Raj Thackeray and RSS Mohan Bhagwant: भाषेच्या आधारावर भेदभाव म्हणजे आजार म्हणणाऱ्या मोहन भागवतांना राज ठाकरेंनी सुनावलं, म्हणाले, 'मराठी आमच्यासाठी सर्वोच्च प्राधान्य...'
Raj Thackeray and RSS Mohan Bhagwant: मोहन भागवतांनी महाराष्ट्रातील मराठी-अमराठी वादावर टिप्पणी करताना भाषिक भेदभाव म्हणजे आजार असल्याचे म्हटले होते. या वक्तव्याला मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

Raj Thackeray and RSS Mohan Bhagwant: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नुकत्याच मुंबईत पार पडलेल्या दोन दिवसीय व्याख्यानमालेत सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी भाषिक वादाबाबत एक वक्तव्य केले होते. भाषेच्या आधारावर वाद करणे म्हणजे स्थानिक आजार असल्याची टिप्पणी त्यांनी केली होती. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील मराठी (Marathi) विरुद्ध अमराठी (Non Marathi) वादाचा दाखला दिला होता. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाल्यानंतर मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत आपले विचार परखडपणे मांडले आहेत. तुम्ही काय करावं हे तुमच्यापाशी. आमच्यासाठी मराठी भाषा आणि मराठी माणूस (Marathi Manoos) हे अंतिम सर्वोच्च प्राधान्य आहे. या देशात भाषिक आणि प्रांतिक अस्मिता या राहणारच, तशाच त्या महाराष्ट्रात देखील राहणारंच, असे राज ठाकरे यांनी या पोस्टमध्ये ठणकावून सांगितले आहे. (Maharashtra Politics news)
Mohan Bhagwat on Marathi: मोहन भागवत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या व्याख्यानमालेत नेमकं काय म्हणाले?
समाजात भाषेच्या आधारावर भेदभाव आहे, असे नाही. जेव्हा काही लोकांकडून तशी मांडणी केली जाते तेव्हा काही लोकांच्या हातून तसं घडतं. याचा अर्थ सर्व मराठी भाषिक लोक तलवारी घेऊन बाहेर आले आणि अन्य भाषिक लोक भाले घेऊन बाहेर आले, असे होत नाही. हा सगळा वाद सुरु असताना आपापसातील व्यवहार सुरुच होते, मैत्री कायम होती. हा एक स्थानिक आजार आहे, त्याला सार्वजनिक करु नये, हा आजार फैलावणारच नाही, असे मी मानत नाही. हा आजार इतरत्र फैलावू नये, ही चिंता आहे.
Raj Thackeray: राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?
८ फेब्रुवारी २०२६ रोजी मुंबईतल्या एका कार्यक्रमात सरसंघचालक श्री. मोहन भागवत यांनी, भाषेबद्दल आग्रही राहणे, त्यासाठी वेळेस आंदोलन करणे हा एक आजार आहे अशा आशयाचं विधान केलं. या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांना बोलावण्यात आले होते, त्यातले काही हजर देखील होते ! परंतु मोहनराव भागवतांना एक गोष्ट सांगू इच्छितो की ती सर्व मंडळी तुमच्या प्रेमाखातर आली नव्हती तर ती नरेंद्र मोदी यांच्या सरकारी भीतीमुळे आली होती ! नाहीतर आजवर का कोणी या असल्या रटाळ प्रवचनांना आले नाहीत? त्यामुळे ती मंडळी आपल्यासाठी आली होती या गैरसमजातून प्रथम आपण बाहेर या !
असो . . .
मुळात भाषावार प्रांतरचना या देशात का करावी लागली हा इतिहास भागवतांना निश्चितच माहीत असावा असे आम्ही समजतो ! भाषेबद्दलचं प्रेम, प्रांताबद्दलचं प्रेम हा जर भागवतांना आजार वाटत असेल तर त्यांच्या निदर्शनास हे आणून देऊ इच्छितो की हा आजार या देशातील बहुसंख्य राज्यांमध्ये आहे.
दक्षिणेत कर्नाटक ते तामिळनाडू इथे तीव्र भाषिक आणि प्रांतिक अस्मिता आहेत. तिकडे पश्चिम बंगाल असो, पंजाब असो अगदी गुजरात असो, तिकडे पण ही भावना आहे. ही भावना नक्की काय आहे हे कधी भागवतांनी समजून घेतली आहे का? जेंव्हा देशातील ४ / ५ राज्यातील लोकांच्या झुंडीच्या झुंडी वेगवेगळ्या राज्यात जातात, तिकडे आगाऊपणा करतात, तिथल्या स्थानिक संस्कृतीला नाकारून, तिथल्या भाषेचा अपमान करतात, स्वतःचे मतदारसंघ तयार करतात, तेंव्हा स्थानिकांच्यात रोष तयार होतो आणि त्यातून उद्रेक तयार होतो. याला तुम्ही आजार म्हणणार? आणि जर तुमच्या लेखी हा आजार असेल तर तो आजार आपल्या गुजरातमध्ये पण पसरला आहे. गुजरातमध्ये उत्तर प्रदेश आणि बिहारच्या हजारो लोकांना जेंव्हा पळवून लावलं तेंव्हा तिकडे जाऊन समरसतेचे धडे का नाही दिलेत? असेच धडे कर्नाटक, तामिळनाडू, आंध्रप्रदेश ते पंजाब ते पश्चिम बंगाल इथे जाऊन का नाही दिलेत ?
मराठी माणूस सहनशील आहे पेक्षा इथले सत्ताधारी लिबलिबित कण्याचे आहेत म्हणून भागवतांची हिंमत होते. काही महिन्यांपूर्वी निवडणुकीच्या तोंडावर भय्याजी जोशींनी मुंबईची भाषा ही फक्त मराठी नाही तर ती गुजराती पण आहे अशा आशयाचं विधान करत मराठी माणसाला डिवचत गुजराती भाषिकांना चोंबाळण्याचा प्रयत्न केला. हे सगळं करून अप्रत्यक्षपणे भाजपला फायदा कसा होईल हे पाहिलं. मुळात स्वतःला अराजकीय संघटना म्हणवून घेणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने या भानगडीत मुळात पडायचंच कशाला?
संघाच्या कामाबद्दल आमच्या मनात आदर आहे, पण म्हणून अप्रत्यक्ष राजकीय भूमिका घेण्याच्या भानगडीत पडू नये. आणि पडायचंच असेल तर देशभरात हिंदी (जी मुळात राष्ट्रभाषा नाही ) लादणाऱ्या सरकारचे कान उपटून दाखवा आणि मग आम्हाला समरसतेच्या गोष्टी शिकवा.
आणि यात हिंदुत्व आणून आम्हाला ज्ञानामृत पाजायचा प्रयत्न करू नका. मी अनेकदा सांगितलं आहे की ज्या वेळेस हिंदूंवर हल्ला होईल तेंव्हा आम्ही हिंदू म्हणून आमच्याकडून जे काही करणं शक्य होईल ते आम्ही करूच ! रझा अकादमीच्या दंगलीविरोधात मोर्चा काढणारा आणि मशिदींवरील भोंग्यांच्या विरोधात आंदोलन करणारा, तसेच हिंदू सणांच्या वेळी मोठमोठ्याने लाऊडस्पीकर लावणे आणि मोठमोठ्याने डिजे लावून नागरिकांना त्रास होत असताना त्या विरोधात भूमिका घेणारा महाराष्ट्र नवनिर्माण सेना हाच पक्ष होता. जे चूक ते चूकच हे आम्ही ठासून बोलतो. तसं मोहनराव आपण कधी बोलणार ? हिंदुत्वाच्या नावाखाली देशभरात जो धिंगाणा सुरु आहे , उत्तर भारतात कावड यात्रांमधे बिभत्स पद्धतीने महिलांना नाचवले जाणे , तसेच २०१४ ला बीफ एक्सपोर्ट मधे जो आपला देश ९ व्या क्रमांकावर होता तो आज दुसऱ्या क्रमांकावर आलाय आणि आपल्या देशात गोहत्येचं राजकारण करून जो तमाशा सुरू आहे आणि त्यातून माथी भडकवली जात आहेत त्यावर तुम्ही कधी बोलणार? त्या व्यापाऱ्यांच्या विरोधात सरकारला खडे बोल कधी सुनावणार?
असो. तुम्ही काय करावं हे तुमच्यापाशी. आमच्यासाठी मराठी भाषा आणि मराठी माणूस हे अंतिम सर्वोच्च प्राधान्य आहे. या देशात भाषिक आणि प्रांतिक अस्मिता या राहणारच, तशाच त्या महाराष्ट्रात देखील राहणारंच ! हे आमचं स्वत्व आहे आणि त्याबद्दल जेव्हा जेव्हा असे प्रसंग उभे राहतील तेव्हा तेव्हा महाराष्ट्र त्वेषाने उभा राहील !
राज ठाकरे ।






















