Ramdas Kadam and bharat Gogawale : पालकमंत्रीपद हवं असेल तर मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाचं बघा; रामदास कदमांचा शिंदेंसमोरच गोगावलेंना मिश्कील टोला; भरत गोगावले म्हणाले...
Ramdas Kadam and bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रीपदावरून शिवसेनेचे भरत गोगावले आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या अदिती तटकरे यांच्यात जोरदार रस्सीखेच सुरु आहे.

Ramdas Kadam and bharat Gogawale : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी 18 जानेवारी रोजी पालकमंत्र्यांची यादी जाहीर केली होती. या यादीनुसार नाशिकसाठी भाजपचे गिरीश महाजन (Girish Mahajan) तर रायगडसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अदिती तटकरे (Aditi Tatkare) यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, या घोषणेनंतर शिवसेना शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले (Bharat Gogawale) आणि मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांच्या समर्थकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. परिणामी, केवळ 24 तासांत नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रिपदांसंदर्भातील निर्णय तात्पुरता स्थगित करण्यात आला. सध्या महायुतीमध्ये नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा अजूनही सुटलेला नाही. आता शिवसेना नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाचा धागा पकडत मंत्री भरत गोगावले यांना मिश्कील टोला लगावला आहे.
शिवसेना नेते रामदास कदम यांच्या वाढदिवसानिमित्त खेडमध्ये आलेले महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या हस्ते स्व. मीनाताई ठाकरे सांस्कृतिक केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमात रामदास कदम आणि मंत्री भरत गोगावले यांच्यात झालेल्या संवादाची जोरदार चर्चा रंगली आहे. पालकमंत्री व्हायचे असेल तर मुंबई गोवा महामार्ग नीट करा. पंधरा वर्षे झाली तरी आपला वनवास संपत नाही, असे आवाहन रामदास कदम यांनी मंत्री भरत गोगावले यांना एकनाथ शिंदे यांच्या समोरच केले. कोकण शिवसेनेचे म्हणून हायवेला पैसे मिळत नाही का? असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला.
तुम्हाला पालकमंत्री व्हायचे असेल तर...
आपल्या भाषणात रामदास कदम म्हणाले की, भरत भोगावले तुम्ही जत्रेमध्ये कुठे तरी तलवारी असतील, त्या बाहेर काढा. तुमच्या माणगावमध्ये तीन तास जातात. आता पंधरा वर्षे झाली. प्रभू रामचंद्राचा वनवास 14 वर्षांनी संपला. आम्हाला पंधरा वर्षे झाले तरी आमचा वनवास संपत नाही. भरत गोगावले तुम्ही पुढाकार घ्या, तुम्हाला पालकमंत्री व्हायचे असेल तर कोकणातल्या लोकांच्या दुवा घ्या, असे त्यांनी म्हटले.
एका वर्षाच्या आत काम करून घेतो : भरत गोगावले
तर रामदास कदमांच्या वक्तव्यावर तात्काळ प्रतिसाद देत भरत गोगावले यांनी एका वर्षाच्या आत काम करून घेतो, असे म्हटले. त्यावर रामदास कदम मिश्कील पणे बोलताना म्हणाले, पंकज अंभोरे यांच्याकडून एक वर्ष पालकमंत्री नाही, हे एकनाथ शिंदे ठरवतील. तर गोगावले यांनी भाई तुम्ही माझी खाट टाका, असे वक्तव्य केले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर रामदास कदम यांनी मुंबई-गोवा महामार्गाच्या अवस्थेवरून भरत गोगावले यांची फिरकी घेतली. यामुळे रामदास कदम आणि भरत गोगावले यांच्या या संवादाची आता जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
रामदास कदमांचा एकनाथ शिंदेंना मिश्कील टोला
दरम्यान, शिंदे साहेब रस्त्याने आलात हे एक मोठं काम केलं. आता पुन्हा मंत्रालयात गेल्यानंतर काय करायचं ते बघा, असे म्हणत मुंबई-गोवा महामार्गाच्या अवस्थेवरून रामदास कदम यांनी एकनाथ शिंदे यांना देखील मिश्किल टोला लगावला. गणपती आले की ठिगळ लावतात, गणपती विसर्जन होईपर्यंत पुन्हा खड्डे पडतात. सगळा कोकण शिवसेनेचाच आहे. पण, ते खड्ड्याच बघा, असेही रामदास कदम यांनी म्हटले आहे.
आणखी वाचा
























