Raj Thackeray & Uddhav Thackeray: राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या एकीकरणाला बडव्यांचा विरोध? ठाकरे गटाने दुसरं पाऊलही पुढं टाकलं, पण मनसेच्या नेत्यांचा नेगेटिव्ह सूर
Raj Thackeray & Uddhav Thackeray: ठाकरे बंधुंच्या एकत्र येण्याची सुवर्णसंधी त्यांच्याभोवतीच्या बडव्यांमुळे जाणार का, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणातील एक बहुचर्चित फँटसी असलेल्या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोन भावांनी एकत्र येण्याची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि राज ठाकरेंची (Raj Thackeray) मनसे एकत्र आल्यास महाराष्ट्राचं राजकारण बदलेल, ठाकरे बंधुंची एकत्र ताकद कमाल घडवून आणेल, अशा अनेक थिअरीज आजपर्यंत राजकीय कार्यकर्ते आणि राजकारणाची आवड असणाऱ्या सर्वसामान्यांमध्ये चर्चेचा विषय राहिल्या आहेत. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी यावेळी कधी नव्हे ते एकत्र येण्यासाठी ठाम पावले टाकली आहेत. त्यामुळे मनसे (MNS) आणि शिवसेना (Shivsena Thackeray Camp) एकत्र येण्याच्या आशा कधी नव्हे इतक्या वाढल्या आहेत. मात्र, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्यात त्यांच्या पक्षाची दुसरी फळी अडथळा ठरण्याची शक्यता आहे.
एकेकाळी राज ठाकरे यांनी, 'माझ्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरलंय', असे म्हणत शिवसेना सोडली होती. आता राज ठाकरे यांनी महाराष्ट्र हितासाठी उद्धव ठाकरे यांच्याशी समेट करण्याची तयारी दाखवली असताना या दोन्ही नेत्यांभोवतीचे हेच 'बडवे'च सर्वात मोठा अडथळा ठरण्याची शक्यता आहे. कारण राज आणि उद्धव एकत्र येण्याची चर्चा सुरु झाली असताना दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये वाकयुद्ध रंगले आहे.
मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरे यांच्या अटीचा उल्लेख करताना, त्यांनी भाजपला धोका दिला, आता पवारांनाही देतील, असे सांगत मनसेने त्यांच्यावर विश्वास कसा ठेवायचा, असा सवाल विचारला होता. तसेच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मनसेच्या मशिदीच्या भोंग्याविरोधातील आंदोलनावेळी पक्षाच्या कार्यकर्त्यांवर 17 हजार गुन्हे दाखल झाल्याचे सांगत जुना वाद उकरुन काढला होता. तर दुसरीकडे ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी, महाराष्ट्रद्रोही कोण हे राज ठाकरे यांना कळणार नसले तर त्यांच्यासाठी प्रशिक्षण वर्ग सुरु करावा लागेल, असा टोला लगावला होता.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले?
राज ठाकरे यांनी एका पॉडकास्टमध्ये, महाराष्ट्र हित आणि मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी आमच्यातील क्षुल्लक भांडणे बाजुला सारुन एकत्र येण्याचे सूतोवाच केले होते. त्याला उद्धव ठाकरे यांनी प्रतिसाद देताना भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत तडजोडी चालणार नाहीत, अशी अट घातली होती. परंतु, ही अटही उद्धव ठाकरे यांनी मागे घेतली होती. ठाकरे गटाकडून काही तासांमध्ये राज ठाकरे यांच्यासोबत एकत्र येण्यासाठी कोणतीही अट नाही, असा खुलासा केला होता. हा खुलासा ठाकरे गटाने आणखी एक पाऊल पुढे टाकल्याचे बोलले जात आहे. परंतु, मनसेच्या नेत्यांकडून वारंवार जुन्या राजकारणाचा संदर्भ देत पालिका निवडणुकीच्या तोंडावर हा मनसेला गुंतवून ठेवण्याचा नवा डाव तर नाही ना, अशी शंका उपस्थित केली जात आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, घाई करू नका, थोडी वाट पाहा
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याचा सर्वाधिक मोठा फटका भाजपला बसू शकतो. हे दोन्ही भाऊ एकत्र आल्यास मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत मराठी मतांचे ध्रुवीकरण होऊन भाजपच्या जागा कमी होऊ शकतात. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सावध भूमिका घेतली आहे. कुणीही मतभेद विसरुन एकत्र येत असतील तर त्यामध्ये काहीही वाईट नाही. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर आम्हाला आनंदच आहे. या चर्चा माध्यमांमध्ये आहेत. घाई करु नका, थोडी वाट पाहा. हे दोघे एकत्र आले तर आम्ही त्याचे स्वागत करु, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
आणखी वाचा























