखील आमदारांच्या निधीबद्दल आमदारांनी तक्रार केली होती. प्रत्येक बिल्डिंगमध्ये मी काम केली पण काम केल्याने पराभव होतो, हा माझा अनुभव आहे. पण, काम न करणारे जिंकून येतात, तेही फक्त जाती पातीवर जिंकून येतात, असे सदा सरवणकर यांनी म्हटले. माहीम विधानसभा मतदारसंघातून झालेल्या पराभवावर भाष्य करताना सदा सरवणकर यांनी मनातील खदखद बोलून दाखवली. तसेच, मी आमदार नसताना मला 20 कोटी मिळतात. मी सगळीकडे उदघाटन करताना दिसतोय कारण आपला पिंड हा कामाचा आहे, असेही त्यांनी म्हटले. आता, सरवणकर यांच्या वक्तव्यावरुन टीका होत असून आमदार महेश सावंत यांनीही त्यांच्यावर पलटवार केला आहे.
हा वैयक्तिक विकासाचा निधी
20 ते 40 वर्षे इथे सत्ता गाजवली, त्यांच्यापेक्षा कोणीच मोठा नाही अशी त्यांची भावना होती. मात्र जनतेने त्यांचा भ्रम दूर केला. लोकांनी घरी बसण्याचा सल्ला दिलेला असताना देखील 20 कोटींचा निधी त्यांना मिळाला. माजी आमदारांना खैरात वाटली जाते, मानधन बंद झालंय मग स्वतःचा विकास कसा होणार, असा सवाल आमदार महेश सावंत यांनी उपस्थित केलाय. तसेच, हा वैयक्तिक विकासाचा निधी आहे, असा टोलाही सावंत यांनी लगावला
विधानसभा अध्यक्षांकडे तक्रार करणार
मर्जीतले आमदार असल्यामुळे त्यांना निधी वाटप होतोय, ही पद्धत चुकीची आहे. त्यांना 20 कोटी मिळतात मग आम्हाला 40 कोटी निधी देण्यात यावा. आत्तापर्यंत त्यांना वेगवेगळ्या कामांसाठी 500 कोटींचा निधी मिळाला, मग हे सगळे पैसे गेले कुठे? असा सवालही महेश सावंत यांनी उपस्थित केला आहे. विधानसभा अध्यक्ष तसेच मुख्यमंत्र्यांकडे आपण याबाबत तक्रार करणार आहोत. माहीम, दादर, माटुंगा आणि प्रभादेवी येथील जनतेचा हा अपमान आहे. ज्याला जनतेने निवडून दिले त्याला निधी न देता दुसऱ्याला निधी देणे ही मतदारांची घोर निराशा आहे, असेही आमदार सावंत यांनी म्हटले.
सत्ताधारी पक्षातल्यांना मुजोरी चढली
आता जनतेला समजलं की कशाप्रकारे निधी वाटला जात आहे, आता ईडीनी यांची चौकशी करायला पाहिजे. एका प्रकारची मुजोरीच म्हणायला पाहिजे. सत्ताधारी पक्षातल्या अनेक नेत्यांना मुजोरी चढली आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेना ठाकरे गटाचे अखिल चित्रे यांनी म्हटले.
हेही वाचा
'राज ठाकरेंनी भेटायला बोलावलं, म्हणाले, इथे हिंदीत बोला...'; संजय मिश्रा यांनी सांगितला 'तो' किस्सा























