हवाई चप्पल घालणाऱ्याने हवाई सफर करावा हे माझं स्वप्न, नवी मुंबई विमानतळ लोकार्पणातून मोदींचं भाष्य, काँग्रेससह उद्धव ठाकरेंवरही निशाणा
नरेंद्र मोदींनी पुढे बोलताना म्हटले की, मित्रांनो ही वेळ भारतीय युवकांसाठी असंख्य संधींचा क्षण आहे. मी महाराष्ट्रातील तरुणांना शुभेच्छा देतो,महाराष्ट्रातील लोकनेते दि.बा. पाटील यांचीही आठवण मी काढतो.

मुंबई : बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित नवी मुंबई विमानतळाचे (Airport) लोकार्पण आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याहस्ते (Narendra modi) करण्यात आले. त्यामुळे, आता लवकरच नवी मुंबईतून विमानाचे उड्डाण होणार असून डिसेंबर महिन्यात पहिले विमान आकाशी झेप घेणार आहे. सन 1990 च्या दशकातील ह्या विमानतळाची संकल्पना असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात सांगितले. तर, मोदींनी आपल्या भाषणाची सुरुवात करताना, विजया दशमी, कोजागिरी आणि दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. मित्रो, आज मुंबईचा (Mumbai) गेल्या अनेक वर्षांपासूनची प्रतिक्षा संपुष्टात आली. आता मुंबईला दुसरे आंतरराष्ट्रीय विमानतळ मिळालं आहे. आशियातील सर्वात मोठे कनेक्टिव्हीटी हब म्हणून याची भविष्यात ओळख होईल, असेही मोदींनी म्हटले. तसेच, मुंबईत अंडरग्राऊंड मेट्रोचेही लोकार्पण झाले असून विकसित भारताचं हे प्रतिक असल्याचं मोदींनी म्हटलं. तसेच, काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या तत्कालीन सरकारवरही टीका केली.
नरेंद्र मोदींनी पुढे बोलताना म्हटले की, मित्रांनो ही वेळ भारतीय युवकांसाठी असंख्या संधींचा क्षण आहे. मी महाराष्ट्रातील तरुणांना शुभेच्छा देतो, महाराष्ट्रातील लोकनेते दि.बा. पाटील यांचीही आठवण मी आज काढतो. त्यांचे सामाजिक जीवन, शेतकऱ्यांप्रती तळमळ आपल्यासाठी प्रेरणा आहे, असेही मोदींनी म्हटले. गेल्या 11 वर्षात भारतात वेगाने विकास होत आहे, वंदे भारत रुळावरुन धावते, हायवे आणि एक्सप्रेस नव्या शहरांना जोडत आहेत, बुलेट ट्रेनचं स्वप्न वेगाने साकार होत आहे, डोंगर-दऱ्यांमधून नवे बोगदे बनत आहेत. नवी मुंबई एअरपोर्ट हे विकसित भारताचे प्रतिक आहे, याचा आकार कमळाच्या फुलासारखा असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीवर बनलेला आहे, असे मोदींनी म्हटले.
नवी मुंबई विमानतळामुळे येते गुंतवणूक वाढेल, नवे उद्योग निर्माण होतील, रोजगार निर्माण होतील. स्वप्नांना पूर्ण करण्याची इच्छाशक्ती असल्यास रिझल्टही दिसून येतात. 2014 मध्ये मला देशवायीसांनी संधी दिली, तेव्हा माझं स्वप्न होतं, हवाई चप्पल घालणाऱ्यानेही हवाई सफर केला पाहिजे, आज ते प्रत्यक्षात होत आहे. आज भारतात विमानतळांची संख्या 160 च्या पुढे गेली आहे. जेव्हा लहान-सहान शहरात विमानतळ बनत आहेत, तेव्हा विकासाला गती मिळते. उडान योजनेंतर्गत लाखो लोकांनी हवाई प्रवास करत आपलं स्वप्न पूर्ण केलं. सध्या, भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाचा डोमेस्टिक एविएशन मार्केट आहे. एकट्या भारतात 1000 नवे विमान बनविण्याचं काम सुरू आहे. या दशकाच्या शेवटपर्यंत भारत एक नवा एमआरओ बनले. भारत आज जगातील सर्वात तरुण देश आहे, आमची ताकद आपली युवा पिढी आहे. त्यामुळेच तरुणाईला जास्तीत जास्त रोजगार देण्याचं काम आपण करत आहोत.
काँग्रेससह उद्धव ठाकरेंनाही मोदींचा टोला (Narendra modi on congress and uddhav Thackeray)
राज्यात काहीजण सत्तेसाठी काम करतात, घोटाळे करुन विकासकामांना ब्रेक लावत आहेत. आज ज्या मेट्रो लाईनचे लोकार्पण झाले, ते याच लोकांच्या कामाची आठवण करुन देतो. इथं काही काळासाठी एक सरकार आले, त्यांनी हे काम थांबवले, आता 2 तासांचा प्रवास अवघ्या 30-40 मिनिटांत होईल. पण, काहींना हे काम 2-3 वर्षे थांबवलं हे कुठल्याही पापापेक्षा कमी नाही, असे म्हणत मोदींनी नाव न घेता उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला. तसेच, मुंबईतील 26/11 च्या हल्ल्याचा उल्लेख करत मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधला. या हल्ल्याबाबत नुकतेच तत्कालीन केंद्रीयमंत्र्यांनी काँग्रेस सरकारला उघडं पाडलं, असे म्हणत पी. चिदंबरम यांनी 26/11 च्या हल्ल्यानंतर सरकारने घेतलेल्या भूमिकेची आठवण करुन दिली. तसेच, पहलगाम हल्ल्यानंतर मोदी सरकारने पाकिस्तानमध्ये घुसून जशास तसे प्रत्युत्तर दिल्याचेही मोदींनी म्हटले.



















