Praful Patel : मेहरबानी करुन दोन तासांसाठी पर्यटक म्हणून येऊ नका, प्रफुल्ल पटेलांनी विदर्भातील पालकमंत्र्यांना सुनावले खडेबोल, म्हणाले...
Praful Patel : मंत्र्यांनी विदर्भात पर्यटन म्हणून येऊ नये. इथे यायचं असेल तर योग्य रितीने आपल्या सहकाऱ्यांना मदत कशी होईल, अशा पद्धतीनं या, असे म्हणत प्रफुल्ल पटेल यांनी विदर्भातील पालकमंत्र्यांना सुनावले.

Praful Patel : मंत्र्यांनी विदर्भात पर्यटन म्हणून येऊ नये. इथे यायचं असेल तर योग्य रितीने आपल्या सहकाऱ्यांना मदत कशी होईल, अशा पद्धतीनं या. नाही तर दोन तासांचे पर्यटक म्हणून यायचं आणि मुंबईत जाऊन अजित दादा आणि तटकरे साहेबांसमोर येतात. मी या जिल्ह्यात जाऊन आलो, हे करुन आलो, याला काही अर्थ नाही, असे म्हणत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे खासदार प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांनी विदर्भातील पालकमंत्र्यांचे कान टोचले आहेत. नागपूर येथे आयोजित राष्ट्रवादी चिंतन शिबिरातून (NCP Chintan Shibir) ते बोलत होते.
प्रफुल्ल पटेल म्हणाले की, आमच्या विदर्भाच्या सर्व लोकांना मी सांगू इच्छितो की, आपली ताकद नाही असे कधीही समजू नये. हे खरं आहे की दादा आणि तटकरेंना सांगू इच्छितो, जेवढे सहकारी आहेत, मंत्री मंडळात आहेत त्यांना विदर्भात अधिक पाठवण्याची जबाबदारी देण्याची गरज आहे. लोकांची ही खंत आहे. अनेक मंत्री आमच्याकडे येतात. मी कुणाबद्दल विशेष सांगू इच्छित नाही. पर्यटनसाठी मेहरबानी करुन येऊ नये. त्यांनी फक्त 2 तासासाठी येऊन तोंड दाखवून जाऊ नये.
पालकमंत्र्यांनी फक्त झेंडावदनासाठी येऊ नये
अजितदादांकडे, तटकरेंकडे हजेरी लावली आणि मी या जिल्ह्यात जाऊन आलो, हे करुन आलो, याला काही अर्थ नाही. 2 तासासाठी येऊ नये. यायचं असेल तर आमच्या सहकाऱ्यांना मदत कशी होईल, ताकद कशी होईल? यासाठी यायचं असेल तर या. या विदर्भात बुलढाणा, वाशिम, गोंदियाला पालकमंत्री दिले आहेत. आपल्याकडे पालकमंत्री आहे, संपर्कमंत्री आहेत, त्यांना आपण जबाबदारी दिली पाहिजे. मी कुणाला इशारा देत नाही. पालकमंत्र्यांनी फक्त झेंडावदनासाठी येऊ नये. आमच्याकडे पालकमंत्र्यांच्या भूमिकेत यायला पाहिजे, असे म्हणत प्रफुल्ल पटेलांनी विदर्भातील पालकमंत्र्यांना खडेबोल सुनावले.
नाराजी व्यक्त करण्यात आलेले पालकमंत्री कोण?
1 दत्तात्रय भरणे - वाशिम,
2 मकरंद पाटील- बुलढाणा,
3 बाबासाहेब पाटील- भंडारा, गोंदिया
विदर्भात आपली वेगळी ओळख होतेय
दरम्यान, प्रफुल्ल पटेल आपल्या भाषणात म्हणाले की, पक्षाची ध्येय धोरणे घेऊन आपल्याला इथून जायचं आहे. नागपूरच्या पावन भूमीत कार्यक्रम पार पडत आहे. 1999 साली पक्ष स्थापन केल्यापासून आपण विदर्भाकडे लक्ष केंद्रित करू शकलो नाही. आपण काँग्रेस आपल्या पेक्षा मोठा पक्ष आहे. म्हणून कमी जाग्या लढवल्या. आता आपण महायुतीमध्ये आलो. इथ आल्यावर देखील आपण कमी जागा लढवल्या. विदर्भात 6 जागा महायुती म्हणून लढलो. त्यामध्ये 100 टक्के यश मिळालं. 7 वी जागा आपण मैत्रीपूर्ण लढत लढली. तिथे यश मिळाले नाही. आपण शिव, शाहू, फुले, आंबेडकर विचारधारेशी जोडले गेलो आहोत. अनेक विचारधारणाचा पूल बनून आपला पक्ष काम करत आहे. विदर्भात आपली वेगळी ओळख होतं चालली आहे, असे त्यांनी म्हटले.
आणखी वाचा

























