BMC Election 2026: ठाकरेंची सेना 150, मनसे 60-70, BMC साठी राज-उद्धव ठाकरेंचा फॉर्म्युला जवळपास निश्चित, उद्या युतीची घोषणा
Raj Thackeray and Uddhav Thackeray seat sharing: राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या दोन्ही पक्षातील जागावाटप आज निश्चित होण्याची शक्यता. मुंबईत घडामोडींना वेग.

Raj Thackeray and Uddhav Thackeray seat sharing: आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांकडून 24 डिसेंबरला म्हणजे बुधवारी ठाकरे गट-मनसे युतीची (Thackeray Camp MNS Alliance) अधिकृत घोषणा होणार आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ट्विट करुन यासंदर्भातील माहिती दिली. त्यानुसार उद्या दुपारी 12 वाजता राज-उद्धव हे एकत्र येणार आहेत. दरम्यान, मनसे आणि ठाकरे गटाचा मुंबई महानगरपालिकेसाठीचा (BMC Election 2026) जागावाटपाचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाल्याची माहिती आहे. त्यानुसार मुंबईतील एकूण 227 प्रभागांपैकी 145 ते 150 जागांवर ठाकरे गट निवडणूक लढवेल. तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वाट्याला 65 ते 70 जागा येण्याची शक्यता आहे. तर ठाकरे बंधूंसोबत लढणाऱ्या शरद पवार गटासाठी 10 ते 12 जागा सोडण्यात आल्या आहेत.
BMC Election: ठाकरे गट-मनसे जागावाटप संभाव्य फॉर्म्युला
ठाकरे गट- 145 ते 150 जागा
मनसे- 65 ते 70 जागा
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट- 10 ते 12 जागा
विशेष म्हणजे ठाकरे गटाने 2017 च्या निवडणुकीत जिंकलेल्या जवळपास 12 ते 15 जागा राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या मनसेसाठी सोडल्या आहेत. या जागांवरील बहुतांश माजी नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत दाखल झाले आहेत. त्यामुळे याठिकाणी ठाकरे गटाकडे तुल्यबळ उमेदवार नाही. तुलनेत या जागांवर मनसेकडे ताकदवान उमेदवार उपलब्ध आहेत. परंतु, अद्याप भांडूप, कांदिवली, बोरिवली, मुलुंड परिसरातील काही वॉर्डांमधील तिढा बराच काळ लांबला होता. हा तिढा सुटून संपूर्ण जागावाटप निश्चित झाल्यानंतरच युतीची अधिकृत घोषणा व्हावी, असा मनसेप्रमुख राज ठाकरे यांचा आग्रह होता. त्यानुसार आता जागावाटप अंतिम झाले असून उद्या युतीची घोषणा होईल.
संपूर्ण जागावाटप निश्चित होत नाही तोपर्यंत युतीची घोषणा करु नका, अशा सूचना राज ठाकरे यांनी मनसेचे नेते आणि पदाधिकाऱ्यांनाही दिल्या होत्या. दोन्ही बाजूंनी जागावाटपाचा निर्णय अंतिम होऊ दे. आपल्याला ज्या जागा हव्या आहेत, त्या मिळत नाहीत तोपर्यंत युतीची घोषणा करु नये, अशी राज ठाकरे यांची भूमिका होती. काल मातोश्रीवर मनसे आणि ठाकरे गटाच्या नेत्यांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक पार पडली होती. त्यावेळी शिवडी आणि दादरमधील जागावाटपाचा तिढा पार पडला होता. परंतु, भांडूप, विक्रोळी आणि पश्चिम उपनगरातील काही जागांवरुन ठाकरे गट आणि मनसे यांच्यात रस्सीखेच सुरु होती. त्यामुळे जागावाटप लांबले होते.
मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी आजपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. त्यामुळे ठाकरे गट आणि मनसेतील इच्छूक उमेदवार पक्षाकडून देण्यात येणाऱ्या एबी फॉर्मकडे डोळे लावून बसले आहेत. 31 डिसेंबर ही उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. जागावाटपाची चर्चा जितकी जास्त लांबेल, उमदेवार जाहीर करण्यास तितका उशीर होईल. यामुळे संबंधित उमेदवारांना प्रचार करण्यासाठी कमी वेळ मिळेल. याचा फटका दोन्ही पक्षांना बसण्याची शक्यता होती. मात्र, आता उद्या युतीची घोषणा होणार असल्याने आता एबी फॉर्मच्या वाटपालाही सुरुवात होईल.
आणखी वाचा























